निकालपत्र
दिनांक 10.12.2013
(घोषित द्वारा ः-श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार भिमराव नाना मोरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत लाभ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचा मुलगा नामे शिवाजी भिमराव मोरे हा पांचग्री ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे. दि.6.7.2008 रोजी तक्रारदार यांचा मुलगा विहीरीत पडून मृत्यू पावला. सामनेवाले क्र.3 यांनी शासनाचे जी.आर नुसार सर्व शेतक-यांचा विमा काढलेला आहे. तक्रारदार यांनी मुलाचे मृत्यू बददल सामनेवाले क्र.1 यांचेकडे सर्व कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. विमा दाव्या सोबत 7/12, 8-अ चा उतारा, म्यूटेशन नोंद, गाव नमुना नं.6 इत्यादी कागदपत्र दाखल केले. सामनेवाले क्र.1 यांनी विमा दावा सामनेवाले क्र.2 कडे पाठविला. तक्रारदार यांनी पुन्हा दि.7.11.2008 रोजी सामनेवाले क्र.2 यांना अर्ज देऊन विमा दावा रक्कमेची मागणी केली. परंतु तक्रारदाराच्या अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी दि.14.6.2011 रोजी वकिलामार्फत सामनेवाले यांना नोटीस पाठविली. परंतु त्यानी कोणतीही दखल घेतली नाही.म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांचे मुलाचे अपघाती मृत्यू बददल शेतकरी वैयक्तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून 12 टक्के व्याजासहीत मिळावेत, तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5000/- मिळावेत व तक्रारीचा खर्च मिळावा.
सामनेवाले क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे.तक्रारदार यांचा अर्ज दि.2.9.2008 मधे सामनेवाले क्र.2 यांनी दि.18.10.2008 अन्वये त्रुटीची पुर्तता करणेस सामनेवाले क्र.1 यांना कळविले. दि.18.10.2008 रोजी ची प्रत तक्रारदार यांना दि.1.12.2008 रोजी देऊन कागदपत्राची पुर्तता करुन सामनेवाले क्र.1 कडे देण्यास कळविले.सामनेवाले क्र.2 यांनी त्रूटीची पूर्तता झाली नसल्याचे स्मरणपत्र दि.7..11.2008 रोजी तक्रारदारास दिले.शासनाचे निर्देशानुसार सदर प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी पाटोदा यांना दि.18.2.2009 रोजी हस्तांतरीत केला. तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता केलेली नसल्यामुळे सामनेवाले क्र.1 अथवा तालुका कृषी अधिकारी यांना सामनेवाले क्र.2 कडे कागदपत्र सादर करता आली नाहीत. दि.9.4.2009 रोजी व दि.13.4.2009 रोजी परत सामनेवाले क्र.1 यांना कागदपत्राची पूर्तता करण्यास कळविले. तक्रारदार यांनी दि.1.12.2009 ते अद्याप पर्यत कागदपत्राची पुर्तता केली म्हणून सामनेवाले क्र.1 व 2 यांनी कार्यवाही केली नाही हे म्हणणे योग्य नाही.सदर प्रकरणात सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत त्रूटी केलेली नाही म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोस्टाने दाखल केले. तक्रारदाराचे मूलाचा अपघात दि.6.7.2008 रोजी झाला. त्यांचा विमा दावा दि.24.9.2008 रोजी प्राप्त झाला. परंतु तो विमा दावा कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे दि.18.10.2008, 7.11.2008, व 4.4.2009 रोजी कळविण्यात आले. नंतर विमा दावा सामनेवाले क्र.3 कडे पाठविण्यात आला. सामनेवाले क्र.3 यांनी अपूर्ण कागदपत्र असल्याबददल दि.23.6.2010 रोजी कळविले परंतु तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्र दाखल केले नाही. त्यामुळे विमा दावा प्रलंबीत ठेवण्यात आला आहे.
सामनेवाले क्र.3 यांनी आपले लेखी म्हणणे विहीत मुदतीत दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द नो से चा आदेश झाला. सामनेवाले क्र.3 यांनी दिपेश सुधीर करवीर यांचे शपथपत्र दाखल केले. त्यांचे कथनेनुसार, तक्रारदार यांचा मूलगा अपघाती मृत्यू पावले हे त्यांनी सिध्द करावे. त्यांनी दि.15.8.2007 ते दि.14.7.2008 या कालावधीसाठी शेतक-याचा विमा उतरविलेला होता हे मान्य आहे.तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रे सामनेवाले क्र.1 यांचेकडे पाठविली नाहीत. तक्रारदार यांचा मुलगा शेतकरी होता हे सामनेवाले क्र.3 यांना मान्य नाही. सामनेवाले क्र.3 यांना तक्रारदार यांचा विमा दावा योग्य एजन्सी मार्फत आलेला नाही.त्यामुळे त्याचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही. त्यांनी तक्रारदार यांचा दावा मंजूर अथवा नामंजूरही केलेला नाही.त्यामुळे तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही.तक्रारदार यांचा विमा दावा घटनेनंतर 90 दिवसांत दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी त्याचा विमा दावा योग्य वेळेत दाखल केलेला नाही.तक्रारदाराची तक्रार ही दोन वर्षानंतर दाखल झाली आहे. विंलब झाल्याबाबल कोणताही विलंब माफीचा अर्ज दिलेला नाही.तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीचे पूष्टयर्थ स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे, तसेच नि.4 अन्वये कागदपत्र दाखल केले आहेत.सामनेवाले क्र.3 यांनी दिपेश सुधिर करविर यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार व सामनेवाले क्र.3 यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांचे सेवेत त्रूटी आहे ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय ? नाही.
3. तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.घाडगे यांनी युक्तीवाद केला. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. युक्तीवादात सांगितले की, तक्रारदाराचा मुलगा नामे शिवाजी भिमराव मोरे यांचे निधनानंतर तक्रारदार यांने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गतच्या योजनेची विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी तक्रारदार यांने सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी कडे कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सदर प्रस्ताव हा सामनेवाले क्र.2 यांच्याकडे सादर केला. सामनेवाले क्र.2 यांच्या मार्फत कागदपत्राची शहानिशा करुन सामनेवाले क्र.3 म्हणजे विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. परंतु सदर प्रस्तावात सामनेवाले क्र.2 यांनी सदर प्रस्तावात आवश्यक कागदपत्राची त्रुटी असल्याचे तक्रारदारास कळविले होते. तक्रारदाराचे वकील युक्तीवाद करत असताना त्यांनी सांगितले की, आम्हाला असे कोणतेही पत्र सामनेवाले क्र.2 यांचे मिळाले नाही म्हणून आम्ही कागदपत्राची पुर्तता करु शकलो नाही.
सामनेवाले क्र.2 कबाल इन्शुरन्स कंपनी यांनी दाखल केलेला नि.6 चा जवाबाचे अवलोकन केले. तक्रारदार यांना वेळोवेळी कळवून सुध्दा तक्रारदार यांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची पुर्तता केली नाही. सबब विमा दावा सामनेवाले क्र.3 यांना पाठविण्यात आला. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारास कागदपत्राच्या पुर्ततेसाठी कळविले. वेळोवेळी कळवून सुध्दा तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता केली नाही. सबब, विमा दावा निकाली काढला आला नाही.सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदारास खालील नमुद केलेल्या कागदपत्राची मागणी केलेली आहे.
1. नुकसान भरपाई अर्ज, दावा अर्ज, व्यवस्थित भरणे गरजेचे आहे लाभार्थीच्या बँकेच्या तपशील सहीत मुळ प्रत.
2. तहसीलदार प्रमाणपत्र मयताच्या नावांचे तहसीलदारचा गोल शिक्का व सही आवश्यक मुळ प्रत.
3. 7/12,8-ब,6-क, चा उतारा ज्यावर मयत व्यकतीचे नांव समाविष्ट असणे गरजेचे आहे मुळ प्रत.
4. मृत्यू प्रमाणपत्र मुळ प्रत.
5. (एफ.आय.आर.) प्रथम माहीती अहवाल पोलिस अधिका-याने सांक्षाकीत केलेला पाहिजे.
6. मयताच्या नावांवर जमिन कशी आली त्यांच्या नांवाचा फेरफार नक्कल मुळ प्रत.
वर नमुद केलेले कथन व सामनेवाले क्र.1 व 2 यांचा जवाब तसेच सामनेवाले क्र.3 यांनी दिपेश सुधीर करविर यांचे शपथपत्र यांचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव पुर्ण कागदपत्रासह मिळाला नाही.सबब प्रस्ताव हा निकाली काढण्यात आला नाही. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे ही बाब सिध्द होत नाही. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात योजना ही शेतक-यांच्या हितासाठी आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांच्या कडे पुन्हा रितसर अर्जासहीत कागदपत्राची पुर्तता करुन दाखल करण्यास परवानगी दिल्यास सामनेवाले यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तक्रारदार यांनी खाली नमूद केलेले कागदपत्र जोडून संपूर्ण अर्ज रितसर सामनेवाले क्र.3 यांच्याकडे सादर करावा.
1. नुकसान भरपाई अर्ज, दावा अर्ज, व्यवस्थित भरणे गरजेचे आहे लाभार्थीच्या बँकेच्या तपशील सहीत मुळ प्रत.
2. तहसीलदार प्रमाणपत्र मयताच्या नावांचे तहसीलदारचा गोल शिक्का व सही आवश्यक मुळ प्रत.
3. 7/12,8-ब,6-क, चा उतारा ज्यावर मयत व्यकतीचे नांव समाविष्ट असणे गरजेचे आहे मुळ प्रत.
4. मृत्यू प्रमाणपत्र मुळ प्रत.
5. (एफ.आय.आर.) प्रथम माहीती अहवाल पोलिस अधिका-याने सांक्षाकीत केलेला पाहिजे.
6. मयताच्या नावांवर जमिन कशी आली त्यांच्या नांवाचा फेरफार नक्कल मुळ प्रत.
तक्रारदार यांनी वर नमूद केलेले कागदपत्र जोडहून रितसर विमा दावा सामनेवाले क्र.3 यांच्याकडे सादर करावा. सामनेवाले क्र.3 यांनी सदर अर्जावर योग्य कार्यवाही करुन त्यावर योग्य निर्णय घ्यावा. तक्रारदार यांना तो निर्णय मान्य नसल्यास त्यांनी सदर मंचामध्ये सामनेवाले क्र.3 विरुध्द तक्रार करण्याचा हक्क राहील असे मंचाचे मत आहे. विमा इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा निकाली काढल्यानंतर त्या दिवसापासून तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास कारण घडले. परंतु सदर तक्रारीत विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा कोणत्या तारखेस निकाली काढला यांचा स्पष्ट उल्लेख नाही व त्याबाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर हजर केले नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारदार यांना निर्देश देण्यात येतो की, शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा विमा दावा अर्ज सर्व कागदपत्रासहीत सामनेवाले क्र.3 म्हणजे विमा कंपनी कडे निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत सादर करावा. सामनेवाले क्र.3 म्हणजे विमा कंपनी यांनी कागदपत्रासह विमा दावा प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आंत त्यावर निर्णय घ्यावा.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.