( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 24 आक्टोबर 2011 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदाराचे कथनानुसार, त्यांनी गैरअर्जदार यांचकडे दिनांक 11.9.2008 ते 6.2.2009 या कालावधीत 9,15,000/- गुतंविले होते. त्याबाबत गैरअर्जदाराने पावत्या दिल्या आहेत. या रक्कमेवर प्रतीमाह गैरअर्जदार इंसेटीव्हची रक्कम देणार होते व अडीच वर्षात रक्कम दामदुप्पट करुन मिळणार होती. परंतू पुढे गैरअर्जदारांनी जाहिर केलेल्या योजनेप्रमाणे इंसेटीव्हची रक्कम तक्रारदारांना दिली नाही. म्हणुन विचारणा केली असता इंसेटीव्ह देणे गैरअर्जदारांना शक्य नाही व अडीच वर्षानंतर रक्कमही दुप्पट करुन देणे शक्य नसल्याबाबत गैरअर्जदारांनी तक्रारदारास सांगीतले. म्हणून तक्रारकर्त्यानी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन त्यांची एकूण रुपये 9,15,000/- ही रक्कम इंसेटीव्हसह व 18 टक्के व्याजसह परत मिळावी. शारिरिक, मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी रुपये 2,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत ठेवीच्या पावत्या दाखल आहेत.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार क्रं.1 हजर झाले व त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.2 नोटीस मिळुनही हजर झाले नाही व आपला लेखी जवाब दाखल केला नाही म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 23/6/2011 पारित केला.
गैरअर्जदार क्रं.1 यांनी आपले लेखी जवाबात काही प्राथमिक आक्षेप उपस्थित केलेले आहेत. त्यांच्या मते, मार्च 2009 नंतर आयकर विभागाने व इतर संबंधीत विभागांनी केलेल्या कार्यवाहीनुसार गैरअर्जदार कंपनीचा कारभार ठप्प झालेला आहे व गैरअर्जदार हे लाभार्थ रक्कम देऊ शकले नाही. तसेच तक्राकर्त्याच्या गुंतवणुकीस अडीच वर्षाचा कालावधी झालेल्या नसल्याने वेळ पूर्ण होण्याआधी तक्रार दाखल केलेली आहे. तसेच कंपनी लिक्वीडेशन पीटीशन मा.उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे नमूद केले आहे. गैरअर्जदार पुढे असे नमुद करतात की, त्यांचा तक्रारदारासोबत कोणताही करार झालेला नव्हता. तसेच तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली व सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. गैरअर्जदाराने आपले जवाबासोबत आयकर विभागाचे संबंधित कार्यवाहीची कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार एकुण 8 कागदपत्रे दाखल केलीत. गैरअर्जदार क्रं.1 ने आपला लेखी युक्तिवाद दाखल केला. गैरअर्जदार क्रं.2 एकतर्फी.
#####- का र ण मि मां सा -####
यातील तक्रारदाराने आपले तक्रारीचे पृष्ठर्य्थ प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे. तसेच लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. तक्रारदाराची रक्कम गैरअर्जदाराकडे जमा असल्याबद्दलची बाब गैरअर्जदारानी अमान्य केलेली नाही. गैरअर्जदाराने आपले उत्तरात जो बचाव घेतलेला आहे तो निरर्थक अशा स्वरुपाचा आहे. कारण या गैरअर्जदाराने स्वतः , फसवणुक केल्यासंबंधी दावे व तक्रारी अन्य न्यायालयात असल्याबद्दलची बाब समोर आणली आहे आणि अशा प्रकारे गैरअर्जदाराने तक्रारदारासोबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे ही बाब सुध्दा स्पष्ट आहे. असे असतांना तक्रारदाराने मुदतीपर्यत वाट पहावी हे गैरअर्जदाराचे म्हणणे निरर्थक आहे. तक्रारदाराची रक्कम गैरअर्जदाराने अशा प्रकारे स्विकारुन ती परत न करणे ही बाब सेवेतील त्रुटी दर्शविते म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारदाराकडुन स्विकारलेली रक्कम 9,15,000/ त्यांनी कबुल केल्याप्रमाणे 18 टक्के द.सा.द.शे. व्याजासह, रक्कम स्विकारल्याचे तारखेपासुन प्रत्यक्ष अदायगीपावेतो मिळुन येणारी रक्कम तक्रारदारास आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावी.
3. गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 10,000/- (केवळ दहा हजार रुपये) आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 1,000/- (केवळ एक हजार रुपये) असे एकुण 11,000/-रुपये तक्रारदारास द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे.