(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 24.02.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्ता हा तक्रारीत नमुद पत्त्यावर राहत असुन त्याचे स्वतःचे मालकीचा गाळा क्र.6/48 आहे व त्याला लागून पत्नीचे नावाने सौ. मंदा आनंद मेश्राम हीचा गाळा क्र.6/47 आहे. सदर दोन्ही गाळक मौजा वांजरी, एकता कॉलोनी, यादव नगर, नागपूर येथे असुन हे दोन्ही गाळे नागपूर सुधार प्रन्यासच्या वांजरी घरकुल योजने अंतर्गत खसरा क्र.13/1-2 व 14, वार्ड नं.43, विभाग उत्तर असुन गाळा क्रमांक6/47 चा नगर भुमापन क्र.109 व शिट क्र.408/33 असुन दोन्ही गाळांचे क्षेत्रफळ 12.65 चौ.मीटर प्रत्येकी आहे. गाळा क्र.6/47 चा घर क्रमांक 15/1559/ग/1/6/47 व गाळा क्र. 6/48 चा घर क्रमांक 1560/ग/1/6/48 आहे. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार हे गवंडी (मिस्त्री) चे काम करीत असुन इमारतीच्या बांधकामाचे ठेका पध्दतीने कामे घेत असतात. तक्रारकर्त्याने सेवानिवृत्त शिक्षक श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांच्या ओळखीमुळे गैरअर्जदाराला घर बांधकामाचा ठेका दिला. त्यांनी पुढे नमुद केले आहे की, दि.22.06.2009 रोजी गैरअर्जदारांने ठरविलेल्या शर्ती व अटींनुसार एका को-या कागदावर करारनामा लिहून त्यावर तक्रारकर्त्याची सही घेतली. करारनामा तयार करण्या आधी दि.21.06.2009 रोजी श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांचे समक्ष घराचे बांधकामाचा प्रस्ताव दिला होता, सदर बांधकामाकरता रु.1,30,000/- देण्याचे ठरले त्यानुसार दि.22.06.2009 रोजी रु.5,000/- नगदी दिले. 4. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याला करारनाम्याची प्रत गैरअर्जदाराने दिली नाही, तक्रारकर्त्याने वेळोवेळी गैरअर्जदाराला रु.1,02,000/- दिले. परंतु ठरल्याप्रमाणे गैरअर्जदाराने बांधकाम केले नाही व फक्त रु.70,000/- एवढया रकमेतुन बांधकाम दि.19.09.2009ा पर्यंत केल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिल्याचे तक्रारकर्त्याने नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले आहे की, उर्वरित बांधकाम त्यानं श्री.रुपेशसिंग शंकरसिंग ठाकूर व प्रभु पाटील यांचेकडून करुन घेतले व त्याकरता रु.15,000/- व रु.25,000/- दिले. तक्रारकर्ता गैरअर्जदाराने बांधकाम न केल्यामुळे उर्वरित पैशांची मागणी करण्या करता गेला असता गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याबाबतची तक्रार तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशनला दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीच्या माध्यमातुन गैरअर्जदारांनी घेतलेले अतिरिक्त रु.32,000/- व इतरांकडून बांधकाम करण्याकरता आलेला खर्च, शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.50,000/- तसेच इतर खर्चाची मागणी केलेली आहे. 5. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 6. गैरअर्जदाराने आपल्या प्रार्थमिक आक्षेपात आवश्यक पक्ष म्हणून सौ. मंदा आनंद मेश्राम हिला पक्ष न केल्यामुळे सदर तक्रार खारिज करावी असे म्हटले आहे. तसेच त्यांनी इतर बाबींवर आक्षेप घेतलेले आहेत. सदर व्यवहार हा तोंडी स्वरुपाचा असल्यामुळे मंचासमक्ष चालविता येत नसल्याचे नमुद केले आहे. इतर तक्रारकर्त्याचे म्हणणे अमान्य केले असुन गैरअर्जदार हा मजूरीचे काम करतो असे म्हटले आहे व सदर तक्रार खारिज करण्यांची विनंती केलेली आहे. 7. सदर तक्रार मंचासमक्ष दि.30.11.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व दोन्ही पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 8. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याने गेरअर्जदारांना बांधकामाचा कंत्राट दिला होता व सदर कंत्राट हा रु.1,30,000/- चा होता ही बाब स्पष्ट करणारा कोणताही लेखी करारनामा मंचासमक्ष नाही. तक्रारकर्त्याने करारनामा झाला असे नमुद केले आहे परंतु त्याची प्रत गैरअर्जदारांकडे होती व त्यांनी तक्रारकर्त्यास दिली नाही असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षात करारनामा करुन घेते वेळेस बांधकामाच्या अटी, शर्ती व करारनामा हे तक्रारकर्त्याचे जवळच असने गरजेचे होते. 9. तक्रारकर्त्याने करारनामा झाला होता ही बाब सिध्द करण्याकरता श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्रावरुन दोन्ही पक्षांमध्ये रु.1,30,000/- त बांधकाम करण्याचा करार झाला होता असे नमुद केले आहे. परंतु तो करारनामा प्रतिज्ञार्थी श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांचे समक्ष झाला होता ही बाब तपासणे गरजेचे आहे. कारण तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीतील कथनात करारनामा हा दि.22.06.2009 रोजी झाल्याचे म्हटले आहे व त्या आधी दि.21.06.2009 रोजी घराचे बांधकामाचा प्रस्ताव श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांचे समक्ष झाल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याचे कथनावरुन करारनामा हा प्रतिज्ञार्थी श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांचे समक्ष किंवा त्यांचे उपस्थितीत झाला होता असा निष्कर्ष काढता येत नाही. प्रतिज्ञार्थी श्री. कृष्णा वल्द गजानन निरंजने यांनी दिलेले प्रतिज्ञापत्र तपासणे व त्याची उलट तपासणी होणे सुध्दा या प्रकरणात फार गरजेचे आहे. 10. तक्रारकर्त्याने घराचे बांधकाम फक्त रु.70,000/- चे झाले, ही बाब स्पष्ट करण्याकरता काही प्रतिज्ञालेख दाखल केलेले आहेत. त्यावरुन बांधकाम हे रु.70,000/- चे झाले होते असा निष्कर्ष काढता येत नाही. तक्रारकर्त्याने सदर बांधकामाचे मंजूरीचा कोणताही पुरावा मंचासमक्ष सादर केलेला नाही. तसेच सदर प्रकरण हे मौखीक व्यवहाराचे असल्यामुळे यामधील सत्यता तपासुन पाहण्याकरता सखोल पुराव्याची गरज असल्यामुळे सदर प्रकरण संक्षीप्त पध्दतीने (Summary Trail) घेणे न्यायोचित होणार नाही. म्हणून मंचाचे असे मत आहे की, सदर प्रकरणी सखोल पुराव्याची गरज असुन प्रतिज्ञार्थींची सुध्दा तपासणी गरजेची आहे. त्यामुळे ते दिवाणी स्वरुपाचे असुन ते सत्कृत दर्शनी दिसुन येत असल्यामुळे सदर प्रकरण निकाली काढण्यांत येते. 11. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येत असुन, त्याला आपली तक्रार दिवाणी न्यायालयात दाखल करण्याची मुभा देण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |