निकाल
दिनांक- 04.10.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार तारामती दशरथ गायसमुद्रे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदार मयत भिमराव दशरथ गायसमुद्रे ची आई असून मयताचे नावे गट क्रमांक 453 मौजे धारुर येथे 0.34 आर जमीन असून मयत हा शेती करुन कुटूंबियाची उपजिवीका करीत असे. मयत भिमराव दशरथ गायसमुद्रे हे दि.06.05.2011 रोजी त्याचे घरी असताना कृष्णा सुनिल गवळी हा आला व त्यास काम आहे, म्हणून घरातून घेऊन गेला. त्याच दिवशी घरातील लोकांना कळले की, भिमराव याचा धारुर येथील किल्ल्याच्या भिंती वरुन ढकलून देवून खून झाला म्हणूनदि.07.05.2011 रोजी पोलीस स्टेशन धारुर येथे कलम 302, 34 भा.दं.वि.प्रमाणे फिर्याद नोंदविली, नंतर घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी बाबी तपास अधिकारी यांनी पूर्ण केल्या.
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-यांचा विमा शासनाने काढलेला असून त्यास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना म्हणून संबोधले आहे. त्या अंतर्गत तक्रारदार यांना नुकसान भरपाई कामी सामनेवाला क्र.1 कडे प्रस्ताव दाखल केला आहे. सदर प्रस्ताव दि.11.11.2011 रोजी कृषी अधिकारी धारुर यांच्याकडे दाखल केला होता. प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे पत्र दि.21.11.2011 रोजी तक्रारदाराला पाठविले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी सर्व कागदपत्राची पुर्तता केलेली आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाला यांना स्मरणपत्र पाठवून प्रस्ताव निकाली काढण्यास विनंती केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी दि.13.07.2012 रोजी पत्र पाठवून कळवले की, तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मागणी अर्ज उशिरा सादर केल्यामुळे सदर प्रस्ताव हा विमा कंपनीने परत केलेला आहे. सदर अर्जाचे पुर्ण अवलोकन करुन परत पाठविण्याची विनंती केली असता सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मंचामध्ये जाण्यास सांगितले. म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार ही मंचात दाखल करुन विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
सामनेवालाक्र.1 तालुका कृषी अधिकारी हे मंचात हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या कथनेनुसार शेतकरी अपघात घटना दि.06.05.2011 रोजी घडलेली असून त्याचा विमा कालावधी दि.15.08.2010 ते 14.08.2011 पर्यंत आहे. तक्रारदार यांनीदि.02.01.2012 रोजी कागदपत्राची पुर्तता कार्यालयास केलेली आहे, व सदर प्रस्ताव हा या कार्यालयाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेबाबतची कार्यवाही अर्ज पोच झाल्यापासून वेळेत केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.
सामनेवाला क्र.3 हे हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे विहित मुदतीत दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द नो से चा आदेश झालेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी शाखा व्यवस्थापक श्री.सुर्यकांत साहेबराव माखरे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. त्यांच्या नुसार सदर प्रस्ताव हा वेळेवर दाखल न केल्यामुळे नाकारलेला आहे. तसेच पूर्ववैमनस्यातून त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणून विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. म्हणून सदर तक्रार ही खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र तसेच तक्रारदार व सामनेवाला क्र 3 यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार ही बाब सिध्द करु शकतात का की,
सामनेवाला यांनी, त्यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी
ठेवलेली आहे? होय.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनीसेवा देण्यामध्ये कसूर केला आहे हे दर्शविण्यासाठी सामनेवाला यांचेकडे दाखल केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहे. त्यामध्ये मयताचे नावे शेती असल्याबाबत 7/12 उतारा, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत भरावयाचा क्लेम फॉर्म, भारतीय प्रक्रिया संहितेच्या कलम 154 अन्वये दाखलझालेली पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा दावा नामंजूर केल्याबाबत पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केले.
सामनेवाला क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी जबाब दाखल केला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी जबाब दाखल केला आहे. त्या व्यतिरिक्त कोणताही पुरावा किंवा कागदपत्र दाखल केले नाही. सामनेवाला क्र.3 यांनी सुर्यकांत साहेबराव माखरे, शाखा व्यवस्थापक यांचे शपथपत्र दाखल केले.
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र व तक्रारदाराचे वकील श्री राजपुत यांनी केलेला युक्तीवाद याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, तक्रारदार याने सदर प्रस्ताव वेळेवर दाखल केला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारदार यांचा मुलगा भिमराव दशरथ गायसमुद्रे हा त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मयत झाला आहे. सदर बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे. त्याबाबत घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे. सामनेवाला यांनी सदरील कागदपत्राची हरकत घेतली नाही. सामनेवाला क्र.3 विमा कंपनी याचे वकील श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांच्या कथनेनुसार सदर प्रस्ताव वेळेत दाखल झाला नाही म्हणून नाकारला आहे. तक्रारदार यांचा मुलगा भिमराव दशरथ गायसमुद्रे यांचा मृत्यू त्याच्या भाऊबंदकी किंवा पूर्ववैमनस्यातून झाला आहे, ही बाब सिध्द करण्यासाठी कोणताही पुरावा किंवा कागदपत्र दाखल केले नाही. मयत याच्या नावे शेतजमीन आहे. त्यामुळे तो शेतकरी आहे ही बाब सिध्द होते.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसते की, त्यांनी त्यांच्या मुलाचे मृत्यूनंतर सामनेवाला क्र.1 कडे सदरील विमा योजना अंतर्गत दावा मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह दावा दाखल केला होता. सामनेवाला क्र.1 यांनी सर्व कागदपत्र सामनेवाला क्र.2 यांचे मार्फत सामनेवाला क्र.3 कडे पाठविण्यात आले, परंतू सामनेवाला क्र.1 यांच्या पत्रानुसार सदर योजनेचा प्रस्ताव उशिरा सादर केल्यामुळे कंपनीने सदर प्रस्ताव नाकारला आहे. सामनेवाला क्र.1 चे जबाब पाहता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यानेसदर प्रस्ताव सर्व कागदपत्राची पुर्तता करुन वेळेत प्रस्ताव पाठविला आहे व सामनेवाला क्र.1 यांनीसामनेवाला क्र.2 मार्फत सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.3 विमा कंपनीकडे पाठविला आहे.त्यामुळे सामनेवाला क्र.3 यांचे बचाव की प्रस्ताव हा उशिरा मिळाल्यामुळे नाकारला आहे, ही बाब स्विकार्थ नाही. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव नाकारण्यास कोणतेही संयुक्तीक कारण व स्पष्ट असा पुरावा दाखल केलेला नाही.
तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकरी यांच्याकडे अर्ज दिला व तो अर्ज सामनेवाला क्र.2 यांच्या मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला पाठविला,त्यावर इन्शुरन्स कंपनीने दखल घेतली नाही. सबब या मंचाचेअसे मत आहे की, सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कसूर केली आहे. म्हणून तक्रारदार हे रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे, त्यासाठी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात
विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु. एक
लाख) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्कम
विहीत मुदतीत न दिल्यास संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून
वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.3 यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष