निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 03/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 03/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 18/07/2013
कालावधी 03 महिने. 15 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रभाकर रामंचद्र बोरसे, अर्जदार
वय 74 वर्षे. धंदा.निवृत्त शिक्षक, पेंटींगचा व्यवसाय. अड.एस.एन.वेलणकर.
रा.पेठ मोहल्ला,गणेश मेडीकल जवळ,शिवाजी चौक.परभणी.
विरुध्द
सारंग भिकाजी साळवी, गैरअर्जदार.
वय 45 वर्षे.धंदा संचालक,विकल्प इंडीया मुक्ती केंद्र.
परभणी रा.सारजा निवास,शारदा महा.समोर,
दर्गा रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष )
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचे ठेव रक्कम परत देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे.त्याबद्दलची सदर तक्रार अर्जदाराने दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा निवृत्त कला शिक्षक आहे व तो सध्या पेंटरचा व्यवसाय परभणी येथे करतो गैरअर्जदार परभणी येथील शनी मंदीरा जवळ ललीत कला या संस्थेच्या व सर्वोदय सेवा मंडळाच्या परीसरात “विकल्प इंडिया मुक्ती केंद्र परभणी” या नावाने संस्था चालवतात. व गैरअर्जदार स्वतः त्याचे संचालक आहेत.व त्याच परीसरात अर्जदाराने पेंटरच्या व्यवसायासाठी एक जागा किरायाणे घेतली आहे.व त्यामुळे अर्जदाराचे गैरअर्जदारा सोबत दोन - तीन वर्षांपासून ओळखीचे व स्नेहाचे संबंध होते.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सन 2011 मध्ये अर्जदारास गैरअर्जदारराने असे सांगीतले की,त्याची एक एन.जी.ओ.संस्था असून (Non Government Organization) वेगवेगळी योजना राबविते व जर अर्जदाराने काही पैसे त्यात गुंतविले तर त्यास योजनेचा लाथ मिळेल. व सदर ठेव रिफंडेबल असेल.गैरअर्जदाराच्या शब्दावर विश्वास ठेवुन व उतार वयात आर्थिक लाभ मिळेल या हेतून अर्जदाराने दिनांक 29/03/2011 रोजी 10,000/- रुपये रोख गैरअर्जदारास दिले व त्याने त्याच्या संस्थेची पावती क्रमांक 11 रिफंडेबल डिपॉझिट असे लिहून अर्जदारास दिली त्यानंतर अर्जदाराने सतत एक ते दिड वर्षाच्या कालावधीत त्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळणार व व्याज किती मिळेल या विषयी विचारणा केली, परंतु गैरअर्जदाराने काही ना काही कारण सांगुन टाळाटाळ केली व सदरच्या कोणत्याच योजने विषयी गैरअर्जदाराने अर्जदारास माहिती दिली नाही, त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास भेटावयाचे देखील टाळले. त्यामुळे गैरअर्जदाराचे हेतू बद्दल अर्जदारास शंका निर्माण झाली. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरची ठेव रक्कम परत मिळण्यासाठी गैरअर्जदाराकडे सतत पाठपुरावा केला, परंतु त्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही,म्हणून शेवटी दिनांक 15/12/2012 रोजी स्पष्टपणे ठेव परत करण्याची मागणी केली असता, गैरअर्जदाराने पैसे परत देण्यास नकार दिला. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे व मानसिकत्रास दिला आहे. म्हणून सदरची तक्रार दाखल करुन अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचे तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश देण्यात यावा की, अर्जदाराचे रु.10,000/- दिनांक 29/03/2011 पासून रक्कम देई पर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्यात यावे, व नुकसान भरपाई व मानसिकत्रासा बद्दल नुकसान भरपाई रु.1,000/- व तक्रारीचा खर्च
रु.1,000/- गैरअर्जदाराकडून मिळून देण्यात यावे, मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 4 वर 1 कागदपत्राच्या यादीसह 1 कागदपत्र सादर केले आहे.त्यामध्ये गैरअर्जदाराने विकल्प इंडीया मुक्ती केंद्र परभणी या संस्थेचा संचालक म्हणून अर्जदाराचा रु.10,000/- रिफंडेबल डिपॉझिटची पावती क्रमांक 11 ची सत्यप्रत कागदपत्र दाखल केले आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार सदरची नोटीस तामिल होवुनही गैरअर्जदार मंचासमोर हजर नाही,त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फाचा आदेश पारीत करण्यात अला.व सदरची तक्रार मंचाने मेरीटवर निर्णय काढण्याचे ठरविले.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचे रु.10,000/- ठेव रक्कम देण्याचे नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील पावतीवरुन सिध्द होते तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 29/03/2011 रोजी रु.10,000/- ठेव रक्कम जमा केली होती ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.तसेच सदरची ठेव ही रिफंडेबल डिपॉझिट होती ही बाब देखील 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने मंचाची नोटीस तामिल होवुनही गैरहजर राहून व लेखी जबाब दाखल करण्याचे टाळून एक प्रकारे अर्जदाराची तक्रार ही मान्य केल्या सारखीच आहे.सदरची डिपॉझिट गैरअर्जदाराने अर्जदारास रिफंडेबल डिपॉझिट लिहिलेली असल्या कारणाने परत करणे आवश्यक आहे,परंतु गैरअर्जदाराने देण्याचे टाळून एकप्रकारे अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे हे सिध्द होते,परंतु अर्जदाराचे 12 टक्के व्याजासह रक्कम दिनांक 29/03/2011 पासून ते रक्कम देई पर्यंत मागणी मंचास योग्य वाटत नाही.कारण अर्जदार व गैरअर्जदारा मध्ये किती टक्के देण्याचा करार झाला होता हे मंचासमोर कागदपत्रे दाखल झाले नाही.म्हणून अर्जदार त्याची दिनांक 29/03/2011 रोजी गैरअर्जदार रु.10,000/- ठेव रक्कम मिळण्यास पात्र आहे.गैरअर्जदाराने अर्जदारास त्याची ठेव रक्कम परत न करुन मानसिकत्रास दिला आहे.असे मंचास वाटते,म्हणून अर्जदार हा मानसिकत्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.असे मंचास वाटते.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत रु.10,000/- फक्त (अक्षरी रु.दहाहजार फक्त ) द्यावे.
3 या खेरीज मानसिकत्रासापोटी रु.500/- फक्त (अक्षरी रु.पाचशे फक्त) तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.500/- फक्त ( अक्षरी रु.पाचशे फक्त) गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर. मा.सदस्य मा.अध्यक्ष