निकाल
दिनांक- 01.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे,सदस्या)
तक्रारदार रहिमाबेगम शेख मैनोद्यीन यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
तक्रारदार ही बीड येथील रहिवासी असून ती 80 वर्षाची म्हातारी आहे. तिचे पती मागील दहा वर्षापुर्वी मयत झाले आहेत. तक्रारदार हिने सामनेवाले यांचेकडून तिचे घरी विज जोडणी घेतली आहे. तिने कोटेशन साठी रु.1525/- सामनेवाले क्र.2 कडे भरल्यानंतर तिला जुन 2011 मध्ये विज जोडणी देण्यात आली. तिचा ग्राहक क्र.576010509962 आहे. तिने अनेक महिने विज बिल भरण्यासाठी बिल मिळण्याची प्रतिक्षा केली परंतु तिला विज बिल मिळाले नाही व तिचा दि.30.03.2012 रोजी विज पुरवठा खंडीत करण्यात आला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतेही बिल दिले नाही व कोणतीही कल्पना न देता तिचा विज पुरवठा खंडीत केला आहे. म्हातारी असल्यामुळे विज नसल्यामुळे तिला अनेक अडचणीला तोंड दयावे लागले. तक्रारदार हिने सामनेवाले यांना वकिलामार्फत दि.09.04.2012 रोजी नोटीस पाठून विज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदारास सदर तक्रार दाखल करणे भाग पडले.ती आजही मिळणारे बिल भरण्यास तयार आहे. तक्रारदार यांची मागणी की, तक्रारदाराची तक्रार मंजूर करावी व त्यांचा विज पुरवठा पुर्ववत करुन दयावा. तक्रारदार हिला सामनेवालांकडून मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा.
सामनेवाले क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दि.14.08.2012 रोजी दाखल केले. तक्रारदार ही सामनेवाले यांची ग्राहक आहे हे मान्य आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास माहे डिसेंबर 2011 पासून दरमहा विज बिले दिलेली आहेत. परंतु तक्रारदाराकडे विज देयकाची थकबाकी झाल्यामुळे तक्रारदाराचा विज पुरवठा दि.30.03.2012 रोजी तक्रारदारास पुर्व सुचना देऊन खंडीत करण्यात आलेला आहे. तक्रारदाराकडे एप्रिल 2012 च्या विज देयकात रु.5180/- थकबाकी दाखवलेली आहे. हे म्हणणे चुक आहे की, तक्रारदारास एकदाही विज देयक दिले नाही. जाणूनबूजून तक्रारदाराने विज देयक भरलेले नाहीत. तक्रारदारांच्या दि.09.04.2012 च्या नोटीसला सामनेवाले यांनी दि.27.04.2012 च्या अनुषंगाने उत्तरही दिलेले आहे. थकीत विज बिल भरावे व सामनेवाले यांना सहकार्य करावे तसेच बिल भरल्यास पुन्हा विज पुरवठा चाल करण्यात येईल असे कळविले होते. सामनेवाले यांनी एप्रिल 2012 चे विज देयक सोबत जोडले आहे, तरी तक्रारदाराने थकीत विज बिल भरलेले नाही. केवळ तक्रारदाराच्या चुकीमुळे विज पुरवठा बंद केला आहे. सामनेवाले यांचे सेवेत कोणतीही त्रुटी नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, विज कनेक्शन जोडून मिळावे म्हणून केलेला अर्ज, कोटेशन ची प्रत, नोटीसची प्रत, नोटीस मिळाल्याची पोस्टाची पोहच पावती इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.सामनेवाले क्र.1 व 2 यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ गणेश खंडु सामसे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच विज बिल, सीपीएल इत्यादी कागदपत्राच्या छायाकिंत प्रत दाखल केले आहेत.
तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? अंशतः.
2. तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्राचे व शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदारातर्फे अँड.विर आणि सामनेवाले क्र.1 व 2 यांचे तर्फे अँड.जानवळे यांचा यूक्तीवाद ऐकला. सबब, तक्रारदाराचे कथन असे आहे की, तक्रारदार यांनी जुन 2011 मध्ये सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडून विज जोडणी घेतली आहे. ही बाब सामनेवाले क्र.1 व 2 यांना मान्य आहे. तसेच तक्रारदाराचे कथन की, विज जोडणी दिल्यानंतर तक्रारदार यांना विज वापरा बाबत एकही विज देयक बिल मिळाले नाही व पुर्वसुचना न देता दि.30.03.2012 रोजी विज पुरवठा खंडीत केला आहे. तक्रारदाराचा आजपर्यत विज पुरवठा खंडीत आहे. शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे सदर विज देयक बिल मिळण्यासाठी कोणताही अर्ज केला नाही किंवा मागणी केली नाही व देयक मिळावे म्हणून कोणताही प्रयत्न केला नाही. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे कथन असे आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराला डिसेंबर 2011 पासून विज वापर बाबतचे विज देयक दिलेले आहे. त्या बाबतचे कागदपत्र सामनेवाले क्र.1 व 2 यांनी दाखल केले आहे. कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, जुन 2011 ला विज जोडणी दिल्यानंतर सामनेवाले क्र.1 व 2 यांनी डिसेंबर 2011 पासून ते एप्रिल 2012 चे देयक दिलेले आहे. जुलै ते नोंव्हेबर चे बिल तक्रारदराला दिलेले नाही. सबब सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला अशंतः सेवेत कसूर केला आहे. तसेच तक्रारदार यांचे जुन 2011 ते दि.30.03.2012 पर्यत विज पुरवठा सुरळीत होता व त्यांचा पुरेपूर लाभ तक्रारदारांनी घेतला आहे. त्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 व 2 यांना कोणतीही रककम दिली नाही.
तक्रारदार व सामनेवाले क्र.1 व 2 यांचे युक्तीवाद ऐकला असता असे निदर्शनास आले की, तक्रारदार हे विज बिल भरण्यास तयार आहे व सामनेवाले क्र.1 व 2 हे सुध्दा तक्रारदार यांला विज पुरवठा पुर्ववत चालू करुन देण्यास तयार आहे. सामनेवाले यांचे कथन असे आहे की, तक्रारदार यांनी विज देयकाची रक्कम भरावी.
त्यानंतर तक्रारदार यांचा विज पुरवठा पुर्ववत सूरु करुन देण्यात येईल. तसेच तक्रारदार हे सुध्दा विज देयकाची रक्कम भरण्यास तयार आहेत असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 यांनी डिसेंबर 2011 ते एप्रिल 2012 पर्यतचे विज देयक रु.5180/- दिलेले आहे. देयकाची रक्कम ही विज जोडणीपासूनची एकदम दिलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये एकूण थकबाकी म्हणून दिलेली आहे. सदरचे दिलेले देयकापोटी दिलेली रक्कम रदद करुन सामनेवाले क्र.1 व 2 यांनी बिल विज जोडणी पासून एप्रिल 2012 पर्यतचे कालावधीचे रु.3,000/- तक्रारदाराकडून देयकापोटी स्विकारावेत असे मंचाचे मत आहे.
वरील सर्व बाबी लक्षात घेऊन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराला दिलेले आदेशाप्रमाणे सामनेवाले क्र.1 व 2 यांचेकडे विज देयकाची रक्कम रु.3000/- भरावी व सामनेवाले क्र.1 व 2 यांनी विज देयकाची रक्कम भरल्यानंतर तात्काळ विज पुरवठा पुर्ववत सुरु करुन दयावा.
वरील सर्व विवेचनावरुन मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी व मुददा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. तक्रारदार यांनी विज जोडणी पासून ते एप्रिल 2012 या
कालावधीसाठीचे देयक रक्कम रु.3000/-(अक्षरी रुपये तिन हजार
फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत भरावेत, देयकाची
रक्कम रु.3000/- भरल्यानंतर सामनेवाले क्र.1 व2 यांनी
तक्रारदाराचा ग्राहक क्र.576010509962 चा विज पुरवठा तात्काळ सुरु
करुन दयावा.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.