निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 15/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 30/10/2012 कालावधी 10 महिने, 15 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
प्रभारी अध्यक्षा – सौ.रेखा कापडिया.
सदस्या -- सौ.माधुरी विश्वरुपे.
---------------------------------------------------------------------------------------
श्रीमती सरस्वती भ्र.उत्तमराव चव्हाण. अर्जदार
वय 42 वर्षे.धंदा. शेती व घरकाम. अड.एस.एन.वेलणकर.
रा.नागनगांव ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
शाखा व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं लि.
दयावान कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड,परभणी.
ता.जि. परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) सौ.रेखा कापडिया. अध्यक्षा.
2) सौ. माधुरी विश्वरुपे. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.रेखा कापडिया.प्र.अध्यक्षा.)
अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार विमा कंपनीकडून किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत जनता अपघात विमा काढलेला आहे.त्यांचे अपघातात निधन झाल्यानंतर अर्जदाराने विमा रक्कम देण्याची केलेली मागणी गैरअर्जदार यांनी मान्य न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पतीने महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा बोरी ता.जिंतूर या बँके मार्फत किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत गैरअर्जदार यांच्याकडून अपघात विमा पॉलिसी घेतली आहे.या विमा पॉलिसीचा कालावधी 06/05/2010 ते 05/05/2013 असा आहे. दिनांक 26/02/2011 रोजी अर्जदाराचे पती उत्तम पुंजाजी चव्हाण यांच्या वाहनास मोटरसायकलने धडक दिल्यामुळे अपघातात निधन झाले. या अपघाताची नोंद बोरी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे विमा रक्कम देता येत नसल्याचे कळविले. विमा रक्कम मिळण्यासाठी वाहन चालविणा-या व्यक्तीकडे वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक नसल्याचे सांगून गैरअर्जदार यांनी विमा रक्कम देण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारी सोबत विमा पॉलिसी, अपघात पंचनामा, गैरअर्जदार यांचे पत्र इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जबाबानुसार अर्जदाराने त्यांच्याकडे अपघात विमा पॉलिसी काढली असल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदाराने विमा रक्कम मिळण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावा बरोबर त्यांच्या पतीच्या नावे वाहन चालविण्याचा परवाना सोबत जोडलेला नाही. अर्जदारास या बाबत कळविण्यात आल्यानंतरही त्यांनी वाहन परवाना त्यांच्याकडे पाठविला नाही. विमा करारातील अट क्रमांक ड नुसार त्यांना विमा रक्कम देता येत नाही
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच सुनावणी वरुन असे आढळून येते की, अर्जदाराच्या पतीने महाराष्ट्र ग्रामिण बँक, शाखा बोरी ता.जिंतूर जिल्हा परभणी या बँके मार्फत किसान क्रेडीट कार्ड योजने अंतर्गत गैरअर्जदार यांच्याकडून विमा पॉलिसी काढली आहे.सदरील विमा पॉलिसीचा क्रमांक 230601/47/10/43/00000162 असा असून त्याचा कालावधी 06/05/2010 ते 05/05/2013 असा आहे. दिनांक 26/02/2011 रोजी अर्जदाराचे पती उत्तमराव पुंजाजी चव्हाण यांचे बोरी – परभणी या रस्त्यावर त्यांच्या मोटर सायकलला दुस-या मोटर सायकलने धडक दिल्यामुळे अपघात झाला. व त्यात त्यांचे निधन झाले. सदरील अपघाताची नोंद बोरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली दिसून येते.
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केल्यानंतर गैरअर्जदार यांनी दिनांक 29/09/2011 रोजी पत्राव्दारे अर्जदारास वाहन चालविण्याचा परवाना व पोलीस विभागाचा अंतिम अहवाल सादर करण्याबाबत कळविले असल्याचे दिसून येते. अर्जदाराने दिनांक 15/10/2011 रोजी पोलीस विभागाचा अंतिम अहवाल दाखल केला व वाहन परवाना सापडत नसल्याचे कळविलेले दिसून येते. गैरअर्जदार यांनी वाहन परवाना दाखल केलेला नसल्यामुळे अर्जदाराची विमा रकमेची मागणी फेटाळली आहे.
अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारी सोबत विमा पॉलिसीची प्रत सोबत जोडली आहे. या पॉलिसीचे निरीक्षण केल्यावर अपघातात मरण पावलेल्या विमा धारकास 50,000/- रु.देण्यात येतील असे नमुद केलेले आहे. कलम “ ड ” मध्ये आत्महत्या व मादक पदार्थांचे सेवन करुन मृत्यूस कारण असलेल्या विमा धारकास रक्कम मिळणार नाही, असे नमुद केलेले आहे. या प्रकरणात अर्जदारास दुस-या वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस विभागातर्फे अपघातामुळे मृत्यूस कारणीभूत असलेल्या रवि किसनराव वारकड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केलेला दिसून येतो.कलम “ ड ” नुसार अर्जदाराने मादक पदार्थांचे सेवन केलेले नाही व आत्महत्याही नाही. व मा.राज्य आयोगाच्या निवाडया प्रमाणे अर्जदारास दुस-या वाहनाने धडक दिल्यामुळे वाहन परवान्याची मागणी करुन विमा रक्कम नाकारता येत नाही.
वरील सर्व निरीक्षणा वरुन अर्जदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
आ दे श
1 गैरअर्जदार यांनी अर्जदारास 50,000/- रुपये 30 दिवसात द्यावे.
2 गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाई 1,500/- रुपये व खर्चा बद्दल रु.1,500/- 30 दिवसात द्यावे.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.माधुरी विश्वरुपे. सौ.रेखा कापडिया.
सदस्या. प्रभारी अध्यक्षा.