निकाल
दिनांक- 29.01.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार कलावती रामराव राख यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मयत रामराव बापूराव राख यांच्या पत्नी आहे. मयत रामराव राख यांचे नावे मौजे होळ ता.केज जि.बीड येथे शेतजमीन गट नं.51, 173, 172 नोंदलेली आहे. मयत रामराव हे शेती व्यवसाय करत होते. दि.01.09.2011 रोजी मयत रामराव हे शेतामध्ये काम करीत असताना त्यांना वीजेचा धक्का लागल्यामुळे ते मयत झाले. तक्रारदार हया अशिक्षित आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-यांचा अपघातात मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाला क्र.4 यांच्याकडे विमा उतरविलेला आहे. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तक्रारदार हया शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तक्रारदार यांनी दि.21.01.2012 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे शपथपत्र दाखल केले व त्या सोबत डॉ.पवार यांचे प्रमाणपत्र जोडले. तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाला क्र.4 यांच्याकडे पाठविण्यात आला.दि.15.03.2012 रोजी सामनेवाला क्र.4 यांनी नुकसान भरपाई मिळणार नाही असे पत्र पाठविले व दि.08.05.2012 रोजी सदरील क्लेम नामंजूर केला आहे असे कळविले. तक्रारदार यांनी दि.25.04.2012 रोजी तक्रारदाराच्या क्लेमचा पुनर्विचार व्हावा म्हणून अर्ज पाठविला. अद्यापी सामनेवाला क्र.4 यांनी दखल घेतलेली नाही. सबब सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा. तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च व झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील 10 ते 75 वयोगटातील शेतक-यांचा अपघात विमा शासन निर्णय क्र.2011/प्र.क्र.-14/11अ दिनांक 08 ऑगस्ट 2011 ने दि. 15.08.2011 ते 14.08.2012 या कालावधीसाठी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे उतरलेला आहे. तक्रारदार यांचे पती वीजेच्या धक्क्याने मयत झाले आहे. सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडे दि.21.01.2012 रोजी प्राप्त झाला आहे. सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 कडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे. नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.4 वर आहे.
सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम दि.03.02.2012 रोजी प्राप्त झाला असून सदरील प्रस्ताव सामनेवाला क्र.3 डेक्कने इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि., यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी पुनर्विचार करण्यासाठी दिलेला अर्ज सुध्दा पुढील कार्यवाहीसाठी सामनेवाला क्र.3 कडे पाठविलेला आहे
सामनेवाला क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, सामनेवाला क्र.3 ही संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यताप्राप्त, विमा सेवा देणारी संस्था आहे. सामनेवाला क्र.3 हे मध्यस्थ म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र.3 हया संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सामनेवाला क्र.3 यांनी सल्लागार म्हणून कोणतीही फी किंवा कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही. सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.
सामनेवाला क्र.4 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे निशाणी 13 अन्वये दाखल केले. सामनेवाला क्र.4 यांचे कथन की, मयत रामराव यांनी बेकायदेशिर इलेक्ट्रीक कनेक्श घेतलेले होते. सदरील बाब ही विमा कंपनीच्या शर्ती व अटीचे भंग करणारी आहे. मयत रामराव यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.4 यांचेवर नाही. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारलेला आहे. मयत हे बेकायदेशिर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृतीमुळे मयत झालेले आहे, ते विद्युत चोरी करत होते.तसेच तक्रारदार यांनी सदरील मयत व्यक्ती बाबत कोणताही दस्तऐवज सादर केलेला नाही. तक्रारदार यांचा अर्ज खोटा असल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच निशाणी 3 सोबत मयत रामराव यांचे नावे असलेले खाते उतारा, 7/12 चा उतारा, शपथपत्र, मृत्यूचे प्रमाणपत्र व डॉ.पवार यांनी दिलेले प्रमाणपत्र हजर केलेले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सक्षम अधिका-यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे सक्षम अधिका-यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.4 यांनी निशाणी 14 अन्वये सक्षम अधिका-यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी निशाणी 17 अन्वये डॉ.पवार यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तुकाराम साळबा घुगे या व्यक्तीचे नावे असलेला 7/12चा उतारा व विद्युत जोडणी बाबत दस्त हजर केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.राजपुत यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.4 यांचे वकील श्री.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 ते 3 हे युक्तीवादासाठी गैरहजर राहीले.
तकारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, दस्त याचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व युक्तीवाद यांचा विचार केला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांचे पती मयत श्री.रामराव यांचा मृत्यू विद्युत शॉक मुळे झाला आहे, ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय? नाही.
2) सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब
तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? नाही. 3) तक्रारदार हया शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. नाही.
4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.राजपुत यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती हे इलेक्ट्रीक शॉक लागल्यामुळे मृत्यू पावले आहे. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांच्या मृत्यू बाबत पोलीसांना खबर दिली नाही. त्यामुळे तक्रारदार हया त्यांचे पतीचे मृत्यूचे कारण बाबत दस्तऐवज सामनेवाला क्र.4 यांच्याकडे हजर करु शकल्या नाही. तक्रारदार यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी डॉ.पवार यांनी दिलेले प्रमाणपत्र हजर केले आहे, त्या प्रमाणपत्रामध्ये तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट लिहीलेले आहे. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदार यांच्या वकीलांनी अशी विनंती केली की, महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू पावलेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याकामी जी योजना अंमलात आणली आहे, त्या अन्वये तक्रारदार यांना सामनेवाला क्र.4 यांचेकडून विम्याची रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावे व तक्रारीचा खर्च व तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
सामनेवाला क्र.4 यांचे वकील श्री.महाजन यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी त्यांचे पती हे वीजेचा धक्का लागून मयत झाले ही बाब शाबीत केलेली नाही. सामनेवाला क्र.4 यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावर वेधले व असे नमुद केले की, तक्रारदार यांनी त्यांच्या पतीच्या मयताचे कारण हे वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहे. तक्रारदार यांचे पती हे विजेचा शॉक लागून मयत झाले होते, तर त्या संबंधी पोलीसात तक्रार देणे गरजेचे होते. तसेच तक्रारदार यांचे पतींना दवाखान्यात नेऊन त्यांच्या मृत्यूचे कारण शोधणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी तसा कोणताही दस्त या मंचासमोर हजर केला नाही. तसेच सामनेवाला यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व वस्तुस्थितीवरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांच्या पतीने बेकायदेशिर विद्युत प्रवाह घेतलेला होता व त्याचा शॉक लागून ते मयत झाले असावे, सदरील बाब लपवून ठेवण्यासाठी तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांनी मयत व्यक्तीस दवाखान्यात नेले नाही अगर पोलीसात तक्रार दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे सिध्द झालेले नाही. सामनेवाला क्र.4 यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील केसमध्ये डॉ.पवार यांनी जे प्रमाणपत्र तक्रारदार यांना दिलेले आहे व ते प्रमाणपत्र तक्रारदार यांनी या मंचासमोर हजर केले आहे, सदरील डॉक्टर हे सहाय्यक प्राध्यापक मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे कार्यरत आहे. जर सदरील डॉक्टर हे तक्रारदाराचे पती मयत झाले, त्यावेळेस हजर असते तर त्यांनी तक्रारदार यांचे पतीचे प्रेत दवाखान्यामध्ये नेले असते व त्याबाबत पोलीसाला रिपोर्ट दिला असता. सदरील डॉक्टर यांनी न्यायवैद्यक शास्त्राचा कोणताही अहवाल या मंचापूढे हजर केलेला नाही. तसेच न्यायवैद्यक शास्त्र प्रमाणे प्रमाणपत्र दिलेले नाही. सदरील प्रमाणपत्र देण्याचे अधिकार डॉक्टर यांना नाही. त्याबाबत डॉक्टरचा कोणताही तपासणी अहवाल या मंचापूढे नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे पती हे विद्युत शॉकमुळे मयत झाले आहे ही बाब सिध्द होत नाही.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला, तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीमध्ये तक्रारदार यांच्या पतीचा मृत्यू दि.01.09.2011 रोजी शेतामध्ये विजेच्या धक्क्यामुळे झाला आहे असे कथन केले आहे. तक्रारदार यांनी मयत रामराव यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र हजर केले आहे. सदरील प्रमाणपत्रामध्ये तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला ही बाब नमुद केलेली नाही. तक्रारदार यांनी सहाय्यक अभियंता विद्युत यांचा अहवाल दाखल केला आहे. सदरील घटना ही सर्व्हे नं.74 मध्ये घडल्याचे नमुद केलेले आहे.सदरील इंजिनिअर यांनी पंचनामा केला, त्यात त्यांना असे आढळून आले आहे की, रानडूकरे ऊसाच्या पिकाचे नुकसान करीत असल्यामुळे शेतक-यांनी ऊसाभोवती तारेचे कुंपनकरुन अनधिकृतपणे आकडा टाकून वीजेच्या खांबावरुन विद्युत प्रवाह घेतलेला आहे.सबब या वरुन असे निदर्शनास येते की, मयत यांनी अनधिकृतपणे विद्युत पोलवरुन आकडा टाकून रानडूकरापासून शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कंपाऊंड घालून त्यात विद्युत प्रवाह सोडलेला होता. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 यांच्याकडे दि.25.04.2012रोजी एक अर्ज दिलेला आहे, त्या अर्जामध्ये तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, सर्व्हे नं.74 हा तुकाराम साळबा घुगे यांचा आहे. सदरील व्यक्तीने बेकायदेशिर वीज कनेक्शन घेतले होते. दि.01.09.2011 रोजी तक्रारदार यांचे पती म्हैस घेऊन शेतात चारण्यासाठी गेले होते. तक्रारदार यांचे पती म्हैस पाण्याने धुत असताना म्हैस पळून गेली.तक्रारदार यांचे पती त्या म्हशीचा शोध घेत होते, तेव्हा तुकाराम साळबा घुगे यांचे शेतात वीजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. सदरील तुकाराम साळबा घुगे यांनी तार लावून विजेचे करंट घातलेले होते. सदरील बाब जरी लक्षात घेतली तरी, तकारदार अगर त्यांचे नातेवाईक यांनी त्या संबंधी ताबडतोब पोलीसांना खबर देणे गरजेचे होते. तसेच तक्रारदार यांचे पतीचे प्रेत हे शवविच्छेदनासाठी दवाखान्यात नेणे गरजेचे होते. सदरील कृती ही तक्रारदार अगर त्यांचे नातेवाईकांनी केलेली नाही. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे पती कसे मयत झाले याबाबत तक्रारीमध्येही सविस्तर नोंद केलेली नाही. तक्रारदार हया डॉ.पवार यांनी जे प्रमाणपत्र दिले आहे, त्यावर सर्वस्वी अवलंबून आहे. सदरील प्रमाणपत्र डॉ.पवार यांनी देतेवेळेस मयत व्यक्तीची कोणतीही वैद्यकीय तपासणी केलेली दिसत नाही. अगर त्या संबंधी कोणताही दस्तऐवज या मंचासमोर हजर केलेला नाही. सदरील डॉक्टर हे अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. तक्रारदार यांचे पती मौजे होळ ता.केज या ठिकाणी शॉक लागून मयत झाले. सदरील डॉक्टर त्या ठिकाणी कशासाठी गेले होते व त्यांना कोणी बोलावले होते या बाबत स्पष्ट पुरावा नाही. सदरील डॉक्टर हे जबाबदार व्यक्ती असून अशा प्रकारची घटना घडली तर सदरील मयत व्यक्तीचे प्रेत हे दवाखान्यात नेऊन त्याचेवर कायदेशिर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत संपूर्ण माहिती डॉक्टरांना असतानाही त्यांनी तसे केलेले दिसत नाही. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र हे ग्राहय धरता येणार नाही. किंबहूना ते तक्रारदार यांनी डॉक्टरांना सांगून तशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्यास लावले आहे असे निदर्शनास येते.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी ज्या ज्या कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक होते ते सर्व कागदपत्र तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 यांच्याकडे दिले नाही. तसेच तक्रारदार यांचे पती श्री.रामराव हे विजेचा धक्का लागून मयत झाले ही बाब सुध्दा तक्रारदार हे शाबीत करु शकले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारलेला आहे असेया मंचाचे मत आहे. सबब तक्रारदार हया शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड