निकाल
दिनांक- 03.02.2014
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार सुनिता गोविंद गिते यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदाराचे पती नामे गोविंद ज्ञानोबा गिते रा.नंदागौळ ता.परळी येथे त्यांचे नावे गट नं.216, 232, 396 मध्ये जमीन आहे. तक्रारदाराचे पती शेती व्यवसाय करत होते. तक्रारदार यांच्या पतींना मनोविकाराचा आजार होता. आठ वर्षापासून डॉ.दिनेश पाटील लातूर यांचेकडे त्याबाबतचा इलाज, औषधोपचार चालू होता. दि.04.09.2010 रोजी संध्याकाळी मयताचे औषध घरामध्ये खिडकीत ठेवलेले होते व शेतामध्ये विषारी औषधांची बाटली गावाकडे कापसावर फवारण्यासाठी औषध जवळ आणून ठेवलेले होते. मयताने दररोज प्रमाणे त्यांचे औषध घेण्याऐवजी नजरचुकीने विषारी औषधांची बाटली घेऊन पिण्यात आली. त्यामुळे तक्रारदारास वांत्या झाल्या. तदनंतर तक्रारदारास प्रथम केज येथे सरकारी दवाखाना, अंबाजोगाई येथे शरीक करण्यात आले, तेथून तक्रारदारास अंबाजोगाई येथे वार्ड क्र.10 मध्ये शरीक केले. इलाज चालू असताना दि.05.09.2010 रोजी तक्रारदार यांचे पती मयतझाले. त्याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशन केज यांचेकडे दाखल केली आहे. त्यांचा आकस्मिक मृत्यू नं.45/2010 कलम 174 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनअंतर्गत विमा उतरविलेला आहे. सदरील योजनेचा कालावधी सन 15.08.2010 ते 14.08.2011 असा आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर सामनेवाला क्र.1 कडे पूर्ण कागदपत्रासह विमा रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव दाखल केला आहे, सदर प्रस्ताव हा सामनेवाला क्र.2 कडे पाठविण्यात आला. सामनेवाला क्र.2 यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.3 कडे पाठविला. विमा रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.3 ची आहे. सामनेवाला क्र.3 यांनी दि.02.02.2012 रोजी पत्र देऊन तक्रारदाराचा विमा दावा नाकारण्यात आल्याचे कळविले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 कडे जाऊन सदर प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची विनंती केलेली आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव नाकारल्यामुळे तक्रारदारास शारिरिक, मानसिक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाला क्र.1 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदार सुनिता गोविंद गिते यांनी त्यांचे मयत पती गोविंद ज्ञानोबा गिते यांचे वारसदार असल्याने व शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव या कार्यालयास सादर केला होता. त्या प्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव हा सामनेवाला क्र.1 मार्फत सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात आला. कागदपत्राची शहानिशा करुन पाठविण्याची जिम्मेदारी ही सामनेवाला क्र.1 ची असते. शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे विमा दावा मंजूर करणे किंवा नाकारणे हा अधिकार विमा कंपनीचा आहे. सामनेवाला क्र.1 ची जबाबदारी योजनेचा प्रसार व प्रचार करण्याचा आहे. सबब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला आहे असे म्हणता येणार नाही.
सामनेवाला क्र.2 डेक्कन इन्शुरन्स व रिइन्शुरन्स ब्रोकिंग प्रा.लि., यांनी मंचासमोर आपले लेखी म्हणणे पोस्टाद्वारे पाठविलेले आहे. त्यांच्या कथनेनुसार त्यांचे कार्य विमा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 कडून स्विकारणे व त्याची शहानिशा करुन सदरचा प्रस्ताव हा विमा कंपनीकडे पाठविणे एवढे आहे. जर सदर प्रस्तावात काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत तक्रारदारास कळविण्याचे कार्य सामनेवाला क्र.2 यांचे आहे. सामनेवाला क्र.2 हे सेवा पुरविण्याचे काम करतात. सबब सामनेवाला क्र.2 यांचेवर कोणतीही जबाबदारी नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांनीसेवा देण्यात कसूर ठेवली आहे असे म्हणता येणार नाही.
सामनेवाला क्र.3 मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्याचेसोबत कंपनीचे वरीष्ठ मंडळ प्रबंधक, विश्वास बन्सी गायकवाड यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदार हया सदर विमा दाव्याची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तसेच तक्रारदार यांचे पती हे मनोरुग्ण असल्यामुळे त्यांचेवर औषधोपचाराचा इलाज चालू होता. तक्रारदार यांचे पती यांनी दि.04.09.2010 रोजी विष प्राशन केले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मिळण्याबाबत विमा प्रस्ताव दाखल केला होता. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचे दाखल केलेले पोलीस पेपर हे शेतकरी व्यक्तीगत विमा योजनेच्या पॉलीसी संदर्भात पडताळून पाहिले असल्यास सदर पॉलीसीच्या शर्तीनुसार जर शेतकरी हा अपघातात मरण पावला असल्यास विमा रक्कम देण्यात येते. सदर पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला असल्यास त्या शेतक-यास विमा रक्कम देता येत नाही. सदर तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी दि.16.09.2010 रोजी पोलीसाकडे जबाब दिला आहे. त्यानुसार मयत हा मनोरुग्ण होता, सबब मनोरुग्ण असल्यामुळे सदर शेतकरी हा विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार यांच्या पतीचे मयताचे कारण, त्याचा विचार केला असता सामनेवाला क्र.3 यांनी सदर मयत हा पॉलीसीच्या शर्ती व अटी मध्ये समाविष्ट नाही. म्हणून सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारलेला आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत 8 अ चा उतारा, 7/12 उतारा, गाव नमुना फेरफार नक्कल, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग अंबाजोगाई येथील पत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केला आहे. तक्रारदाराने पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले. तसेच उपचार घेतल्याबाबतचे कागदपत्र दाखल केले आहे. तसेच दिपक प्रभाकर साखरे व बाळासाहेब दत्तू गिते यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1, 2 व 3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत तसेच सामनेवाला क्र.3 चे वकील श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1, 2 व 3 यांचे जबाबाचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांनी, त्यांचे मयत पती हयांना
मनोविकाराचा आजार होता, ही बाब सिध्द
केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार यांना, सामनेवाला यांनी सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे काय? नाही.
3) तक्रारदार हया तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र आहे काय? नाही.
4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार यांचे पती हे शेतकरी होते त्यांच्या नावे शेतजमीन होती. जवळपास आठ वर्षापासून तक्रारदाराचे पती हे मनोरुग्ण होते. त्यांना मनोविकाराचा आजार असल्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार चालू होते. तक्रारदाराचे मयत पती यांनी शेतातील कापूस फवारणीसाठी औषध आणले होते, कापूस फवारणीसाठी आणलेले औषध हे मयत याने स्वतःच्या औषधाच्या बाटलीजवळ ठेवले. दररोज प्रमाणे मयताने त्याचे स्वतःचे औषध घेण्याऐवजी नजरचुकीने विषारी औषधाची बाटली औषध समजून घेतली. तदनंतर तक्रारदाराचे मयत पती हयांना सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे शरीक करण्यात आले, तेथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांचे पती शेतकरी होते. त्यांच्या निधनानंतर तक्रारदार याने महाराष्ट्र शासनाने राबवलेली शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी सामनेवाला क्र.1 हयांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा विमा दावा संयुक्तीक कारणाशिवाय नाकारला आहे.
सामनेवाला क्र.3 यांचे वकील श्री.वाघमारे यांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार यांचे मयत पती यांनी नजरचुकीने विषारी औषध घेतल्यामुळे मयत झाले. महाराष्ट्र शासनाने राबवलेली शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या पॉलीसीप्रमाणे या घटनेसंदर्भात विमाधारकाला दावा रक्कम देता येत नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र यांचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांच्या मयत पतीच्या नावावर मौजे नंदागौळ ता.परळी या ठिकाणी शेतजमीन आहे, ते व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या वतीने सामनेवाला क्र.3 यांच्याकडे विमा रक्कम भरलेली आहे. तक्रारदार याने सामनेवाला क्र.1 कडे विमा प्रस्ताव दाखल केला.सदर प्रस्ताव हा सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांच्या मयत पतीने नजरचुकीने विषारी औषध घेतल्यामुळे या घटनेसंदर्भात विमाधारकाला रक्कम देता येत नाही. म्हणून तक्रारदार यांचा दावा नाकारला आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपरचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे मयत पती हे साने गुरुजी विद्यालय, केज येथे 1995 पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. तक्रारदार यांचे मयत पती हे मनोविकाराच्या आजाराने त्रस्त असताना सुध्दा ते शिक्षक म्हणून नोकरी करत होते. तक्रारदार यांनी दाखल केलेला घटनास्थळ पंचनामा याचे अवलोकन केले. सदर पंचनामामध्ये दर्शविण्यात आलेला घटनेच्या ठिकाणाचा नकाशा याचे अवलोकन केले असता त्या ठिकाणी कोणतीही खिडकी दर्शविलेली नाही. तसेच औषधाच्या बाटल्या हया सुध्दा दर्शविल्या नाही व पोलीसांनी त्या जप्त केलेल्या नाही. तसेच तक्रारदार यांनी कापूस फवारणीसाठी खरेदी केलेल्या औषधाचे नाव काय व सदरची औषधी केव्हा खरेदी केलेली होती त्याबाबतचे कागदपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. तक्रारदार यांचे मयत पती हयांना मनोविकाराचा आजार होता ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी मनोविकार तज्ञांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मंचासमोर दाखल केले नाही जेणेकरुन ही बाब सिध्द होऊ शकली असती. तक्रारदार यांनी दाखल केलेले दिपक प्रभाकरराव साखरे व बाळासाहेब दत्तू गिते यांचा जबाब सदर कागदपत्रावर पोलीस स्टेशनचा केज येथील शिक्का नाही, सबब ते ग्राहय धरता येणार नाही. यावरुन तक्रारदार यांनी शिक्षकांना सांगून जबाब देण्यास सांगितले आहे असे निदर्शनास येते. तक्रारदाराचे तोंडी कथन स्विकार्य करता येत नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हयांनी त्यांचे मयत पती यांना मनोविकाराचा आजार होता ही बाब सिध्द करु शकले नाही. सबब सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार हयांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड