निकाल
दिनांक- 13.11.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार हे मौजे धानोरा ता.आष्टी जि.बीड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार व त्यांचे कूटूंबिय हे द्रोण व पत्रावळी तयार करण्याचे उद्योगावर पूर्णतः अवंलबून आहेत. तक्रारदार यांचे कूटूंबाची उपजिवीका सदरील उद्योगावर चालत होती. तक्रारदार हे सदरील उद्योग स्वयंरोजगार म्हणून करीत होते. सामनेवाले हे पत्रावळी व द्रोण बनवण्याचे मशीनचा पुरवठा करणारे आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त कृष्णा स्वयंरोजगार मार्गदर्शन संस्था व प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथून तक्रारदार यांनी पत्रावळी व द्रोण तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तक्रारदार यांना उत्पादनाचे साधन व्हावे म्हणून त्यांने पत्रावळी व द्रोण बनविण्याचा उद्योग करण्याचे ठरवले. सदरील व्यवसायातून नफा मिळेल या हेतूने तक्रारदार यांने पत्रावळी व द्रोण बनविण्याची मशीन खरेदी करण्याचे ठरविले. सदरील मशीन सामनेवाले यांचेकडहून घेण्याचे निश्चित केले. तक्रारदार यांनी रक्कम रु.1,30,000/- मध्ये पत्रावळी तयार करण्याची मशीन व इतर साहित्य खरेदी केले. तक्रारदार यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धानोरा यांचेकडून रक्कम रु.2,00,000/- कर्ज घेतले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी दि.31.10.2010 रेाजी रु.1,30,000/- चा डिमांड ड्राफट दिला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना 10 दिवस उशिराने मशीन उपलब्ध करुन दिले. सदरील मशीन बसविण्यासाठी श्री. ढोरे व श्री. पाटील अशी दोन व्यक्ती आल्या. सदरील मशीन बसवल्यानंतर चेक करीत असताना 2 एच.पी. ची सिंगल फेज मोटार जळाली. सदरील इसम हे मोटार बराबर घेऊन गेले. एक महिन्यानंतर मोटार घेऊन आले व ती बसवून दिली. मशीन खरेदी करते वेळी एक वर्षाची वॉरंटी होती. सदरील मशीन मध्ये बिघाड झाल्यास ती दूरुस्त करुन देण्याची हमी सामनेवाले यांनी घेतली. पत्रावळी तयार करण्यासाठी जो साचा असतो त्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. सदरील मशीन पत्रावळीची व्यवस्थित कटींग करु शकत नव्हते. सदरील बिघाडा बाबत ही सामनेवाले यांचेकडे फोन वर संपर्क साधला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दूसरा डाय टाकण्याचा सल्ला दिला. दूसरा डाय टाकून सुध्दा काम व्यवस्थित होत नव्हते. तक्रारदार हे डाय घेऊन पूणें येथे सामनेवाले यांचेकडे गेले. तक्रारदार यांना प्रवास खर्च व डाय ने आणण्याचा खर्च करावा लागला. सामनेवाले यांना वेळोवेळी संपर्क करुनही ही डाय दूरुस्त करुन दिला नाही. सामनेवाले यांनी उशिराने सदरील डाय पाठविला. त्यामुळे तक्रारदार यांचे काम आठ दिवस बंद होते. दि.28.2.2011 रोजी मशीनवर बसवलेली मोटार जळाली. सामनेवाले यांनी डाय व मोटार पूणे येथे घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदरील डाय व मोटार पूणे येथे पोहचून दिली. सामनेवाले यांनी अद्यापपावेतो सदरील मोटार व डाय बदलून दिले नाही. वेळोवेळी संपर्क करुन सूध्दा सामनेवाले यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदार यांनी लग्न सिझन मध्ये पत्रावळया तयार करुन विकणे शक्य झाले नाही. तक्रारदार यांनी काढलेंले कर्ज थकीत झाले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.29.4.2011 रोजी नोटीस पाठविली व सर्व बाबी सामनेवाले यांचे निदर्शनास आणल्या. सामनेवाले यांनी दिलेल्या हमीनंतर पत्रावळी तयार करण्याची मशीन काम करु शकत नाही. तक्रारदार यांचे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला व त्यांचे आर्थिक नुकसान झाले. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई पोटी रु.4,87,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी नि.10 वर लेखी कैफियत दाखल करण्याचा अधिकार कायम ठेऊन अर्ज दाखल केला. त्यामध्ये सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले हे पूणे येथील रहीवासी आहेत. तक्रारीतील सर्व घटना या पूणे येथे घडल्या आहेत. सामनेवाले यांची शाखा बीड जिल्हयात नाही. सामनेवाले हे बीड जिल्हयात कूठेही व्यापार करीत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण चालविण्याचा मंचास अधिकार नाही. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्या बाबी हया व्यापारी तत्वाच्या आहेत. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत. तक्रारदार यांनी सदरील मशीन व्यापारी कारणासाठी खरेदी केली होती. त्यामुळे या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असा हरकतीचा मुददा उपस्थित केला आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये सामनेवाले यांनी बँकेला दिलेले पत्र, मशीन दिल्या बाबत डिलेव्हरी चॅलन, वॉरंटीचे पत्र, तक्रारदार यांनी दिलेल्या नोटीसचे कॉपी हजर केली आहे. तक्रारदार यांनी पूराव्याचे शपथपत्र नि.8 वर दाखल केले आहे. सामनेवाले यांनी पूरावा प्रित्यर्थ कोणतेही कोणतेही दस्त हजर केले नाही. तक्रारदार यांचे वकील श्री. बोडखे यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागरपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सदरील तक्रार ही मंचाचे कार्यक्षेत्रात येते काय नाही
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली
आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय नाही.
3. तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येतात काय नाही.
4. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये खालील बाबीविषयी वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून द्रोण व पत्रावळी उत्पादन करण्याचे मशीन रु.1,30,000/-विकत घेतले. तक्रारदार यांनी मौजे धानोरा ता.आष्टी जि.बीड येथे पत्रावळी व द्रोण तयार करण्याचा व्यवसाय सूरु केला.
सामनेवाले यांनी अर्ज देऊन सदरील तक्रारीमधील बाबी हया जिल्हा मंच बीड यांचे कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे या मंचाला अधिकार नाही असा मुददा उपस्थित केला. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये संपूर्ण व्यवहार हा पूणे येथे झालेला आहे. सामनेवाले यांची कोणतीही शाखा बीड जिल्हयात नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केलेल्या बाबीविषयी कोणताही पूरावा या मंचासमोर हजर केलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रार दाखल करण्यास कारण या मंचाचे कार्यक्षेत्रात घडले नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्ताचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी द्रोण व पत्रावळी तयार करण्याचे मशीनरी पूणे येथे सामनेवाले यांचेकडून घेतलेले आहे. सदरील मशीन तक्रारदार यांना तपासून देण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत सदरील मशीन वारंवार बिघाड झाल्यामुळे सामनेवाले यांचेकडे घेऊन गेल्या बाबत कथन केले आहे व असे कथन केले आहे की, विद्यूत मोटार व डाय सामनेवाले यांचेकडे नेऊन दिले असता ती अद्याप पर्यत दिलेले नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी या मंचासमोर त्यांचे शपथपत्र व नोटीस शिवाय कोणतेही दस्त हजर केलेले नाहीत की ज्या अन्वये मशीनमध्ये दोष निर्माण झाला व तक्रारदार हे सदरील मशीन घेऊन पूणे येथे गेले व सामनेवाले यांचेकडे दिले. खरोखरच सदरील मशीन दूरुस्तीसाठी सामनेवाले यांचेकडे दिले असल्यास त्याबाबत दस्त या मंचासमोर येणे आवश्यक आहे परंतु तसा कोणताही दस्त या मंचासमोर हजर नाही. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार हा पूणे येथे झालेला आहे. सामनेवाले हे पूणे येथे व्यवहार करतात. त्यांची कोणतीही शाखा बीड जिल्हयात कार्यरत नाही. ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये या जिल्हा मंचास तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र निश्चित केलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील तक्रार जेथे सामनेवाले पार्टी राहते किंवा ज्याठिकाणी व्यवहार करते किंवा ज्याठिकाणी शाखा आहे. त्या मंचाचे स्थळसिमेत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. सदरील व्यवहार या मंचाचे अधिकार क्षेत्रात झाल्या बाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा या मंचासमोर दिलेला नाही. सबब, या मंचाचे मत की, सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास नाही.
तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येतो किंवा नाही हे ही ठरवणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे तक्रारीतील बाबीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता पत्रावळी व द्रोण तयार करण्याचा उद्योग चालवतात असे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी सदरील उद्योग हा नफा मिळविण्याचा उददेशाने सूरु केलेला आहे असेही नमूद केलेले आहे. सबब, या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी सदरील मशीनरी ही व्यापारी कारणासाठी खरेदी केलेलया आहेत. त्या कारणास्तव ही तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत.
तक्रारदार यांचे वकिलानी असा यूक्तीवाद केला की,तक्रारदार यांनी सदरील मशीन विकत घेतल्यानंतर वेळोवेळी त्यामध्ये दोष निर्माण झाले व सामनेवाले यांनी दिलेल्या वॉरंटीचा भंग झाला. तसेच तक्रारदार यांना डाय दूरुस्त करावा लागला व इलेक्ट्रीकल मोटारही जळाली. सदरील यूक्तीवाद लक्षात घेऊन कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी इलेक्ट्रीक मोटार जळाल्या बाबत व तसेच डायमध्ये दोष निर्माण झाला व तो बदलून दिला या बाबत कोणताही पुरावा या मंचासमोर हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी पत्रावळी व द्रोण तयार करण्याचे मशीन खरेदी केले. सदरील मशीनमध्ये उत्पादकीय दोष आहे हे शाबीत करण्याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे. तक्रारदार यांनी या मंचासमोर सदरील मशीन तपासणी करुन अहवाल देण्या बाबत अर्ज दिलेला आहे. या मंचाने तो अर्ज मंजूर केलेला आहे. सदरील मशीनची तपासणी करुन अहवाल देणे बाबत आदेशही देण्यात आलेले आहे. उत्पादकीय दोष असल्याबाबत अहवाल मंचासमोर नाही. सदरील मशीन तपासून खरोखरच त्यामध्ये उत्पादकीय दोष आहे हे मंचासमोर येणे गरजेचे आहे. केवळ तक्रारदार म्हणतात या कारणास्तव मशीन मध्ये दोष आहे असा निष्कर्ष काढत येणार नाही. तक्रारदार यांनी या मंचासमोर एक पंचनामा सादर केलेला आहे. तो पंचनामा संरपंच व ग्रामसेव धानोरा यांनी तयार केल्याचे दिसते. त्या पंचनाम्यामध्ये मशीन बंद असल्या बाबत व इलेक्ट्रीक मोटार व डाय नसल्या बाबत उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारचा पंचनामा करण्याचे खरोबरच अधिकार संरपंच व ग्रामसेवक यांना होते काय ही बाब ही तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. ग्रामसेवक व संरपंच हे मशीनमध्ये दोष असल्या बाबत निर्णय देणारे सक्षम यंत्रणा नाही. सदरील मशीन योग्य त्या प्रयोगशाळेतून तपासणी करुन त्यामध्ये खरोखरच उत्पादकीय दोष आहे किंवा काय हे तक्रारदार यांनी शाबीत केलेले नाही. त्या कारणास्तव तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
मुददा क्र..1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड