(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.06.07.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याने गैरअर्जदारांकडून मौजा-चिखली (खुर्द), खसरा नं.18/4, येथील भुखंड क्र.20, 21 एकूण क्षेत्रफळ 3187 चौ.फूट, रु.18,500/- एवढया मोबदल्यात दि.06.09.1993 रोजी विकत घेतले. त्याच दिवशी गैरअर्जदारांनी विक्रीपत्र/ कब्जापत्र साक्षीदारासमक्ष तयार करुन तक्रारकर्त्याचे नावे करुन दिले व सदर भुखंडाचा ताबा तक्रारकर्त्यास दिला. त्यानंतर वारंवार विनंती करुनही गैरअर्जदारांनी नोंदणीकृत विक्रीपत्राकरीता लागणारे दस्तावेज दिले नाही व तांत्रीक कारणांमुळे ते शक्य नसल्याचे सांगुन ते देण्यांस टाळाटाळ केली. दि.25.02.2011 रोजी ‘दैनिक नवभारत’, या वृत्तपत्रात श्री. परेश जोशी, वकील यांचेव्दारा जाहीर सुचना देण्यांत आली त्यामधे सदरचा भुखंड श्री. अशोक रेवतकर यांना विकलेला असल्याचे नमुद केलेले आहे. सदर बाबत माहिती मिळाल्यानंतर तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना वारंवार विनंती करुनही सदर भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही, ही त्यांचे सेवेतील कमतरता आहे, म्हणून तक्रारकर्त्याने सदरीची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्यानी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 13 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदारांनी दि.25.02.2011 रोजी श्री. परेश जोशी यांचे मार्फत ‘दैनिक नवभारत’, मार्फत जाहीर सुचना व गैरअर्जदारांव्दारे त्यांची जमीन श्री. अशोक रेवतकर यांना विकण्याचे करारासंबंधीची मजकूराबाबतचे तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य केलेले आहे आणि इतर आरोप अमान्य केलेले आहे.
5. गैरअर्जदारांचे कथनानुसार त्यांचा तक्रारकर्त्याशी भुखंडा संबंधाने कधीही करार केलेला नव्हता किंवा सदरचा भुखंड हा तक्रारकर्त्यास विकलेला नव्हता, तसेच इतर भुखंड अद्यापही तक्रारकर्त्याचे मालकीचे आहेत. दि.29.04.2011 रोजी गैरअर्जदारांचे असे लक्षात आले की, सदर ले-आऊट मधील 18-ए,19,20,21,22,22-ए असे एकूण 9600 चौ.फूट सदर्हू भुखंडावर तक्रारकर्ता व इतर व्यक्ति अतिक्रमण करण्याचा खोटया व बनावट दस्तावेजांव्दारे प्रयत्न करीत आहेत. तक्रारकर्त्याने त्यासंबंधी हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथे तक्रारी केल्यानंतर दि.21.05.2011, 09.06.2011 व 18.06.2011 रोजी संबंधीत पोलिस स्टेशनव्दारे तक्रारकर्त्यास सुचना देऊन सुध्दा ते दस्तावेजांसह पोलिस स्टेशनमधे चौकशीकरीता हजर झाले नाही. गैरअर्जदारांचे तक्रारीसंबंधी चौकशी केल्यानंतर पोलिस स्टेशन हुडकेश्वर यांनी दि.22.07.2011 रोजी तक्रारकर्ता व त्याच्या 3 साथीदारांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 468, 471, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल केले. तक्रारकर्त्याने आपल्या सहका-यांसह सदर जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत असुन त्याकरता त्यांनी सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
6. तक्रारकर्त्याची सदरची तक्रार खोटी व बनावट तयार करुन मंचात दाखल केलेली आहे, तसेच त्यांनी दाखल केलेले दस्तावेज, तथाकथीत विक्रीपत्र व कब्जापत्र खोटे असुन त्यावर गैरअर्जदारांच्या सह्या नाहीत. तसेच खोटे दस्तावेज दाखल केले म्हणून त्यांनी संबंधीत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्याचे नमुद केले आहे, अश्या परिस्थितीत सदरची तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही, कारण सदरचे खोटे दस्तावेज व बनावटी सह्यांबाबत सविस्तर चौकशी करुन पुराव्याची आवश्यकता आहे. म्हणून सदर तक्रार रु.1,00,000/- चे दंडासह खारिज करावी अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे.
7. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.10.02.2012 रोजी आली असता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला, दि.05.03.2012 रोजी गैरअर्जदारांनी प्रकरण बोर्डवर घेऊन दस्तावेज दाखल करण्याचे परवानगीचा अर्ज दाखल केला असता प्रकरण तक्रारकर्त्याचे म्हणण्याकरीता दि.15.03.2012 रोजी ठेवण्यांत आले. परंतु तक्रारकर्त्यातर्फे कोणीही हजर झाले नाही म्हणून प्रकरण निकालाकरीता राखीव ठेवण्यांत आले. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
8. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदारांकडून त्यांचे मौजा-चिखली (खुर्द), खसरा नं.18/4, येथील भुखंड क्र.20, 21 एकूण क्षेत्रफळ 3187 चौ.फूट, रु.18,500/- एवढया मोबदल्यात दि.06.09.1993 रोजी विकत घेतले व त्याच दिवशी गैरअर्जदारांनी सदर भुखंडाचे विक्रीपत्र व कब्जापत्र तक्रारकर्त्याचे नावे करुन ताबा दिलेला आहे. असे असतांना देखिल सदर भंखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र गैरअर्जदारांनी करुन दिलेले नाही. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्त्याने दाखल केलेले कब्जापत्र/ विक्रीपत्र हे बनावटी असुन त्यावर केलेल्या गैरअर्जदारांच्या सह्या खोटया आहेत. वास्तविक पाहता सदरचे भुखंड गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास विकलेले नसुन तक्रारकर्त्याने सदर भुखंडावर अतिक्रमणे केलेले आहे.
9. दि.25.02.2011 रोजीचे नोटीसवरुन या मंचास असे निदर्शनास येते की, सदरचा वादातीत भुखंड गैरअर्जदारांनी श्री. अशोक रेवतकर यांना विकण्याचा करार केलेला आहे, त्यासंबंधात कोणाची हरकत असल्यास त्याची मागणी केलेली आहे. आणि सदर नोटीस दिल्यानंतर तक्रारकर्त्याने सदरची तक्रार या मंचात दि.06.07.2011 रोजी दाखल केल्याचे दिसुन येते. त्याच प्रमाणे दस्तावेज क्र.11 वरील शपथपत्रातील बयाणावरुन असेही दिसुन येते की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याविरुध्द सदर भुखंड खोटया स्टँम्प पेपरवर खोटया सह्या करुन भुखंड हडपण्याबाबत हुडकेश्वर पोलिस स्टेशन, नागपूर येथे तक्रार केली होती व संबंधीत पोलिस स्टेशनने तक्रारकर्त्यास दि.21.05.2011, 09.06.2011, 18.06.2011 रोजी पोलिस स्टेशनला हजर राहण्याच्या सुचना देऊन सुध्दा ते दस्तावेजासह हजर झाले नाही. तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन असेही दिसुन येते की संबंधीत पोलिस स्टेशनने दि.22.07.2011 रोजी तक्रारकर्ता व इतर तिन व्यक्तिं विरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 468, 471, 420 व 34 अन्वये गुन्हा नोंदविल्याचे दिसते, तसेच पान क्र.63 वर दाखल दस्तावेजावरुन असेही निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्याने जिल्हा सत्र न्यायाधीश यांचेकडे अटकपूर्व जमानत घेतलेली आहे. अश्या परिस्थितीत सदर पोलिस स्टेशनमधे केलेली तक्रार ही मंचात तक्रार दाखल केल्यानंतर केलेली असली तरी संबंधीत तक्रार ही भुखंडावरील अतिक्रमणाबाबत व भुखंडाच्या दस्तावेजांसंबंधी आहे व ते दस्तावेज खोटया व बनावट सह्या असल्याचा महत्वाचा आक्षेप असल्याचे दिसुन येते. अश्या परिस्थितीत सदर प्रकरणाचा तपास सुरु असतांना तसेच दस्तावेजाच्या खरे-खोटेपणाबाबत वाद असल्यामुळे यात सखोल चौकशी व पुराव्याची आवश्यकता असल्यामुळे या मंचाचे अधिकार क्षेत्राचा विचार करता सदर तक्रार मंचास चालवीणे योग्य होणार नाही. करीता तक्रारकर्त्याने आपली तक्रार योग्य त्या न्यायालयासमोर दाखल करावी. वरील निष्कर्षांवरुन सदरची तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. तक्रारकर्त्याने आपली तक्रार योग्य त्या न्यायालयासमोर दाखल करावी.