श्रीमती अल्का पटेल, सदस्या यांचे आदेशांन्वये.
-आदेश-
(पारित दिनांक : 15.12.2012)
1. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत सदर तक्रार दाखल केलेली असून, तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांकडून मौजा चिखली खूर्द, ख.क्र.42/2, प.ह.क्र. 30, एकूण क्षेत्रफळ 4000 चौ.फु. (दोन्ही तक्रारकर्त्यांना अर्धा-अर्धा भाग), प्लॉट क्र. 23 अ हा दि.18.08.2008 ला रु.50,000/- मध्ये विकत घेण्याचा करार केला. तक्रारकर्त्यांनी संपूर्ण किंमत गैरअर्जदारास अदा केली. याचवेळेस तक्रारकर्त्यांना प्लॉटचा ताबा देण्यात आला व ते त्याचा उपभोग घेत आहे. गैरअर्जदारानुसार भुखंडाचे नियमितीकरण झाल्यावर तीन वर्षाचे आत ते विक्रीपत्र करुन देतील. परंतू बराच काळ गेल्यानंतरही विक्रीपत्र करुन न दिल्याने, तक्रारकर्त्यांनी चौकशी केली असता, त्यांना असे कळले की, भुखंडाचे नियमितीकरण करण्यात आलेले आहे. तरीही गैरअर्जदार विक्रीपत्र करुन देत नव्हते. म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला नोटीस दिली. सदर नोटीसचे गैरअर्जदाराने उत्तर दिले. परंतू विक्रीपत्र करुन न दिल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन विवादित प्लॉटचे विक्रीपत्र करुन मिळावे, नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला पाठविली असता, त्यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी मंचासमोर येऊन तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.11.09.2012 रोजी पारित केला.
3. सदर तक्रार युक्तीवादाकरीता आल्यानंतर, तक्रारकर्त्याचे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या प्रतीचे व तक्रारीचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. गैरअर्जदार व तक्रारकर्ता यांचेमध्ये झालेल्या विक्रीच्या कराराप्रमाणे, गैरअर्जदार प्लॉटचे नियमितीकरण झाल्यावर विक्रीपत्र करुन देणार होता. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे प्लॉटचे नियमितीकरण झालेले आहे आणि त्याबाबत त्याने दि.25.10.2011 रोजी नोटीसद्वारे गैरअर्जदारास कळविलेले आहे व गैरअर्जदाराने या नोटीसला उत्तर देऊन संस्था विक्री करुन देण्यास तयार आहे, परंतू आजपर्यंत संस्थेने या प्लॉटची विक्री करुन देण्याचा ठराव न घेतल्यामुळे, तसेच त्याबाबत काही अडचणी असल्यामूळे आपणास विक्री करुन देता आली नाही. असे कारण नमूद केलेले आहे. सदर उत्तर हे दि.02.01.2012 रोजीचे असून, त्यानंतर गैरअर्जदाराने आजतागायत विक्री करुन देण्याचा ठराव घेतलेला नाही आणि त्यांना कोणत्या अडचणी आहेत तेसुध्दा नमूद केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराची कृती ही विक्रीपत्र काही ना काही कारण सांगून टाळण्याची दिसून येते. गैरअर्जदाराच्या या कृतीने तक्रारकर्त्यांना त्यांच्या प्लॉटची संपूर्ण किंमत अदा करुनही प्लॉटच्या वैधानिक हक्कापासून वंचित राहावे लागले, त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. तसेच मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली, त्यामुळे तक्रारकर्ते मानसिक त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करीता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी मौजा चिखली खूर्द, ख.क्र.42/2, प.ह.क्र. 30, एकूण क्षेत्रफळ 4000 चौ.फु. (दोन्ही तक्रारकर्त्यांना अर्धा-अर्धा भाग), प्लॉट क्र. 23 अ चे विक्रीपत्र दोन्ही तक्रारकर्त्यांना करारात नमूद वर्णनाप्रमाणे करुन द्यावे. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्यांची स्वतः सोसावा.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला मानसिक त्रासाची भरपाई म्हणून रु.5,000/- प्रत्येकी व तक्रारीचा खर्चादाखल रु.2,000/- द्यावे.
4) उपरोक्त आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.