श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 27/04/2012)
1. तक्रारकर्ते यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्रारकर्ती श्रीमती बेबीताई आत्राम यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी मोलमजूरी करुन, आपल्या कामातून बचत करुन भविष्याच्या साठवणूकीकरीता प्रतीमाह रु.200/- प्रमाणे फेब्रुवारी 2005 पासून सन 2010 पर्यंत गैरअर्जदाराकडे जमा केले व त्यादाखल त्यांनी पावत्याही दिल्या. जून 2010 ला सदर रकमेची मागणी केली असता दिड महिन्यानंतर येण्यास सांगितले. परंतू त्यानंतर तक्रारकर्ती गेली असता रक्कम देण्यात आली नाही. ऑक्टोबर 2010 ला तक्रारकर्ती गैरअर्जदाराचे कार्यालयात गेली असता, त्यांनी रु.15,070/- चा निर्मल अर्बन को-ऑप. बँक लिमि.चा धनादेश दिला. सदर धनादेश वटविण्याकरीता टाकला असता तो निधी अपूरा असल्याने परत आला. नंतर पुन्हा धनादेश वटविण्यास टाकला असता याचा कारणास्तव परत आला. तक्रारकर्तीने यावर गैरअर्जदाराला नोटीस पाठविली असता गैरअर्जदारांनी रक्कम देण्यास टाळटाळ केली, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, तीद्वारे गैरअर्जदाराकडे जमा असलेली संपूर्ण रक्कम 18% व्याजासह परत मिळावी, मानसिक व आर्थिक त्रासाकरीता रु.10,000/- भरपाई मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविली असता, त्यांनी तक्रारीस उत्तर दाखल केले नाही. शेवटी 03.01.2012 रोजी कंपनीची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी 30 दिवसाची मुदत देण्यात यावी अशी मागणी केली. शेवटी त्यांचेविरुध्द प्रकरण विना लेखी जवाब चालविण्याचा आदेश 21.02.2012 रोजी पारित केला.
3. युक्तीवादाचेवेळी तक्रारकर्ते हजर, त्यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला, गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी तक्रारीसोबत दाखल नि.क्र. 3 प्रमाणे रकमेच्या पावत्या, धनादेश, बँकेने दिलेला अहवाल, नोटीस, पोस्टाच्या पावत्या व गैरअर्जदारांनी नोटीसला दिलेले उत्तर यांचे अवलोकन केले असता, मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. गैरअर्जदारातर्फे सदर प्रकरणी कोणीही हजर नाही. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्याचे म्हणणे, दस्तऐवज व धनादेशावरुन तक्रारकर्त्यांना रु.15,070/- गैरअर्जदार देणे लागतात ही बाब स्पष्ट आहे. परंतू ती रक्कम तक्रारकर्तीला गैरअर्जदारांनी दिलेली नाही. धनादेश 20.01.2011 रोजी न वटता परत आल्याचे दिसून येते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीची रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला रु.15,070/- ही रक्कम 20.01.2011 पासून द.सा.द.शे.12% व्याजासह अदाएगीपावेतो मिळून येणारी रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. नपेक्षा द.सा.द.शे.15% दंडनीय व्याज देणे लागतील.
3) तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.2,000/- गैरअर्जदारांनी द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.