निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 08/08/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 10/09/2013
तक्रार निकाल दिनांकः- 07/02/2014
कालावधी. 04 महिने. 28 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
1 जनाबाई भ्र.सतीश भताने, अर्जदार
वय 40 वर्षे,धंदा.घरकाम. अॅड.एस.एन.व्यवहारे
रा.रायवाडी ता.चाकुर जि.लातुर.
2 रवि पिता सतीश भताने,
वय 22 वर्षे,धंदा शिक्षण,
3 सुप्रिया उर्फ बेबी सतीश भताने,
वय 18 वर्षे, धंदा शिक्षण,
4 आदित्य पिता सतीश भताने,
वय 15 वर्षे, धंदा शिक्षण,
अ.पा.क.आई अर्जदार क्रमांक 01. रा.सर्व वरील प्रमाणे.
विरुध्द
1 सक्रेटरी, गैरअर्जदार.
शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.कारेंगाव रोड, गुलशन बाग, स्वतः
परभणी ता.जि.परभणी.
2 व्हि.डी.आष्टुरकर, अॅड.आर.बी.वांगीकर.
ब्रँच मॅनेजर,युनायटेड इंडिया इं.कंपनी.
दयावान कॉम्पलेक्स,परभणी.
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीचा जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा देण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार क्रमांक 1 चे पती व अर्जदार क्रमांक 2, 3, व 4 चे वडील नामे सतीश दत्तात्रय भताने यांचा वाहन अपघातात दिनांक 24/06/2011 रोजी मृत्यू झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती हे वाघधरी ता.गंगाखेड येथे शिक्षक म्हणून हयात असतांना कार्यरत होते, ते आपले काम संपवुन दिनांक 24/06/2011 रोजी वाहन क्रमांक MH-24-K-7704 ने अहमदपूरकडे मुलास भेटण्यासाठी जात असतांना समोरुन येणारी कार क्रमांक MH-26-S-509 च्या चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालवुन अर्जदाराच्या पतीच्या वाहनास जोरदार धडक दिली व सदर अपघातात अर्जदाराच्या पतीस जबर मार लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. अर्जदाराचे म्हणणे की, सदर अपघातावेळी अर्जदाराचे पती आपली मोटार सायकल कमी वेगाने व व्यवस्थितपणे चालवत होते व सदर अपघात हा कार चालकाच्या निष्काळजीपणामुळेच झाला, सदर अपघाता बाबत संबंधीताने अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 97/11 अन्वये कार चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
अपघातानंतर अर्जदाराच्या मयत पतीचे शासकीय रुग्णालय अहमदपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचे मयत पती गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे शिक्षण पतपेढीचे सभासद होते व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या मयत पतीचा जनता अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे पॉलिसी काढली होती, सदर पॉलिसी ही एक लाख रु. ची काढलेली होती.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यू नंतर तिने सदर पॉलिसी अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावचा गैरअर्जदार क्रमांक 1 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे मुदतीत सर्व कागदपत्रासह दाखल केला, परंतु दिनांक 29/11/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पत्र देवुन वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला नाही, म्हणून विमादावा मंजूर करण्याचे नाकारले. गैरअर्जदार विमा कंपनीने जाणीवपूर्वक विमा रक्कम देण्याचे टाळले व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने नुकसान भरपाई मिळावी म्हणून दिनांक 27/04/2012 रोजी मंचासमोर दावा दाखल केला होता, ज्याचा क्रमांक 77/12 असा होता, सदरचे प्रकरण मंचाने अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द कोणतेही स्टेप्स न घेतलेमुळे दिनांक 11/07/2013 रोजी (D.I.D.) खारीज केले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीने जनता अपघात विमा पॉलिसी अंतर्गत अर्जदारास रक्कम न दिल्यामुळे सदरचे प्रकरण दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने अर्जदारास 1 लाख रु. द्यावेत व सदर रक्कमेवर मृत्यू तारखे पासून ते रक्कम मिळे पर्यंत 12 टक्के द.सा.द.शे. प्रमाणे अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 5,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 2,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 13 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये वारसा प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, चार्जशिटची प्रत, जोडपत्र “ अ ”, फिर्याद, R.T. Particular, जीप चालकाचे ड्रायव्हींग लायसेंन्स, टॅक्स पावती, आर.सी. बुकची प्रत, पी.एम.रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, मंचाने खारीज केलेली प्रत, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिलेले प्रत कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारस नोटीस काढण्यात आली, गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे मयत पती हे आमच्या पत पढीचे सदस्य होते व अर्जदाराच्या मयत पतीचा पतपेढी मार्फत जनता अपघात विमा योजने अंतर्गत त्याने गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे विमा काढला होता.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या मयत पतीच्या मृत्यूनंतर विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून मुदतीत अर्जदाराने आमच्या मार्फत विमा कंपनीकडे विमादावा दाखल केला होता.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अपघाता दिवशी पॉलिसी वैध होती, आमचा त्यात काही दोष नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार आमचे विरुध्द नामंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 6 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, विम्यातील अटी व नियमा प्रमाणे विमाकृत वाहन चालवण्यासाठी वैध चालकाची आवश्यकता आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर तो अटीचा भंग होतो व विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधील राहत नाही, शिवाय विमा कंपनीने अर्जदारास कुठलीही त्रुटीची सेवा दिली नाही व अर्जदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करण्याचे कुठलेही आवश्यक कारण नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदारास वेळोवेळी सुचना करुनही अर्जदाराने मयताचे ड्रायव्हींग लायसेंन्स दाखल केले नाही. त्यामुळे विमा कंपनीने सदरचे आवश्यक ते कागदपत्र (ड्रायव्हींग लायसेंन्स ) अर्जदाराने दाखल न केल्यामुळे कायद्याचे पालन करुन व योग्य ते कारण दर्शवुन अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 8 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफीयतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराची सदरची तक्रार मंचासमोर चालवण्यास
योग्य आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदाराने दाखल केलेल्या प्रस्तुत तक्रारीचे अवलोकन केले असता, त्याने स्वतः असे म्हंटले आहे की, अर्जदाराने नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंचासमोर दिनांक 27/04/2012 रोजी तक्रार दाखल केली होती, ज्या तक्रारीचा क्रमांक 77/12 असा होता, सदरचे प्रकरण मंचाने अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द कोणतेही स्टेप्स न घेतल्यामुळे दिनांक 11/07/2013 रोजी डी. आय. डी. केले होते, व सदरची बाब नि.क्रमांक 4/12 वर दाखल केलेल्या तक्रार क्रमांक 77/12 च्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराने परत त्याच कॉज ऑफ अॅक्शन वर सदरची तक्रार परत एकदा दाखल केली आहे. मंचाने एकदा आदेश दिल्यानंतर परत त्याच आदेशाच्या विरुध्द Review करण्याचे अधिकार मंचास नाही, असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर चालवणे योग्य नाही. व ती खारीज करणे योग्य आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.