(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्ती यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ती यांनी दिनांक 30.11.2013 रोजी स्कोडा फेबीया हे चारचाकी वाहन अहमदनगर येथील स्कोडा शोरुम मधून खरेदी केले. खरेदी करतेवेळी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही अहमदनगरमध्ये उपलब्ध असताना सामनेवाला यांनी औरंगाबाद विभागातील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे पॉलीसी वैयक्तीक कमिशनसाठी दिशाभूल करुन सामनेवाला यांनी उतरविली व त्यासाठी सामनेवाला यांनी तक्रारकर्तीस खोटा पत्ता दिला व तक्रारकर्तीस सेवा औरंगाबाद येथे घेण्यास भाग पाडले. व त्यामुळे तक्रारकर्तीस विनाकारण औरंगाबाद येथे जाण्याचा खर्च रुपये 30,000/- इतका झाला. तक्रारकर्तीस कोणत्याही स्वरुपाची लाभाची माहिती न देता पॉलीसी उतरविण्यात आली आहे. तक्रारकर्तीने सामनेवालास कॅशलेस इन्शुरन्स उतरविण्याचे सांगून सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारकर्तीची दिशाभूल करुन नॉर्मल पॉलीसी उतरविली. त्यामुळे तक्रारकर्तीला सामनेवालाच्या झालेल्या बिलामध्ये 20,000/- रुपयाचे नुकसान झालेले आहे. दिनांक 10.07.2014 रोजी तक्रारकर्तीचे वाहनाचा अपघात झाला असल्याने तक्रारकर्तीस सामनेवालाचे शोरुममध्ये गाडी दुरुस्तीकरता दिली. सामनेवालाने तक्रारकर्तीचे गाडीची दुरुस्त करण्याकरीता जवळ जवळ 2 महिने उशीर केला व तक्रारकर्तीला बाहेरुन ट्रॅव्हल्सकडून गाडी भाडयाने घेऊन वापरावी लागल्यामुळे तक्रारकर्तीला 60,000/- रुपयाचे नुकसान झाले. इन्शुरन्स कंपनीला सामनेवाला यांनी गाडी दुरुस्तीकरीता रुपये 4,55,000/- रुपयाचे कोटेशन देण्यात आले. त्या पैकी मंजूर असलेल्या कोटेशनप्रमाणे रुपये 1,10,000/- चे पार्ट बसविण्यात आले. बाकीचे पार्ट मंजूर असून रुपये 21,000/- चे पार्ट बसविले नाही. सदर पार्ट मंजूर असून देखील दुस-या गाडीस बसविण्यात आल्याने त्याचा लाभ घेतला. व जवळपास रुपये 2,00,000/- ची अफरातफर केल्याचे दिसून येते व गाडीचे जवळ जवळ 1,59,000/- चे काम सामनेवालाने व्यवस्थित दुरुस्त केले नाही. उदा. कलर रिपेंटींगचे काम व इंजीन व्हाब्रेशनचे काम दुरुस्त केले नसल्याने तक्रारकर्तीला पुन्हा बाहेरुन गाडीचे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी रुपये 1,59,000/- एवढा खर्च येणार आहे. सामनेवाला यांनी तक्रारकर्तीस दिनांक 26 ऑगस्ट 2014 रोजी 1,97,882/- चे देयक दिले व ज्यावेळेस तक्रारकर्तीकडून त्या बिलाची पुर्तता करण्यात आली, त्यावेळी सामनेवाला यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2014 रोजी रक्कम रुपये 1,87,083/- चे बिल दिले. त्यानंतर परत तक्रारकर्तीने अविश्वास दाखविल्यानंतर सामनेवालाने दिनांक 12 सप्टेंबर 2014 रोजी रक्कम रु.1,68,094 चे बिल दिले. सुरुवातीच्या बिलापेक्षा जवळपास 29,000/- रुपयाचा फरक सामनेवालाचे देयकामध्ये निघाला, यावरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांनी तक्रारकर्तीची फसवणूक केलेली आहे. सामनेवाला यांनी बसविलेले पार्ट नं.39 ग्लास ब्ल्यु अॅपलीक या पार्टची मार्केट व्हॅल्यु 2500 ते 3500/- इतकी असतांना सामनेवाला यांनी त्या पार्टची किंमत तक्रारकर्तीस रुपये 9,400/- अशी वाढीव लावलेली आहे. व 21,473/- चे स्क्रॅप मटेरियल पार्ट सामनेवालाने तक्रारकर्तीस मागे दिलेले नाहीत. तक्रारकर्तीचे फरकाची रक्कम रुपये 75,000/- सामनेवालाने भरण्यास सांगितले असता, वास्तवात फरकाची रक्कम केवळ 15,000/- होती. दिनांक 27.08.2014 रोजी तक्रारकर्तीस सामनेवाला यांनी दिलेले देयकावर गाडीचे किलो मीटर 9350 असे तक्रारकर्तीने चेक केलेले होते हे बरोबर होते व दिनांक 18.09.2014 रोजी गाडी ताब्यात घेतली त्यावेळी गाडीची किलो मीटर 11341 असे होते. व त्यामुळे तक्रारकर्तीची गाडी शोरुममध्ये कामासाठी जवळ जवळ 2000 किलोमीटर वापरली. व त्याचा मोबदला 15/- रुपये किलोमीटर प्रमाणे तक्रारकर्तीस रुपये 30,000/- एवढे भाडे सामनेवाला यांचेकडून मिळावे. वरील प्रमाणे रक्कम वसुल होऊन मागण्याचा तक्रारकर्तीने दिनांक 10.10.2014 रोजी वकीलामार्फत नुकसान भरपाईची रक्कम देण्याबाबत 3,30,000/- ची मागणी सामनेवालाकडून केली. परंतु सामनेवालाने नोटीस मिळून देखल कोणतीही नुकसान भरीपाई दिली नाही. व गाडीची दुरुस्ती केली नाही. व सामनेवाला यांनी दिनांक 24.11.2014 रोजी त्यांचे वकीलामार्फत तक्रारदार यांचे नोटीसला खोटे नोटीस उत्तर पाठविले. सामनेवाला यांनी तक्रारकर्तीस न्युनत्तम सेवा दर्शविली असल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
3. सामनेवाला यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारीरीक, मानसिक त्रासापोटी तसेच औरंगाबाद येथे पॉलीसी कंपनीकडे विनाकारण जाणे येणे करावे लागले, नॉर्मल पॉलिसी उतरविली त्याचा खर्च, व तक्रारकर्तीची गाडी उशीरा दुरुस्त दिली. इन्शुरन्ससाठी कंपनीकडून मंजुर पार्ट मधून 21,000/- चे पार्ट बसविले नाहीत व सामनेवालाने कलर रिपेंटींगचे काम व इंजिन व्हाईब्रेशनचे काम व्यवस्थित केले नाही. तसेच स्क्रॅप मटेरिअलचे पार्टची रक्कम दिली नाही. व तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
4. तक्रारीचा प्राथमिक युक्तीवाद ऐकून तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाला यांनी नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले व निशाणी 13 वर कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी कैफियतीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्ती हिने सदर वाहनाचा वाणिज्य वापराकरीता खरेदी केलेले असून ते त्याचा वापर लाभ मिळण्याकरीता केलेला असून तक्रारकर्ती ही ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नाही. सामनेवालाने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारकर्तीने जेव्हा वादातील वाहन सामनेवालाकडे दुरुस्तीकरता दिले, त्यावेळी जॉब कार्ड नंबर 001438 वर डीएमएस प्रणालीप्रमाणे वाहन 11256 किलोमीटर चाललेले होते अशी नोंद घेण्यात आली आहे. तक्रारकर्तीने विमा दावा दाखल केल्यानंतर तक्रारकर्तीस काही रक्कम वाहनाचे दुरुस्तीकरता भरण्यास सांगितले होते. परंतू सामनेवालाने ती रक्कम भरलेली नाही व तक्रारकर्तीला वाहनाचे दुरुस्ती झाल्यानंतर रक्कम भरण्यात येईल असे आश्वासन दिले. त्या आश्वासनावर सामनेवाला यांनी तक्रारकर्तीचे अपघातातील वाहनाचे काम सुरु केले व इन्शुरन्स निरीक्षकासमोर तसेच तक्रारकर्तीचे पती श्री.दत्तात्रय बेरड यांचे समक्ष वाहनास येणारा खर्च आकरण्यात आला. तक्रारकर्ती हे सामनेवाला यांचे वर्कशॉप समोर राहत असल्याने त्यांचे समोरच वाहनास लागणारे पार्टस लावण्यात आले. सदर वाहनाचे रबर, प्लॅस्टीक, इलेक्ट्रीक पार्ट पॉलीसीचे अॅग्रीमेंटप्रमाणे देता येणार नाही म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा 100 टक्के मंजुर झालेला नाही. कोणत्याही वाहनाची निर्मात्यांनी वॉरंटीचे नियम वाहनाचा अपघात झाल्यानंतर लागू होत नाही. म्हणून सामनेवालाने पार्टची ऑर्डर स्कोडा कंपनीला दिनांक 17.07.2014 ला दिले व दिनांक 25.07.2014 व 26.07.2014 ते पार्ट सामनेवालाचे वर्कशॉपकडे आले. दिनांक 27.07.2014 रोजी इन्शुरन्स सर्व्हेअर यांनी वाहनाची पडताळणी केली व लेबर चार्ज रुपये 64,000/- आकारण्यात आले. त्यावर तक्रारकर्तीचे पतीची स्वाक्षरी आहे. तक्रारकर्तीचे पतीचे तोंडी व लेखी संमती घेतल्यानंतर व तक्रारकर्तीचे वाहनाचे कामास सुरुवात करण्यात आली. सदर वाद हा ग्राहक वाद नसल्याने तसेच वाहनात कोणताही निर्मीती दोष नाही. तसेच सामनेवालाने तक्रारकर्तीला कोणतीही न्यूनत्तम सेवा दर्शविलेली नसल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सामनेवालाने पुढे असे कथन केले आहे की, कलम 13 (1) (क) ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे तक्रारकर्तीला वाहनाचे निर्मितीत दोष होता हे सिध्द करणे आवश्यक आहे. फक्त तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, वाहन दुरुस्तीकरता गेले असल्याने नियमाप्रमाणे वाहनाचे पार्टस बदलण्यात आले नाही हे म्हणणे योग्य नाही. सदर तक्रारीत वाहनात तांत्रिक दोष केल्याशिवाय सदर तक्रार नियमाखाली बसत नाही. म्हणून कलम 2 (1) (अ) प्रमाणे योग्य तांत्रिक प्रयोगशाळे मध्ये वाहनाची तपासणी कलम 13 (1) (क) नुसार करणे आवश्यक होते. परंतू त्यांनी तसे केले नाही. तसेच तक्रारकर्ती ही वाहनाचे मालक असून ट्रॅव्हल्स एजन्सी श्रीनाथ कृपा ट्रॅव्हल्स अॅन्ड ट्रान्सपोर्ट या नावाने आहे ही बाब तक्रारकर्ती यांनी सामनेवालाला दिलेल्या धनादेशामध्ये नमुद असल्याने सिध्द होते. ही बाब सदर तक्रारीत तक्रारकर्तीने कुठेही नमुद केलेले नाही. वादातील अपघातातील वाहन हे त्यांनी त्याचे स्वतःचे व कुटूंबाचे उपजिवीकेकरीता खरेदी केलेले आहे म्हणून तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तक्रारकर्तीची तक्रार खोटया स्वरुपाची असल्याने व तक्रारीत खोटी कथने केलेली असल्याने सदरील तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
5. तक्रारकर्तीची दाखल तक्रार, दस्तावेज, सामनेवाला यांची कैफियत /जबाब,, दस्तावेज तसेच उभय पक्षांचे तोंडी व लेखी युक्तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारकर्ती ही सामनेवालाचा “ग्राहक” आहे काय.? | ... होय |
2. | सामनेवालाने तक्रारकर्तीस न्युनत्तम सेवा दिली आहे काय.? | ... नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
6. मुद्दा क्र.1 – तक्रारकर्तीने सामनेवालाकडून वादातील वाहनाचा अपघात झाल्यानंतर सामनेवालाकडे सदर वाहन दुरुस्तीकरीता दिले असून ही बाब तक्रारकर्ती व सामनेवाला यांना मान्य असून तक्रारकर्ती ही सामनेवालाची “ग्राहक” आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.2 – तक्रारकर्तीने सदर तक्रारीत सामनेवालाकडून विमा उतरविला व सामनेवालाने सदर विमा औरंगाबाद येथे असलेल्या विमा कंपनीकडून तक्रारकर्तीला विमा काढून दिला या संदर्भात तक्रारकर्तीने कोणतेही दस्तावेजाचा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीने सदर तक्रारीत सामनेवालाने तक्रारकर्तीचे वाहनामध्ये बसविलेले पार्टचे रक्कम रु.21,000/- चे पार्ट बसविले नाही याचाही पुरावा तक्रारकर्तीने प्रकरणात दाखल केलेला नाही. तसेच सामनेवालाने तक्रारकर्तीचे वादातील वाहनाचे रिपेट, इंजिन व्हायब्रेशनचे काम व्यवस्थित केलेले नाही. या संदर्भात पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्तीने वाहनाचे स्क्रॅप मटेरियल पार्टची किती किंमत निघाली या संदर्भात तक्रारकर्तीने कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्तीने वरील नमुद बाबी सिध्द करण्याकरीता योगय तज्ञ विशेषज्ञाकडून त्यांचे वाहनाची तपासणी त्याचा अहवाल मागवायला पाहिजे होता. परंतू तक्रारकर्तीने सदर प्रकरणात तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही. कोणत्याही वाहनाचे तेथील विशेषज्ञाकडून तपासणी करुन त्या वाहनामध्ये त्रुटी होती किंवा त्यामध्ये दुरुस्ती करते वेळी त्रुटी निर्माण झालेली होती ही बाब सिध्द करु शकले नाही. मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे रिव्हीजन पिटीशन नं.4575/2012 कृष्णपाल सिंग विरुध्द टाटा मोटर्स व इतर या न्याय निवाडयाचा हवाला घेतला. सदर प्रकणात असे सिध्द झालेले आहे की, तक्रारकर्तीने वादातील वाहनाची तांत्रिक तपासणी केली नसल्यामुळे तक्रारकर्ती यांनी तक्रारीत सामनेवालावर लावलेले आरोप सिध्द होत नाहीत. म्हणुन सामनेवालाने तक्रारकर्तीला कोणतीही न्युनत्तम सेवा दिली नाही असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
8. मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्तीची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. या तक्रारीचा खर्च उभय पक्षकार यांनी स्वतः सोसावा.
3. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
4. तक्रारकर्तीस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.