निकाल
दिनांक- 23.12.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार सरस्वती रविंद्र राऊत यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदाराचे पती नामे रविंद्र कल्याण राऊत हे मौजे कानडी माळी ता.केज येथील रहिवाशी असून त्यांचे नावे कानडीमाळी येथे गट नं.113मध्ये दोन हेक्टर शेतजमिन असून ते शेतीचा व्यवसाय करत होते. तक्रारदाराचे पती दि.24.05.2011 रोजी त्यांचे गट नं.113 मधील शेतात भाजीपाल्यावर औषध फवारणी करताना विषबाधा झाली म्हणून तक्रारदाराचे पती यांना स्वामी रामानंद तिर्थ हॉस्पिटल, अंबाजोगाई येथे शरीक केले. उपचारादरम्यान दि.02.06.2011 रोजी तक्रारदाराचे पती मयत झाले. त्याबाबत आकस्मात मृत्यूची खबर दि.04.06.2011 रोजी पोलीस स्टेशन केजला देण्यात आली. त्याबाबत घटनास्थळ पंचनामा,मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन अहवाल दाखल केले आहे.
तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर समानेवाला क.1 कडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी दि.23.08.2011 रोजी प्रस्ताव दाखल केला. सदर प्रस्तावाबाबत सामनेवाला क्र.3 यांनी दि.24.11.2011 रोजी व्हिसेरा अहवालाची मागणी केली होती, तक्रारदार यांनी तसे सामनेवाला क्र.3 यांना दि.18.01.2012 रोजी व्हिसेरा अहवाल मागणी कागदपत्राबाबत तक्रारदारास कळवले होते. दि.18.07.2012 रोजी सामनेवाला क्र.1चे पत्र तक्रारदारास मिळाले व विमा दावा बंद करण्यात आल्याचे कळवले. सामनेवाला क्र.1 यांनी पुनर्विचार कामी अर्ज पाठविण्याची तोंडी विनंती केली असता त्यांनी संबंधित न्यायालयामध्ये दाद मागण्याचा सल्ला दिला म्हणून तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रादाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारानी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली आहे.
सामनेवाला क्र.1 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदार यांचा प्रस्ताव दि.23.08.2011 रोजी प्राप्त झाला आहे. सदरचा प्रस्ताव दि.29.08.2011रोजी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे. तक्रारदाराकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विहीत मुदतीत प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे, तसेच सदर प्रकरणात तक्रारदारास नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.3 ची असल्यामुळे सामनेवाला क्र.1 च्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 डेक्कन इन्शुरन्स यांनी मंचासमोर आपले लेखी म्हणणे पोस्टाद्वारे पाठविलेले आहे. त्यांच्या कथनेनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या कागदपत्राची शहानिशा करुन सदर प्रस्ताव हा विमा कंपनीस सादर करणे कामी संबंधित संस्था आहे.
सामनेवाला क्र.3 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तसेच सामनेवाले क्र.3 यांनी कंपनीचे सरव्यवस्थापक विश्वास बन्सी गायकवाड यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदाराचे पती सरंवर मृत्यू हा भाजीपाल्यावर औषध फवारणी करत असताना विषबाधामुळे झाला आहे. तक्रारदाराचे मयत पती याचे शवविच्छेदन अहवालानुसार तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू “suspected poisoning, reserve the opinion till chemical analyses report is made available”. याच्यामुळे झाला आहे. डॉक्टरच्या मते तक्रारदाराच्या पतीच्या मृत्यूचे कारण कोणते ही बाब स्पष्ट नाही. डॉक्टरच्या मतानुसार सामनेवाला क्र.3ने सुध्दा तक्रारदार यांच्या पतीच्या मृत्यूबाबत स्पष्टता व्यक्त केलेली नाही. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास व्हिसेरा अहवालाची वेळोवेळी मागणी केली आहे परंतू तक्रारदार यांनी सदरील व्हिसेरा अहवाल याची पुर्तता सामनेवाला क्र.3 यांच्याकडे केली नाही, म्हणून तक्रारदार यांचा विमा दावा बंद करण्यात आला. सामनेवाला यांच्या कथनेनुसार तक्रारदार यांचामृत्यू हा अपघात नसून आत्महत्या आहे. पॉलीसीच्या शर्तीनुसार आत्महत्या ही सदर पॉलीसीमध्ये येत नाही.तक्रारदार यांनी पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग केला आहे त्यामुळे तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र नाही. म्हणून सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा दावा नामंजूर केला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास कोणतीही कसूर केली नाही. सबब तक्रारदाराची तक्रर रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत 7/12 उतारा, गाव नमुना 6 क, फेरफार उतारा, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, सामनेवाला क्र.3 यांचे पत्र, तसेच तालुका कृषी अधिका-याचे पत्र दाखल केलेले आहे. पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले. सामनेवाला क्र.1, 2 व 3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांचे विद्वान वकीलांचा युक्तीवाद व सामनेवाला क्र.1,2 व 3 यांचे जबाबाचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार यांन सामनेवाला यानी सेवा देण्यामध्ये
त्रुटी ठेवली आहे यांच्याकडे ही बाब
सिध्द केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केला आहे हे दर्शविण्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत. त्यामध्ये मयताच्या नांवे शेती असल्याबाबत 7/12 उतारा, फेरफार नक्कल, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आकस्मीक मृत्यूची खबर, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा दावा नामंजूर केल्याबाबतचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांनी लेखी जवाब दाखल केला. सामनेवाले क्र.2 यांनी लेखी जवाब दाखल केला. त्या व्यतिरिक्त कोणताही पुरावा दाखल केला नाही. सामनेवाले क्र.3 यांनी लेखी जवाब सोबत विश्वास बन्सी गायकवाड यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारदार यांचे पती रविंद्र कल्याण राऊत हे आपल्या स्वतःच्या शेतात भाजीपाल्यावर औषध फवारणी करताना त्यांस विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे . ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी पोलिस स्टेशन केज येथे दाखल केलेल्या गुन्हयाची नोंद त्याबाबत कागदपत्र मरणोत्तर पंचनामा व शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार तक्रारदाराचे पती यांचा मृत्यू Susppection poisoning मुळे झाला आहे. तक्रारदार यांचे पती यांच्या नांवे काकनडीमाळी येथे शेतजमिन आहे व ते शेतकरी होते ही बाब सिध्द होते.
तक्रारदार यांनी पतीच्या निधनानंतर सामनेवाले क्र.1 यांच्याकडे शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कागपत्रासह प्रस्ताव दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी सर्व कागदपत्रासह सामनेवाले क्र.2 यांच्यामार्फत सामनेवाले क्र.3 विमा कंपनीकडे सादर केला. सामनेवाले क्र.3 यांचा बचाव की, तक्रारदार यांनी त्यांचे मयत पती यांचा व्हिसेरा अहवालाची प्रत पाठविण्यासाठी सांगितले होते. परंतु तक्रारदार याने त्या संदर्भात कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे दावा बंद करीत आहे.
तक्रारदार यांने दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र यांचे अवलोकन केले. त्यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांने पोलिस स्टेशन केज येथे दि.15.3.2012 रोजी सदर व्हिसेरा अहवालाची प्रत मिळण्याकामी अर्ज केला होता पण सदर अर्जावर पोलिस स्टेशन केज यांनी प्रमाणपत्र दिले आहे. त्यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, तक्रारदार यांचे मयत पती यांचा राखून ठेवलेला व्हिसेरा वैज्ञानिक प्रयोगशाळा औरंगाबाद येथे तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे परंतु सदर अहवाल अद्याप हस्तगत झाला नाही, म्हणून तक्रारदार यांना सदर व्हिसेरा अहवालाची प्रत सामनेवाले क्र.3 कडे सादर करता आली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.3 यांचा बचाव की तक्रारदार यांनी व्हिसेरा अहवाल सादर केला नाही म्हणून विमा दावा देऊ शकत नाही ही बाब स्विकार्य नाही.सदर प्रकरणात व्हिसेरा अहवाल सादर करणे गरजेचे नाही.
सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांची तक्रार नाकारण्यास कोणतेही योग्य कारण नाही. तक्रारदार यांचे पती हे शेतात भाजीपाल्यावर औषध फवारणी करत असताना ते मयत झाले. त्याबाबतचे सर्व कागदपत्र तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 व 2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे पाठविले आहेत. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारास मयताचा व्हिसेरा अहवालाची मागणी केली होती परंतु तक्रारदारास अद्यापपर्यत त्यांचे व्हिसेरा अहवाल प्राप्त झाले नाही. त्याबाबतचे पोलिस स्टेशन येथील प्रमाणपत्र दाखल केले. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचे पती रविंद्र कल्याण राऊत यांनी आत्महत्या केली ही बाब सिध्द करण्यासाठी मंचासमोर कोणताही ठोस पुरावा दाखल केला नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये टाळाटाळ केली आहे. तक्रारदार विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत. विमा रक्कम देण्याची जबाबदारी ही सामनेवाले क्र.3 यांची आहे. जबाबदारी असतानाही त्यांनी रक्कम न देऊन सेवेत कसूर केला आहे. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे व झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबददल रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम र.1,000/- दयावेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर दाखल दि.12.02.2013 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज दयावे.
3) सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1000/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड