(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.15.07.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याला दुचाकी वाहनाचे दुरुस्तीसाठी आणखी एका दुकानाची आवश्यकता होती म्हणून त्याने गैरअर्जदारांशी मौजा-बोरगाव, काटोल रोड, नागपूर येथील प्लॉट नं.114, खसरा नं.151/1, 151/2, 58/3, 59/2, 59/3 व 54 वार्ड नं.62, सिटी सर्वे नं.536, 544,545,546 व 547, शिट नं. 55 घर नं.566/114 मधील रुम टेनॅमेंट नं.जी-1, आराजी 29.949 चौ.मी. एकूण रक्कम रु.15,51,000/- एवढया मोबदल्यात खरेदी करण्याचा गैरअर्जदारांशी करार केला. परंतु नंतर गैरअर्जदारांनी सदर टेनॅमेंट कमर्शीयल नसल्याचे कबुल केले, परंतु तरीही दुकान लावता येईल असे सांगितले. परंतु गैरअर्जदारांनी सदरचा करार रद्द करुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना सदर मोबदल्यापैकी दिलेले रु.5,00,000/- परत करण्याची विनंती केली सदर रक्कम परत देण्याचे आश्वासन देऊनही गैरअर्जदारांनी सदरची रक्कम परत केली नाही.
3. तक्रारकर्त्यानी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 4 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपल्या कथनात तक्रारकर्ता हा त्यांचा ‘ग्राहक’, नाही व सदरचा वाद Specific Relief Act अंतर्गत येतो. तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार याचेतील सदरचा व्यवहार हा वैयक्तिक व्यवहार असल्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही, असा गैरअर्जदारांनी उजर घेतला आहे. गैरअर्जदारांच्या कथनानुसार त्यांचे वडील हे वास्तुशास्त्रज्ञ होते व मेसर्स चिमोटे कन्स्ट्रक्शन या प्रोप्रायटरी फर्मचे मालक होते. त्यांनी ‘श्री अपार्टमेंट’, या नावाची योजना प्रावधीत केली होती व त्यांचे नावाने बिल्डींग परमीट व सुधारीत नकाशास मंजूरी देण्यांत आली होती. तसेच त्यांनीच आपल्या हयातीत सदर वास्तुतील सदनिका विकल्या असुन त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राप्रमाणे त्यांनी न विकलेल्या त्यांच्या मालकीचे सदर वास्तुतील 4 रुम टेनॅमेंट त्यांचा मुलगा (गैरअर्जदार) याचे नावे केले. सदर सदनिका गैरअर्जदाराने विकलेल्या नसुन त्यांचा काहीही संबंध नाही, केवळ मृत्यूपत्रानुसार मालकीहक्क प्राप्त झालेल्या टेनॅमेंट पैकी सदर टेनॅमेंट गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास विकण्याचा केला होता. परंतु सदर व्यवहार हा वैयक्तिक पातळीवरील होता कराराप्रमाणे तक्रारकर्त्याने दुकानाची रक्कम दिली नाही केवळ रु.1,00,000/- दिले व कराराचे पालन केले नसुन अटी व शर्तींचा भंग केलेला आहे.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.15.03.2012 रोजी आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
6. प्रस्तुत तक्रारीसोबत दाखल दस्तावेज तसेच पान क्र.67 वरील मृत्यूपत्रावरुन या मंचाचे असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्याने ‘श्री अपार्टमेंट’, मधील एक टेनॅमेंट मौजा-बोरगाव, काटोल रोड, नागपूर येथील प्लॉट नं.114, खसरा नं.151/1, 151/2, 58/3, 59/2, 59/3 व 54 वार्ड नं.62, सिटी सर्वे नं.536, 544,545,546 व 547, शिट नं. 55 घर नं.566/114 मधील रुम टेनॅमेंट नं.जी-1, आराजी 29.949 चौ.मी. एकूण रक्कम रु.15,51,000/- एवढया मोबदल्यात खरेदी करण्याचा गैरअर्जदारांशी करार केला होता. दस्तावेज क्र.36 ते 60 वरील दस्तावेजांवरुन असे निदर्शनास येते की, सदर अपार्टमेंट गैरअर्जदार यांचे वडील श्री. पुंडलीक नारायणराव चिमोटे, यांनी प्रावर्धीत केले होते. त्यासंबधीत बिल्डींग परमीट, सुधारीत नकाशा यास गैरअर्जदारांचे वडीलांचे नावे मान्यता होती व सदर वास्तुतील सदनिका ह्या गैरअर्जदारांचे वडीलांनी आपल्या ह्यातीत विकलेल्या होत्या. दस्तावेज क्र.67 वरील गैरअर्जदारांचे वडीलांच्या मृत्यूपत्रावरुन असेही दिसुन येते की, सदर अपार्टमेंटमधील त्याच्या मालकीचे चार टेनॅमेंट हे मृत्यूपत्राव्दारे त्यानी आपल्या मुलास दिलेले होते. त्यापैकी एक टेनॅमेंट हे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास विकण्याचा करार केला होता व तो वैयक्तिक स्वरुपात होता हे दाखल दस्तावेजांवरुन दिसुन येते. तसेच सदरचा व्यवहार हा वैयक्तिक व्यवहार नव्हता याबाबत तक्रारकर्त्याने कुठलाही पुरावा सादर केलेला नाही
7. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती व दाखल दस्तावेज पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचेमधे झालेल्या वादातील दुकानाचा व्यवहार हा वैयक्तिक स्वरुपाचा व्यवहार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करता सदरचा व्यवहार या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे सदरची तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. सबब सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.