निकाल
दिनांक- 24.11.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, प्र.अध्यक्ष )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार हा एशियन मोबाईल सर्व्हीस सेटंर दुकानाचा मालक आहे. ग्राहकांचे मोबाईल सेट दूरुस्तीचे काम करतो. तसेच मोबाईल विक्री व मोबाईलचे सूटे भाग विक्री करतो. तक्रारदाराने दि.4.1.2014 रोजी सामनेवाले यांचे अंतर्गत पावती सिरीयल क्र.74567 अन्वये आर.व्ही. सोल्यूशन्स प्रा.लि. के.पी.एस. स्कूल जवळ, दिल्ली येथे एक कुरिअर पाठविण्यासाठी दिले होते. सदर कूरिअर अंतर्गत 8 मोबाईल, रिपेअंरिग किटस पाठवले होते. वरील वस्तूची किंमत रु.25,000/- होती. सदर कूरिअर अद्यापपर्यत दिल्ली येथे पोहचले नाही. तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक आहेत. सदर वस्तू हया ग्राहकांच्या असून त्या मिळत नसल्यामुळे त्यांना ते मानसिक व आर्थिक ताण देत आहेत. दि.4.2.2014 रोजी चौकशी करण्यासाठी सामनेवाले यांचेकडे गेले असता सामनेवाले यांनी तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर कूरिअर त्यांना मिळाले नाही. सदर कूरिअर सामनेवाले यांनी दिल्ली येथे पाठवले नाही. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक नुकसान होऊन मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे. तक्रारदाराने दि.17..2.2014 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सामनेवाले यांना सदर नोटीस मिळाली परंतु त्यांनी तक्रारदारास सदर साहित्य परत केले नाही. म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तक्रारदारास वस्तूची किंमत रु.25,000/- तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.15,000/- असे एकूण रु.40,000/- परत मिळावेत.
सामनेवाले यांना मंचाची नोटीस मिळून ते हजर झाले पंरतु त्यांनी आपले लेखी म्हणणे विहीत मुदतीत दाखल केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द नो से चा आदेश करण्यात आला. सामनेवाले यांनी नो से चा आदेश रदद करावा म्हणून अर्ज दिला, त्या अर्जावर कॉस्ट लाऊन सदर मंजूर केला. परंतु सामनेवाले यांनी सदर कॉस्टची रक्कम मंचामध्ये जमा केली नाही. म्हणून त्यांचे लेखी म्हणणे ग्राहय धरता येणार नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र तसेच नि.4 अन्वये कागदपत्र दाखल केले आहेत, तक्रारदार यांचे वकिलांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे ही बाब तक्रारदारांनी
सिध्द केली आहे काय ? नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली
आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? नाही.
3. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदाराचे वकील श्री.महाजन यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे एशियन मोबाईल सर्व्हीस सेंटर आहे. मोबाईल दूरुस्ती तसेच मोबाईलची विक्री व मोबाईलचे सूटटे पार्ट विक्री करतो. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे कूरिअर मार्फत दि.04.01.2014 रोजी पावती क्र.74567 अन्वये आर.व्ही. सोलयूशन्स दिल्ली येथे कूरिअर पाठवले. सदर करिअर मध्ये 8 मोबाईल, रिपेअरिंग किटस पाठवले होते. त्यांची किंमत रु.25,000/- होती. सदर कूरिअर हे आर.व्ही सोल्यूशन दिल्ली येथे अदयापपर्यत पोहचल्या बाबत सामनेवाले यांचेकडे विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. तक्रारदार यांने मेल आयडी करुन चौकशी केली असता सदर कूरिअर हे दिल्ली येथे पोहचले परंतु भेटले नाही असे लक्षात आले. तक्रारदार यांने सामनेवाले यांना विधीज्ञा मार्फत नोटीस पाठवली परंतु सामनेवाले यांनी त्यांची दखल घेतली नाही. व नोटीसचे उत्तरही दिले नाही. सबब, तक्रारदार यांना शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाले यांनी दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी तक्रार मंजूर करण्यात यावी.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार यांने दाखल केलेले पूराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले. तसेच कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार हा एशियन मोबाईल सेंटर या नांवाने सर्व्हीस सेंटर चालवतो व तो त्या दुकानात मोबाईलची तसेच मोबाईलच्या सुटया पार्टसची विक्री करतो. त्याबाबतचे कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही. दुकाना बाबतचा परवाना दाखल केला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या मार्फत कूरिअर पार्सल पाठवले परंतु सदर पार्सलमध्ये कोणकोणत्या वस्तू पाठविल्या त्याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण नमूद केले नाही. तक्रारदार यांने दाखल केलेली कूरिअरची पावती क्र.74567 दि.4.1.2014 यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, सदर पावतीवर कोणाचीही सही व शिक्का नाही. सबब, ती पावती पुराव्यानिशी ग्राहय धरता येणार नाही. तसेच तक्रारदार यांने दाखल केलेली ईमेलची प्रत यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर कूरिअर हे राकेश या नांवेचे व्यक्तीला मिळाले आहे पण पध्दतीनुसार पोहचले नाही असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांने ज्यांना कुरिअर मार्फत पार्सल पाठवले म्हणजेच आर.बी. सोल्यूशन दिल्ली यांना सुध्दा सदर प्रकरणात सामनेवाले म्हणून समाविष्ट केले नाही. जेणेकरुन पार्सल पोहचले किंवा नाही ही बाब सिध्द झाली असती.
तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे किंवा नाही हे ठरवणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे तक्रारीतील बाबीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेली पावती यांचे अवलोकन केले. सदरील पावतीवर कोणतीही बाब ही स्पष्टपणे नमूद नाही. तसेच सदर पावतीवर तक्रारदार व सामनेवाले यांची सही व शिक्का नाही. सदरील पावती ही विश्वसनीय नाही व ती पुरावा म्हणून ग्राहय धरता येणार नाही. सबब, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच कूरिअर मध्ये रु.25,000/- किंमतीच्या वस्तू होत्या या बाबतही कोणतेही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.
यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हे ग्राहक आहेत ही बाब सिध्द करु शकले नाही. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
मुददा क्र..1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे
सदस्य प्रभारी अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड