::निकालपत्र::
(पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक –21 एप्रिल,2012 )
1. अर्जदार/तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदार/तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने, गैरअर्जदार जे विकासक आहेत, यांचे सोबत करारपत्र करुन मौजा कवडापूर, ता.जि.नागपूर खसरा क्रमांक-105 व 106 मधील भूखंड क्रमांक-116, क्षेत्रफळ 2153 चौरसफू्ट रुपये-1,22,721/- एवढया किंमतीत विकत घेण्याचा करार दिनांक-04.06.2008 रोजी केला. दि.11.06.2008 रोजी रुपये-20,500/- बयाना राशी दिली. उर्वरीत रक्कम हप्तेवारीने द्यावयाची होती. तक्रारकर्ता/अर्जदाराने बयाना राशी धरुन एकूण रुपये-81,800/- एवढी रक्कम वेळोवेळी गैरअर्जदारास दिली.
3. अर्जदार/तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, गैरअर्जदाराने भूखंडाचे अकृषक रुपांतरण करुन, उर्वरीत रक्कम स्विकारुन, भूखंडाचे विक्रीपत्र करुन देणे गरजेचे होते. तक्रारकर्त्याने या संबधात गैरअर्जदारास वेळोवेळी विनंती केली, मात्र गैरअर्जदाराने कोणतीही कारवाई केली नाही व विक्रीपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास पत्र दिले परंतु त्याचाही उपयोग झाला नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक : 477/2011
4. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीद्वारे करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावाने गैरअर्जदाराने करुन दयावे किंवा आजचे बाजारभावा प्रमाणे भूखंडाचे क्षेत्रफळा प्रमाणे येणारी रक्कम गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास परत करावी असे आदेशित व्हावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासा बद्यल रुपये-50,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- मिळावेत अशी मागणी केली.
5. प्रस्तुत प्रकरणात यातील गैरअर्जदारास रजिस्टर पोस्टाने न्यायमंचाचे मार्फतीने नोटीस पाठविली. मात्र रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविलेली नोटीस तीस दिवसा पेक्षा जास्त कालावधी होऊनही परत न आल्यामुळे तसेच रजिस्टर पोच पावती सुध्दा प्राप्त न झाल्यामुळे, गैरअर्जदारास नोटीस मिळाल्याचे घोषीत करण्यात आले व गैरअर्जदार विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत करण्यात आला.
6. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत बयानापत्र आणि गैरअर्जदाराकडे भूखंडापोटी वेळोवेळी जमा केलेल्या रकमांच्या पावत्या, खाते पुस्तीका, नकाशा असे दस्तऐवज दाखल केलेत.
7. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
ग्राहक तक्रार क्रमांक : 477/2011
8. तक्रारकर्त्याची लेखी तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज आणि त.क.चा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
9. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदारास न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर नोटीस पाठविण्यात आली परंतु गैरअर्जदार न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी कोणतेही लेखी निवेदन सादर केले नाही व कोणताही बचाव केला नाही. तसेच तक्रारकर्त्याचे म्हणणेही खोडून काढले नाही.
10. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन व प्रतिज्ञालेखा वरुन त्यांनी गैरअर्जदारा सोबत मौजा कवडापूर, ता.जि.नागपूर, प.ह.नं.26, खसरा क्रमांक-105 व 106 मधील भूखंड क्रमांक-116 खरेदी बाबतचा व्यवहार दिनांक-04.06.2008 रोजी केला होता व गैरअर्जदारास भूखंडापोटी वेळोवेळी एकूण रक्कम रुपये-81,800/- दिलेली आहे, या बाबी सिध्द झालेल्या आहेत. गैरअर्जदाराने सदर शेतीचे अकृषक वापरा मध्ये रुपांतरण करुन, भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावे करुन देणे गरजेचे होते आणि त्यासंबधीची जबाबदारी गैरअर्जदाराने करारात स्विकारलेली आहे परंतु गैरअर्जदाराने तसे केले नाही आणि त.क.ला दिलेल्या सेवेत त्रृटी ठेवलेली आहे.
11. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1) तक्रारकर्त्याची तक्रार गैरअर्जदारा विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांक : 477/2011
2) गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास त्यांचेतील लेखी करारा प्रमाणे मौजे कवडापूर,
ता.जि.नागपूर येथील खसरा क्रमांक-105 व 106 मधील भूखंड क्रं-116,
क्षेत्रफळ-2153 चौरसफूटाचे विक्रीपत्र, तक्रारकर्त्या जवळून करारात
ठरलेल्या भूखंडाचे किंमती नुसार भूखंडाची राहिलेली उर्वरीत रक्कम
त.क. कडून स्विकारुन नोंदणीकृत खरेदी सदर आदेश प्राप्त झाल्या पासून
तीन महिन्याचे आत त.क.चे नावे करुन द्यावी.
3) उपरोक्त अक्रं-2) प्रमाणे कायदेशीरदृष्टया भूखंडाची खरेदी त.क.चे नावे
करुन देणे गैरअर्जदारास शक्य नसल्यास शासकीय शिघ्रगणक पत्रिके
मध्ये दर्शविल्या प्रमाणे आजचे बाजारभावाने करारातील नमुद भूखंडाची
क्षेत्रफळा प्रमाणे येणारी किंमत आणि त्यातून तक्रारकर्त्याकडून घेणे
असलेली रक्कम रुपये-40,921/- वजा करुन, उर्वरीत रक्कम
तक्रारकर्त्यास सदर आदेश प्राप्त झाल्या पासून तीन महिन्याचे आत
परत करावी, विहित मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास गैरअर्जदार
नुकसानीपोटी तक्रारदारास प्रतीदिन रुपये-100/- प्रमाणे रक्कम देणे
लागतील.
4) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-5000/-
(अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-2000/-
(अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) गैरअर्जदाराने सदर आदेशाची प्रत प्राप्त
झाल्या पासून तीन महिन्याचे आत द्यावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.