श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 30 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार बँकेत नवीन बचतखाते उघडले होते. दिनांक 10/12/2008 रोजी नाबार्डच्या भविष्य निर्माण बॉन्डसाठी तक्रारदारांनी अर्ज केला होता व चेक नाबार्डला दिला होता. चेक क्र.22896 रक्कम रुपये 8,50,000/- चा होता. दिनांक 9/1/2009 रोजी तक्रारदार त्यांची व त्यांच्या मुलाची सही व्हेरिफाय करण्यासाठी बँकेत गेले असता, तक्रारदारांची सही कॉम्प्युटरवर स्कॅन केलेली नसल्याचे बँकेच्या मॅनेजरच्या लक्षात आले. तक्रारदारांनी सहीच्या नमुन्याचा फॉर्म भरुन बँकेत नेऊन दिला व सही स्कॅन करुन घेतली तसेच पासबुकही अपडेट करुन घेतले. त्यावेळी नाबार्डला दिलेला चेक खात्यात पैसे असून सुध्दा परत गेल्याचे आढळून आले. तक्रारदारांना अर्ज नामंजुर झाल्याचे कळले व दिनांक 15/1/2009 रोजी बॉन्ड पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असून प्रत्येक बॉन्डची किंमत रुपये 8500/- वरुन रुपये 8750/- करण्यात आल्याचे कळले. नाबार्डला विनंती करुन तक्रारदारांनी परत आलेला चेक मागवून घेतला व दिनांक 28/1/2009 रोजी रुपये 8750/- प्रमाणे 92 युनिट्स खरेदी केले. त्यामुळे तक्रारदारांचे 92 x 250 = रुपये 23,000/- चे नुकसान झाले. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार बँकेकडून रक्कम रुपये 23000/- दिनांक 28/1/2009 पासून 18 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई पोटी रुपये 7000/- मिळावेत व ही रक्कम संबंधित कर्मचा-यांकडून वसूल करण्यात यावी, बँकेकडून माफीपत्र, तक्रारीचा खर्च रुपये 1000/- मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. नवीन बचत खाते उघडण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. परंतू तक्रारदारांच्या विनंतीवरुन बचतखाते तात्काळ उघडून देण्यात आले होते. सही स्कॅन झाल्याची खात्री केल्यावरच तक्रारदारांनी चेक दयावयास हवा होता. जाबदेणार यांच्या बँकेच्या प्रिमायसेस मध्ये सुचना लावण्यात आलेल्या आहेत. त्यातील 2 नंबरच्या सुचनेत शाखेने सही स्कॅन केलेली असल्याची खात्री करुन घेण्याबाबत लिहीण्यात आलेले आहे. चेक दिल्यानंतर दिनांक 9/1/2009 रोजी तक्रारदार सही स्कॅन झाल्याची खात्री करण्यासाठी आले होते. सहया स्कॅनिंगसाठी वेळ लागतो. तक्रारदारांचे हीत लक्षात घेऊनच “other reasons” म्हणून चेक डिसऑनर करण्यात आलेला होता. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. ती तांत्रीक अडचण होती. जाबदेणार यांनी नमूद केलेल्या सुचना क्र.12 नुसार दोन दिवसात डेबिट/क्रेडिट व्यवहार पडताळून पहावेत व त्रुटी असल्यास शाखेला कळविण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदार जर 12/12/2008 रोजीच शाखेत आले असते तर तक्रारीचे निवारण लगेचच करण्यात आले असते, नाबार्डच्या नावे डी.डी विना कमिशन देण्यात आला असता. बॉन्ड दिनांक 18/12/2008 पर्यन्त रुपये 8500/- दराने उपलब्ध होते व त्याच दराने परत दिनांक 1/1/2009 रोजी उपलब्ध होणार होते. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडे दिनांक 9/1/2009 रोजी आले, तोपर्यन्त बॉन्डची किंमत रुपये 8750/- झालेली होती. बॉन्डची खरेदी करणे तक्रारदारांवर बंधनकारक नव्हते. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही, म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात. लेखी जबाबासोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल करण्यात आली.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला. उभय पक्षकारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी नाबार्ड कडे 100 बॉन्डस प्रत्येकी रुपये 8500/- प्रमाणे खरेदी करण्यासाठी जाबदेणार बँकेचा चेक दिला होता, त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असतांनाही “other reasons” म्हणून चेक डिसऑनर झाला हया बाबी निर्वीवाद आहेत. तसेच सही स्कॅनिंग झालेली नसल्यामुळे चेक डिसऑनर झाला होता हे त्यामागील मुळ कारण होते ही बाबही निर्वीवाद आहे. जाबदेणार यांनी लेखी जबाबासोबत शाखेमध्ये ज्या सूचना लावलेल्या आहेत त्याची प्रत दाखल केलेली आहे. त्यातील क्र.2 च्या सुचनेनुसार सही स्कॅन झालेली असल्याची खात्री करुन घ्यावी तसेच क्र.12 वर डेबिट/क्रेडिट व्यवहार 2 दिवसात तपासून पहावा व त्रुटी असल्यास शाखेस कळवावे असे नमूद करण्यात आलेले आहे. परंतू जरी ग्राहकाने सही स्कॅनिंग झालेली असल्याची खात्री करणे बँकेला अपेक्षित असले, तरी देखील प्रत्यक्षात ग्राहकाची सही स्कॅनिंग करण्याचे काम बँकेचे असते. प्रस्तूत प्रकरणात जाबदेणार बँकेकडून तक्रारदारांची सही स्कॅनिंग करावयाची राहून गेलेली असल्याचे निदर्शनास येते. तसेच व्यवहारांची पडताळणी दोन दिवसात करुन घ्यावी अशी सुचना जरी बँकेनी लिहीलेली असली तरी देखील ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची कस्टोडियन ही बँक असते, प्रामुख्याने बँकेने काळजी घेणे अपेक्षित असते. केवळ सुचना लावून बँक आपली जबाबदारी टाळू शकत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे. प्रस्तूत प्रकरणात तक्रारदारांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असतांनाही केवळ सही स्कॅनिंग अभावी चेक डिसऑनर झाल्याचे दिसून येते. ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांनी नाबार्ड यांचे दिनांक 16/7/2009 चे पत्र दाखल केले आहे. सदरहू पत्रात इश्यु ओपनींग दिनांक 15/1/2009 नमूद करण्यात आलेला असून बॉन्डची प्रत्येकी किंमत रुपये 8750/- नमूद करण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी दिनांक 28/1/2009 रोजी नाबार्डचे 92 बॉन्डस प्रत्येकी रुपये 8750/- एकूण रुपये 8,05,000/- किंमतीचे खरेदी केलेली दिसून येते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे तक्रारदारांना बॉन्डस खरेदी मध्ये 92 x 250 = रुपये 23,000/- चे नुकसान झाल्याचे दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 23000/- दयावेत असा आदेश देण्यात येत आहे. तसेच जाबदेणार यांनी तक्रारदारांना शारिरीक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 6000/- दयावेत असा आदेश देण्यात येत आहे. बँकेच्या विशिष्ट कर्मचा-यामुळे तक्रारदार ग्राहकांचे नुकसान झाले हे तक्रारदारांनी सिध्द केलेले नसल्यामुळे तक्रारदारांची कर्मचा-याकडून दंड वसूल होण्याची मागणी नामंजुर करण्यात येते.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 23000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या अदा करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 6000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.