(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :23/08/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 21.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्त्याने घरगुती उपयोगाकरीता गैरअर्जदार क्र.2 निर्मीत फियाट कंपनीची पालीओ स्टाईल एस.डी.एक्स. कार गैरअर्जदार क्र.1 मार्फत दि.03.02.2009 रोजी विकत घेतली. सदर कार विकत घेतल्यानंतर एक महिन्यानंतर कारचे चारही टायर अत्यंत कमी वेळात घासल्या गेल्याचे लक्षात आले. याबाबत गैरअर्जदार क्र.1 ला कळविले असता त्यांनी वाहनाच्या चाकामधील अलायमेंन्टचा तांत्रीक दोष असल्याने वाहन नागपूर येथे आणण्यास सांगितले. वाहन दि.14.03.2009 रोजी गैरअर्जदारांकडे आणले असता त्यांनी त्याची थातुरमातुर दुरुस्ती करुन दिली व त्याबाबत वारंटी कालावधीत असतांना सुध्दा रु.812/- दुरुस्तीचे घेतले. त्यानंतर केवळ 15 दिवसात पुन्हा वाहनाचे चारही टायर घासल्या गेले असता, गैरअर्जदार क्र.1 यांचे सांगण्यानुसार ते वाहन पूर्ण येथील गैरअर्जदार क्र.2 चे अधिकृत सर्व्हीसींग सेंटर बी.यु. भंडारी ऑटो प्रा.लि. यांचेकडे नेले असता त्यांनी अलायमेंन्ट करुन दिले व दुरुस्तीपोटी रु.717/- घेतले. त्यानंतर सुध्दा तीच परिस्थिती टायर बाबतची कायम राहीली म्हणून रु.9,083/- देऊन चारही नवीन टायर बदलविले. याउपर वारंवार दोषांची दुरुस्ती करुन सदर वाहनातील दोष कायम असल्यामुळे त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली व ती व्दारे गैरअर्जदारांनी वाहनातील उत्पादकीय दोष 1 वर्षाचे वारंटीसह पूर्णपणे दुरुस्त करुन द्यावा, ते शक्य नसल्यास दुसरे वाहन बदलवुन द्यावे किंवा वाहनाची किंमत व्याजासह परत करावी, वाहनाचे दुरुस्तीपोटी त्याला आलेला एकूण खर्च रु.18,785/- 12% व्याजासह मिळावा, वाहन दुरुस्तीकरीता नागपूर व पूणे येथे जावे लागले त्याबद्दलचा खर्च रु.17,000/- मिळावा, दुसरे वाहन भाडयाने घ्यावे लागले त्याकरीता रु.20,000/-, शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु15,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता गैरअर्जदार यांनी मंचात हजर होऊन आपले कथन खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र.1 ने आपल्या कथनात तक्रारकर्त्याने सदर वाहन स्वतःच्या उपयोगाकरीता न घेता व्यवसाय करण्याकरीता घेतले असल्याचे नमुद केले आहे. तसेच सदर वाहनाची हिस्ट्री बघता ती दि.18.03.2009 पासुन 25.08.2010 पर्यंतचे कालावधीत 80260 कि.मी. चालले आहे. त्यामुळे वाहनाचे टायर हे पूर्णपणे वापर केल्यानंतरच घासले असुन तक्रारकर्ता वाहनाचा व्यवसायाकरीता उपयोग करीत असल्यामुळे मंचास सदर तक्रार चालविण्याचा अधिकार नाही व ती खारिज करावी, असा उजर केला आहे.
4. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या कथनात गैरअर्जदार क्र.1 हे त्यांचे अभिकर्ता नाहीत व त्यांचेशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही, त्यामुळे त्यांना गैरअर्जदार क्र.1 यांचे कार्यासाठी जबाबदार धरण्यांत येऊ नये असे नमुद केले आहे आणि कराराप्रमाणे या प्रकरणी अधिकारक्षेत्र हे केवळ मुंबई येथील न्यायालयास असुन या न्याय मंचास अधिकार क्षेत्र नाही. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत यावी असा उजर केलेला आहे.
5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 10 विनंती अर्ज, डिलेव्हरी मेमो, वाहन अलायमेंटच्या पावत्या, सर्व्हीसिंगच्या पावत्या इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.09.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 चे वकील हजर, मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदार क्र.2 चे वकील उशिराने हजर त्यांचा दस्तावेज दाखल करण्याबाबतचा अर्ज नामंजूर. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. यातील गैरअर्जदार क्र.2 यांनी एक महत्वाचा आक्षेप असा घेतला आहे की, कराराप्रमाणे या प्रकरणी अधिकारक्षेत्र हे केवळ मुंबई येथील न्यायालयास आहे आणि या न्याय मंचास अधिकार क्षेत्र नाही. या न्याय मंचास अधिकार क्षेत्र येत नाही या आक्षेपासंबंधी वरीष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी निकाल देऊन हे स्पष्ट केले आहे की, ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत, कराराव्दारे न्याय मंचाचे अधिकार क्षेत्र काढून घेता येत नाही, त्यामुळे या आक्षेपात अर्थ नाही. गैरअर्जदार क्र.2 चे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेतील कराराप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 कडे कोणतीही जबाबदारी येत नाही. सदरचे प्रकरण हे वाहनातील दोषासंबंधी आहे आणि वाहनाची निर्मीते गैरअर्जदार क्र.2 हे आहेत त्यामुळ या प्रकरणात गैरअर्जदार क्र.2 ची जबाबदारी स्वयंस्पष्ट आहे.
8. यातील गैरअर्जदार क्र.2 ने असे मान्य केले आहे की, सदर वाहनाचे चाकाचे अलायमेंट दुरुस्त करुन दिले आहे. तक्रारकर्त्याची ही तक्रार निर्मीती दोष याच कारणासाठी असुन त्याचे वाहनाच्या चाकाचे अलायमेंट बरोबर नव्हते, त्यामुळे वाहनाचे टायर वारंवार खराब होत होते. अश्या परिस्थितीत वाहनाचे तांत्रीक कालावधीमध्ये वाहनाला जो काही खर्च लागेल तो भरुन देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदारांची असुन ती संयुक्त स्वरुपाची आहे. त्यामुळे वाहनाला अश्या स्वरुपाचे दोष वारंवार दुरुस्त करावे लागणे ही बाब हे स्पष्ट करते की, विकण्यांत आलेल्या वाहनात दोष होता
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे वाहन आदेश प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आंत अलायमेंटच्या दोषासंबंधी पूर्णपणे दुरुस्ती करुन देऊन त्याबाबत शासकीय तंत्र निकेतन संस्था, नागपूर किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांचे महाविद्यालयात ऑटोमोबाईल विभागाचे जे तज्ञ असतील त्यांचेकडून वाहनाची तपासणी करुन घेऊन ते पूर्णतः दुरुस्त झालेले आहे याबाबत प्रमाणपत्र घेऊन ते तक्रारकर्त्यास सुस्थितीत परत करावे. तसेच तक्रारकर्त्याला आलेल्या खर्चाबद्दल रु.18,785/- अदा करावे.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रु.10,000/- एवढी नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30
दिवसांचे आंत करावे.