निकाल
दिनांक- 01.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार श्रीमती चंद्रकला भुजंग राख यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे पती भुजंग ज्ञानोबा राख हे थेरला ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी होते. मयत भुजंग हे शेतकरी होते.दि.19.02.2011 रोजी तक्रारदार यांचे पती पाटोदा येथून थेरला येथे वाहनाने येत असताना त्यांचे वाहनांचा अपघात झाला व ते जागीच मृत्यू पावले. सदरील अपघातात बाबत पाटोदा पोलिस स्टेशन मध्ये कळविण्यात आले.पाटोदा पोलिस स्टेशन अधिका-याने अपघाताची नोंद करुन त्यांची चौकशी केली व तक्रारदार यांचे पतीच्या मृत्यू बाबत नोंद केली. तक्रारदार यांचे पतीचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिका-याने केले व शव तक्रारदार यांचे ताब्यात देण्यात आले.
तक्रारदार यांचे पूढील कथन की, त्यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविली होती.सदर योजने अंतर्गत सर्व शेतक-यांचा विमा काढला आहे. त्यांची अंमलबजावणी शासना मार्फत संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत न्यू इंडिया एशोरंन्स कंपनी यांचे संयूक्त विद्यमाने अंमलबजावणी केली जात आहे. तक्रारदार यांचे कथन की, त्यांचे पती अपघातात मयत झाल्यानंतर त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्या ज्या कागदपत्रांची आवश्यकता होती ते जोडून रितसर अर्ज केला. तो अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेकडून सामनेवाले क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांचेकडे पाठविण्यात आला. सामनेवाले क्र.2 यांनी विमा दावा नामंजूर केला या बाबत तक्रारदारांना दि.27.07.2011 रोजी कळविण्यात आले आहे. दावा नामंजूर करताना मयताचे नांवे दि.01.01.2011 रोजी फेरफार मंजूर झालेले असून तो फेरफार दि.15.08.2010 रोजी नसलेचे कळविले. तक्रारदार यांचे मते सामनेवाले क्र.2 यांनी कायदेशीर बाबी विचारात न घेता तक्रारदार यांचा दावा नामंजूर केला आहे. सदरील कृती ही सेवेत कसूर करणारी आहे. तक्रारदार यांचा दावा नामंजूर करण्यास कोणतेही संयूक्तीक व कायदेशीर कारण नव्हते. सबब, तक्रारदार यांची विनंती की, विमा अंतर्गत रक्कम रु.1,00,000/-व त्यावरील व्याज देण्या बाबत सामनेवाले यांना निर्देश देण्यात यावेत. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व खर्चापोटी रक्कम व रु.2,000/- देण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत.
सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांनी दि.14.03.2013 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांचेकडून प्राप्त झालेला प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविला आहे व तक्रारदार यांना वेळोवेळी सहकार्य केले आहे असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रूटी केलेले आहे ही बाब नाकारलेली आहे.
सामनेवाले क्र.2 एशोरंन्स कंपनी यांनी दि.13.7.2013 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, मयत यांचे नांवे दि.01.01.2011 रोजी शेत जमिन नोंदविण्यात आली आहे. नियमाप्रमाणे मयताचे नांवे दि.15.08.2010 पूर्वी शेत जमिन असणे गरजेचे आहे. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, त्यांनी तक्रारदार यांचा दावा योग्य व वाजवी कारणासाठी नाकारला आहे. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नाही त्यामुळे सदरील तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकिल श्री. राख यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र व त्यांचे वकील श्री. महाजन यांचा यूक्तीवाद ऐकला. खालील मुददे न्यायनिर्णयासाठी उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. मयत भुजंग ज्ञानोबा राख हे मृत्यू समयी शेतकरी
होते काय ? होय.
2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांचा दावा नाकारुन
सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
सामनेवाले क्र.2 यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती दि.19.02.2011 रोजी मयत झाले. तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 मार्फत सामनेवाले क्र.2 कडे विमा दावा दाखल केला आहे. त्यांची छाननी केली असता मयत भुजंग ज्ञानोबा राख यांचे नांवे शेत जमिन दि.01.01.2011 रोजी नोंदविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. नियमाप्रमाणे विमा मंजूरीसाठी शेत जमिन दि.15.08.2010 रोजी शेतक-याचे नांवे असणे गरजेचे आहे. सामनेवाले क्र.2 यांचे वकिलांनी सदरील दावा वैधानिक कारणासाठी नाकारला आहे असा यूक्तीवाद केला. त्या विरुध्द तक्रारदार यांचे वकीलांनी महाराष्ट्र शासन व शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना या संबंधी कागदपत्र याकडे मंचाचे लक्ष वेधले. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला कडे दाखल केलेले संपूर्ण कागदपत्राकडे मंचाचे लक्ष वेधून यूक्तीवाद केला की, तक्रारदाराचे पती भुजंग हे जन्मापासून शेतकरी होते. त्यांचे नांवे शेत जमिन होती.केवळ फेरफार नोंद दि.01.01.2011 रोजी करण्यात आली यावरुन मयत हे शेतकरी नव्हते असे म्हणता येणार नाही. तसेच सदरील अपघात हा दि.19.02.2011 रोजी झाला व त्यादिवशी तक्रारदाराचे पती मयत झाले असा यूक्तीवाद केला.
संपुर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता या मंचाचे असे निदर्शनास येते की, मयत भुजंग यांचा मृत्यू अपघाताने झाला आहे. सदरील मयत इसम हा मयत झाला त्यादिवशी शेतकरी होता व तसेच शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची विमा रक्कम मिळण्यास आहे. सामनेवाले क्र.2 यांनी ज्या कारणास्तव तक्रारदाराचा दावा नामंजूर केला आहे त्यासाठी कोणतेही अगर जीआर इन्शुरन्स पॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केल्या नाहीत. त्यामुळे सामनेवाले क्र.2 यांनी जो बचाव घेतला तो स्विकारता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे संपुर्ण कागदपत्र पाठवित असतानाही व त्यामध्ये कोणतीही त्रुटी नसताना ते नामंजूर करण्यास कोणतेही संयूक्तीक व वाजवी कारण नव्हते. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांचा दावा नामंजूर करुन सेवत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदार सामनेवाले क्र.2 यांचेकडून विमा अंतर्गत मिळणारी रककम, दाव्याचा खर्च व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
वरील विवेचनावरुन मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व त्यावर तक्रार दाखल दि.01.11.2012 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावे.
3. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.