श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 27/04/2012)
1. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदाराचे योजनेमध्ये सदनिका क्र. 403 रु.15,25,000/- किंमतीमध्ये घेण्याचा करार दि.23.08.2009 रोजी करुन, रु.2,28,750/- ही रक्कम कराराचेवेळेस दिली. उर्वरित रक्कम ही उभयतांमध्ये ठरल्याप्रमाणे व कराराप्रमाणे वित्तीय सहाय्य घेऊन बांधकामाच्या प्रगतीप्रमाणे द्यावयाची होती. पुढे गैरअर्जदाराने बांधकाम पूर्ण केले नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठविला. नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाला, परंतू त्यांनी उत्तर दिले नाही. शेवटी तक्रारकर्त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे रु.2,28,750/- ही रक्कम 18% व्याजासह स्विकारल्यापासून परत करावी, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- मिळावे अशा मागण्या केल्या.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त. त्यांनी तक्रारीस लेखी जवाब दाखल केला व तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. करारातील बाबी मान्य केल्या. मात्र या प्रकरणामध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की, या मंचाला अधिकारक्षेत्र नाही. दिवाणी न्यायालयात दावा करावयास पाहिजे होता. शासनाने या प्रकरणामध्ये त्या भागातील जमिनीवर बांधकाम करण्यासाठी बंदी घातल्यामुळे त्यासंबंधीचे न्यायालयात प्रकरण सुरु आहे आणि त्यामुळे गैरअर्जदार हे बांधकाम करु शकले नाही. थोडक्यात तक्रार खारीज करावी असा उजर घेतला आहे.
3. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आहे.
-निष्कर्ष-
4. सदर प्रकरणातील कराराप्रमाणे गैरअर्जदाराने मान्य केले आहे की, रु.2,28,750/- तक्रारकर्त्याकडून प्राप्त झालेले आहे. ही बाब गैरअर्जदारांनी नोटीसला उत्तर देतांना मान्य केली आहे. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे सदर प्रकरणात बांधकाम करण्यास त्या भागातील जमिनीवर प्रतिबंध आलेला आहे व त्यासंबंधीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार हे बांधकाम पूर्ण करु शकत नाही व कराराची पूर्तता करु शकत नाही. गैरअर्जदाराने असे कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही की, त्यांनी बांधकामाची कोणती अवस्था होती. त्यांनी नमूद केले की, बांधकाम थांबविण्यात आले. वरील परिस्थीतीत गैरअर्जदार हे तक्रारकर्त्यास कराराप्रमाणे योग्य सेवा देऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांकडून स्विकारलेली रक्कम रु.2,28,750/- तक्रारकर्त्यास दि.24.08.2009 पासून द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांला मानसिक त्रासापोटी रु.10,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे. न पेक्षा गैरअर्जदार हे तक्रारकर्त्यास द.सा.द.शे. 15% दंडनीय व्याज देणे लागतील.