श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 18/02/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांचेकडे गैरअर्जदाराचे खाते क्र. 4006661013981415 असून त्यावर गैरअर्जदार त्यांना क्र. 4006661018795398 कार्ड दिले होते. वर्ष 2006 मध्ये तक्रारकर्त्याला रु.63,000/- देणे होते. तक्रारकर्त्यांना कार्डची गरज भासत नसल्याने त्यांनी ते वापरणे बंद केले. अशा परिस्थितीत गैरअर्जदाराचे प्रतिनीधी त्यांचेकडे आले व रु.13,000/- मध्ये समझोता करुन सदर खाते बंद होणार व काहीही देणे राहणार नाही असे सांगितल्याने, सदर खात्यामध्ये तडजोड होऊन तक्रारकर्त्याने रु.4,300/- चे दि.19.10.2006 चे तीन धनादेश गैरअर्जदाराच्या प्रतिनीधीस दिले व त्यांनी त्याबाबत पोच पावती दिली. यानंतरही गैरअर्जदाराकडून वारंवार एसबीआय कार्डसचे बील तक्रारकर्त्याला आले व नंतर पाठक अँड असोशिएट यांची 28.10.2009 रोजी नोटीस आली व त्याद्वारे रु.1,43,614.82 ची मागणी करुन 15 दिवसाचे आत भरण्यास सांगितले अथवा कार्यवाही करण्यात येईल असेही त्यात नमूद केले होते. सदर नोटीसला उत्तर देऊन तक्रारकर्त्याने तडजोडीची वस्तूस्थिती विषद करुनही, 25.12.2010 रोजी गैरअर्जदाराने रु.2,23,034.57 ची मागणी केली. तक्रारकर्त्याचे मते गैरअर्जदाराची कृती ही अनुचित व्यापार पध्दतीमध्ये मोडते. त्यामुळे त्यांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, गैरअर्जदाराच्या अनुचित प्रकाराबद्दल रु.5,00,000/- ची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने एकूण 11 दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. सदर प्रकरणाची नोटीस गैरअर्जदारांना देण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 3 ने संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व नमूद केले की, गैरअर्जदाराने दि.16.10.2006 रोजी तक्रारकर्त्यास पत्र देऊन, थकीत खात्याची तडजोड एकमुस्त रकमेनुसार करण्याकरीता पत्र दिले होते व त्यात ‘विदाऊट प्रीज्युडाईस’ नमूद केले होते व त्या अनुषंगाने रु.13,000/- एकमुस्त घेण्यात आले व ऑफर ही विशेष योजनेद्वारे देण्यात आली होती. त्यांच्याकडे तडजोड झाल्याबाबत पोच प्राप्त नव्हती व तक्रारकर्त्याने दिलेल्या नोटीसच्या उत्तरानंतर त्यांना कधीही त्रास दिला नाही. तसेच 19.09.2011 ला ‘नो ड्युज’ चे पत्र दिले. तक्रारकर्त्याला 25.12.2010 चे पत्र चुकून देण्यात आले होते व ती कार्यालयीन चूक होती. त्यामुळे तक्रारकर्त्याला मुद्दाम त्रास देण्याचा गैरअर्जदाराचा उद्देश नव्हता, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रारीतील मागणी मान्य करु नये व तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 2 ने नोटीस मिळून, लेखी उत्तर दाखल करण्याकरीता पूरेशी संधी देऊनही, तक्रारीस लेखी उत्तर दाखल न केल्याने मंचाने ‘विना लेखी जवाब’ कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
4. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर, तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. गैरअर्जदारांना युक्तीवादाकरीता वारंवार संधी देऊनही ते गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
5. तक्रारकर्त्याकडे गैरअर्जदाराचे खाते क्र. 4006661013981415 असून त्यावर गैरअर्जदार त्यांना क्र. 4006661018795398 कार्ड दिले होते, त्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो.
6. गैरअर्जदाराने लेखी उत्तरात तक्रारकर्त्याची शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई वगळता इतर सर्व बाबी मान्य केल्या आहेत. दि.16.10.2006 चे पत्रानुसार “One time settlement” या योजनेअंतर्गत तक्रारकर्त्यास रु.13,000/- चा भरणा करण्याबाबत सुचित करण्यात आले व त्यानुसार तक्रारकर्त्याने तीन धनादेशाद्वारे रक्कम भरल्याचे गैरअर्जदाराने मान्य केले आणि सदर बाब दस्तऐवजावरुन सिध्द होते. तक्रारकत्याचे क्रेडीट कार्ड खाते “One time settlement” या योजनेअंतर्गत 31.10.2006 ला संपुष्टात आले. असे असतांना सुध्दा गैरअर्जदार तक्रारकर्त्यास वारंवार क्रेडीट कार्ड बिल पाठवित होते. तसेच गैरअर्जदाराने त्याचे वकिलामार्फत नोटीस पाठविला होता, त्याला तक्रारकर्त्याने रीतसर उत्तर दिले. गैरअर्जदाराने परिच्छेद क्र. 8 चे उत्तरात त्यांची झालेली चूक स्पष्टपणे मान्य केली आहे व सदर चूक ही हेतूपुरस्सर नसून कार्यालयीन चूक आहे असे नमूद केले आहे. 30.10.2006 ला “One time settlement” या योजनेअंतर्गत क्रेडीट खाते बंद होऊनसुध्दा गैरअर्जदाराने पाठक अँड असोशिएटद्वारे 28.10.2010 ला नोटीस पाठविला. नोटीसचे उत्तर देऊनसुध्दा वारंवार बिल पाठविण्यात येत होती. 25.12.2010 ला रु.2,23,034.57 चे बिल पाठविले. तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर गैरअर्जदाराने मान्य केले आहे की, त्याने 5 वर्षानंतर 19.09.2011 तक्रारकर्त्यास नोटीस पाठविली. यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराची ग्राहक सेवेत गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे व क्रेडीट कार्ड खाते बंद झाल्यानंतर सुध्दा वारंवार रकमेची मागणी करणे व वकिलांमार्फत नोटीस पाठविणे ही गैरअर्जदाराने अवलंबिलेली पध्दत बँकींग व्यवहारास अभिप्रेत नसल्यामुळे अनुचित व्यापार प्रथेत मोडते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून गैरअर्जदाराच्या गैरकायदेशीर कृतीमुळे निश्चितच तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला या तक्रारकर्त्याच्या म्हणण्याशी मंच सहमत आहे व त्याकरीता नुकसान भरपाई रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
3) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावी.