निकाल
दिनांक- 14.10.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार आश्रुबा तुकाराम भांगे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना आयोजित केली आहे. सदर योजनेअंतर्गत प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडे दाखल करावा लागतो, नंतर तो सामनेवाला क्र.2 कडे वर्ग करतात. सामनेवाला क्र.2 यांनी पडताळणी करुन योग्य कार्यवाहीस्तव सामनेवाला क्र.3 कडे पाठवितात, विमा रक्कम देण्याची जबाबदारी ही सामनेवाला क्र.3 ची आहे.
तक्रारदाराचा मुलगा मयत राजाभाऊ आश्रुबा भांगे याची सातेफळ ता.केज जि.बीड येथे गट नं.74 मध्ये 0-78 आर जमीन असूनतो शेती करुन त्याची उपजिवीका करत होते. मयत राजाभाऊ आश्रुबा भांगे हे 08 जून 2010 रोजी सकाळी 08.00 ते 08.30 वाजण्याच्या सुमारास साकेगाव येथे जाऊन येतो, असे सांगून गेला, तदनंतर त्याचे प्रेत विहीरीत तरंगताना दिसले. तो विहीरीजवळ पाणी पिण्यास गेला असता तोल जाऊन, घसरुन, विहीरीत पडून, पाण्यात बुडून, त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन केज येथे नानासाहेब हरिभाऊ भांगे यांनी दिली.
तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना मिळणेकामी सामनेवाला क्र.1 कडे आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला असता त्यांनी सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.3 कडे पाठविला व सामनेवाला क्र.2च्या निर्देशानुसार तक्रारदाराने वेळोवेळी पूर्ण कागदपत्राची पुर्तता केली असून सामनेवाला क्र.3 यांनी दि.31.12.2010 रोजी सदर प्रस्ताव हा कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे नाकारला आहे. तदनंतर तक्रारदाराने कृषी आयुक्त यांना पत्र पाठविले, कृषी आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्हा कृषी अधिकारी बीड यांनी पुनर्विचार कार्यवाहीबाबत कळवले परंतू अद्याप पर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून तक्रारदारास सदर तक्रार दाखल करावी लागली.
सामनेवाला क्र.1 हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांच्या कथनेनुसार महाराष्ट्र शासनाने 10 ते 75 वयोगटातील खातेदार शेतक-याचा शेतकरी जनता अपघात विमा शासनाने आयोजित केलेली आहे.सदर विम्याचा कालावधी दि.15.08.2009 ते 14.08.2010 या कालावधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा उतरलेला आहे. तक्रारदाराचा मुलगा विहीरीत पडल्यामुळे दि.08.06.2010 रोजी मयत झाला. सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडे दि.22.09.2010 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.2 कडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आलेला आहे. तक्रारदारास नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.3 यांची असल्यामुळे सामनेवाला क्र.1 विरुध्द तक्रार खारीज करण्यास न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे.
सामनेवाला क्र.2 कबाल ब्रोकींग इन्शुरन्स हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांच्या कथनेनुसार सदर प्रस्ताव त्यांना दि.11.10.2010 रोजी मिळालेला असून त्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्यास सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास वेळोवेळी कळवलेले आहे. तक्रारदाराने कागदपत्राची परिपुर्तता केली नसल्यामुळे सदर प्रस्ताव हा विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. त्या अगोदर दि.31.12.2010 रोजी विमा कंपनीने प्रस्ताव नाकारलेला आहे. तदनंतर तक्रारदार यांनी कागदपत्राची परिपुर्तता केली व ते सर्व कागदपत्र सामनेवाला क्र.3 यांना पाठविले.
सामनेवाला क्र.3 हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदार यांनी सदर प्रस्ताव हा विहीत मुदतीत दाखल केला नाही. प्रस्तावात आवश्यक असलेल्या कागदपत्राची परिपुर्तता विहीत मुदतीत केली नाही. तसेच वयाचा दाखला, बँक पासबुक, पोलीस पाटील यांचा रिपोर्ट, इत्यादी कागदपत्र प्रस्तावासोबत नव्हते. तक्रारदाराने सदर प्रस्ताव हा दि.14.11.2010 रोजी म्हणजे 90 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर दाखल केला आहे. सदर प्रस्ताव अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे नाकारण्यात आलेला आहे. म्हणून सदर तक्रारही खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र व तक्रारदार यांनी केलेला युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचा जबाब याचे अवलोकन केले असता, त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली, ही बाब सिध्द केली आहे काय? होय.
2) तक्रारदार यांना, सामनेवाला यांनी सेवा
देण्यामध्ये त्रुटी ठेवलेली आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी गाव नमुना 8 अ चा उतारा, 7/12 चा उतारा, फेरफार नक्कल, दाखल केली. सदरील कागदपत्राचे अवलोकन करता असे निदर्शनास येते की, मयत राजाभाऊ आश्रुबा भांगे हा शेतकरी होता व त्याचे नावे सातेफळ ता.केज जि.बीड येथे शेतजमीन आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपरचे अवलोकन केले. त्या कामी घेतलेला जबाब याचे अवलोकन केले असता, असे निदर्शनास येते की, मयत राजाभाऊ आश्रुबा भांगे हे विहीरीजवळ पाणी पिण्यासाठी गेले असता त्याचा तोल जाऊन, पाय घसरुन, विहीरीत पडून, पाण्यात बुडून, मरण पावला आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे ही बाब स्पष्ट नमुद केली आहे. सबब मयत राजाभाऊ आश्रुबा भांगे हे शेतकरी होते व तो विहीरीत पडून, पाण्यात बुडून मयत झाला ही बाब सिध्द होते.
तक्रारदार यांनी शपथपत्रामध्ये केलेल्या कथनेनुसार त्यांचा मुलगा मयत झाल्यानंतर त्यांनी सामनेवाला क्र.1 कडे दि.11.08.2010 रोजी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. सामनेवाला क्र.1 यांनी सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांच्यामार्फत सामनेवाला क्र.3 कडे पाठविला. तसेच सामनेवाला क्र.2 यांच्या निर्देशानुसार तक्रारदाराने वेळोवेळी पुर्ण कागदपत्राची पुर्तता केली असे असताना सुध्दा सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास दि.31.12.2010 च्या पत्रानुसार कळविले आहे की, अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे व ते दि.14.11.2010 पर्यंत न दिल्यामुळे नुकसान भरपाई देऊ शकत नाही. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली असताना सुध्दा सामनेवाला क्र.3 यांनी कोणतेही संयुक्तीक कारणाविना तक्रारदाराचा प्रस्ताव निकाली काढला आहे. तक्रारदार यांनी सदर प्रस्तावावर पुनर्विचार करण्यासाठी विमा कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतू सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले नाही. सबब सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केला आहे.
सामनेवाला क्र.1 यांचे शपथपत्रामध्ये तक्रारदार यांचेकडून तो प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविल्याबाबत कळवले. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या कथनेनुसार त्यांना दि.11.10.2010 रोजी तक्रारदार यांचा प्रस्ताव मिळाला, त्यामध्ये काही कागदपत्राची अपुर्णता होती म्हणून तक्रारदार यांना वेळोवेळी कळवले. तक्रारदार यांनी कागदपत्र हजर केले नाही म्हणून त्यांनी दि.21.12.2010 रोजी सदर प्रस्ताव सामनेवाला क्र.3 कडे पाठविला. सामनेवाला क्र.3 यांनी दि.31.12.2010 रोजी तक्रारदार यांचा अर्ज निकाली काढला. सामनेवाला क्र.2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तदनंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्राची पुर्तता केली व ते सर्व कागदपत्र सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याकडे पाठविले. सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचे शपथपत्रात नमुद केले आहे की, तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही. म्हणून तक्रारदाराचा प्रस्ताव दि.31.12.2010 रोजी नामंजूर केला.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन करता असे निदर्शनास आले की, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला व तो प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांच्याकडे सामनेवाला क्र.1 यांनी पाठविला ही बाब निष्पन्न होते. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना काही कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी कळवले होते तसेच तक्रारदार यांना त्या बाबतीत पत्र ही पाठविले होते. तदनंतर तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता सामनेवाला क्र.2 यांच्याकडे केली. सामनेवाला क्र.2 यांनी सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.3 यांच्याकडे पाठविले परंतू त्या आधीच सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा प्रस्ताव नामंजूर केला होता. तक्रारदार यांनी सदर प्रस्तावावर फेरविचार करावा याबाबत सामनेवाला क्र.3 यांच्याकडे विनंती केली होती. परंतू सामनेवाला क्र.3 यांनी त्यांच्या मागणीस किंवा विनंतीस कोणतही दाद दिली नाही व त्या बाबत कोणतीही दखल घेतली नाही.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत याचा मुख्य उददेश शेतक-यांना त्याचा लाभ मिळावा व शेतकरी अपघातात मयत झाल्यास त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी हा आहे. सदर योजना ही शेतक-याच्या हितासाठी आयोजित केलेली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी अपूर्ण कागदपत्रे असल्याबाबत तक्रारदार याला कळविले नाही. त्याबाबत तक्रारदारास कळविणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांच्याकडे सामनेवाला क्र.2 मार्फत सर्व कागदपत्रे पाठविली असतानाही सामनेवाला क्र.3 यांनी सदर प्रस्तावावर योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी होती. तसेच तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला होता व विमा कंपनीने तक्रारदार यांचे अर्जावर पुनर्विचार करणेबाबत निर्देश दिले होते परंतू सामनेवाला क्र.3 यांनी कोणतीही दखल घेतली नाही. या मंचाचे मत असे की, सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे. म्हणून तक्रारदार हे रक्कम रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तसेच सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत कसूर केल्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे त्यासाठी रक्कम रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात
विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रु. एक
लाख) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्कम
विहीत मुदतीत न दिल्यास संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून
वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.3 यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष