श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 27/04/2012)
1. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारासोबत मौजा सुराबर्डी, प.ह.क्र.26, ख.क्र.36 मधील प्लॉट क्र. 103, एकूण क्षेत्रफळ 1453.14 चौ.फु. रु.65,391/- मध्ये घेण्याचा 06.01.2008 रोजी घेण्याचा करार केला व बयानादाखल रु.16,500/- दिले. पुढे वेळोवेळी रु.1358/- मासिक हप्त्याप्रमाणे 36 हप्ते तक्रारकर्त्याने द्यावयाचे होते. तक्रारकर्त्याने एकूण रक्कम रु.47,734/- दिली व त्यादाखल त्यांनी पावत्याही तक्रारकर्त्याला दिल्या. तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम घेऊन प्लॉटचे विक्रीपत्र करण्याची मागणी केली असता, गैरअर्जदारांनी जमिनीची कायदेशीर मोजणी करण्यास व कराराप्रमाणे व्यवहार करण्यास असमर्थ असल्याने, आजच्या बाजारभावाप्रमाणे प्लॉटची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यादाखल तीन धनादेश दिले. सदर धनादेश बँकेत वटविण्याकरीता टाकले असता ते खात्यात पूरेशी रक्कम नसल्याने अनादरीत झाले. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, करारातील शर्तीप्रमाणे उर्वरित रक्कम घेऊन प्लॉटचे विक्रीपत्र गैरअर्जदारांनी करुन द्यावे किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे संपूर्ण किंमत 18% व्याजासह स्विकारल्यापासून परत करावी, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावे, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केल्या.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त. त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा मंचासमोर उपस्थितही झाले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.21.03.2012 रोजी पारित केला. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्कर्ष-
3. सदर प्रकरणी तक्रारकर्त्याची तक्रार दाखल झाल्यावर गैरअर्जदारांनी त्याला उत्तर दिले नाही किंवा तक्रारकर्त्यांचे म्हणणे खोडून काढले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाप्रमाणे पावती दाखल केवळ एकच दस्तऐवज दाखल केला आहे आणि त्याद्वारे बयाना रक्कम रु.16,500/- तक्रारकर्त्यांनी दिलेले आहे असे दिसते. इतर दस्तऐवज तक्रारकर्त्यांनी दाखल केलेले नाही. मात्र गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिलेले धनादेश रु.10,000/-, रु.10,000/- व रु.14,161/- यांच्या प्रती दाखल आहेत. थोडक्यात गैरअर्जदार तक्रारकर्त्यास रु.34,161/- देणे लागत होते हे तक्रारकर्त्यांनी सिध्द केलेले आहे आणि तेवढी रक्कम मिळण्यास ते पात्र आहेत. ज्याअर्थी, तक्रारकर्त्यांनी धनादेश स्विकारले त्याअर्थी, त्यांनी भुखंडावरचा आपला हक्क सोडला. गैरअर्जदारांनी धनादेश देऊनही ते वटले नाही. ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना रु.34,161/- ही रक्कम 28.02.2011 पासून अदाएगीपावेतो द.सा.द.शे. 18% व्याजासह द्यावी.
3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.