निकालपत्र
निकाल दिनांक – १२/१२/२०१९
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन कले आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या गट नं.३८३ या सामायीक क्षेत्रात डाळींब पिकासाठी शेततळे केले आहे. सदर शेततळ्याचे आकारमान ४०४८.०० स्के.मी. रक्कम रूपये ३,११,६९६/- व तळ्यासाठी प्लॅस्टीक्स फिल्मसाठी झालेला एकूण खर्च रूपये फिटींग चार्ज रक्कम रूपये ७२,६८४/- सह साधारण एकुण ८,२५,०००/- इतका खर्च आलेला आहे मात्र सामनेवाले यांनी दिनांक २६-१२-२०१३ रोजीच्या पावतीप्रमाणे, हमीनुसार प्लॅस्टीक दिलेले नाही. सदर शेततळ्यासाठी तक्रारदार यांना बॅंक ऑफ बडोदा शाखा भेंडा, ता.नेवासा जि.अहमदनगर यांचे कर्ज प्रकरण करावे लागले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी दिलेल्या नियम अटीप्रमाणे काम पुर्ण केलेले आहे. सदर शेततळ्याच्या अस्तरणी करणासाठी पुरवठा केलेल्या फिल्मच्या टिकाऊपणा व इतर निर्धारीत केलेल्या इतर गुणधर्माबाबत उत्पादक/ अधिकृत विक्रेता यांना पुरवठा केलेल्या फिल्मच्या बाबतीत कमीत कमी ५ वर्षांची गॅरंटी सामनेवाले यांनी दिली होती. सदर रा.फ.अ.च्या मार्गदर्शक सुचनांनुसार रीइनफोर्सड् जीओमेंबरेन एचडीपीई ५०० मायक्रॉन आएसः१५३५१:२००८ या प्रकारच्या दर्जाची प्लास्टीक फिल्म अस्तरीकरणाबाबत सामनेवाले यांनी भरवसा दिला होता. मात्र सदर प्लॅस्टीक हे ५०० मायक्रॉन व त्याचा दर्जा, गुणवत्ता तसे नसल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, यामुळेच सदर तळ्यातुन दररोज मोठ्या प्रमाणात पाणी कमी होत आहे. यामुळे सदर शेततळ्याच्या फिल्मच्या दर्जाची सामनेवाले यांनी पाहणी, पडताळणी करून गुणवत्ता तपासुन, नमुण्याकरीता तक्रारदार व पंचासमक्ष सदरची फिल्म तपासणी करीता घेवून अहवाल मिळणे आवश्यक आहे. तक्रारदाराच्या शेती व्यवसायाच्या दृष्टीकोणातुन शेततळ्याला अतिशय महत्व आहे. परंतु सामनेवाले व कंपनीने सेवा बरोबर न दिल्याने तक्रारदाराचे व्यवसाय व दैनंदीन जिवनात लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना तोंडी तसेच लेखी अनेक वेळा माहिती देवून सदर प्लास्टीकबद्दल विचार, चौकशी केलेली आहे मात्र सामनेवाले यांनी वारंवार उडवाउडवीची उत्तरे देवून सदरचे प्लॅस्टीक नवीन किंवा बदलूनही दिलेले नाही. याबाबत वकिलामार्फत सामनेवाले यांना दि.०८-०३-२०१७ रोजी रितसर कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. मात्र सामनेवाले यांनी सदर नोटीसीची दखल घेतली नाही व नोटीसीला खोटे उत्तर दिले. अशाप्रकारे सामनेवाले कंपनीने तक्रारदार यांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक व सामाजीक नुकसान केले आहे व तक्रारदाराची फसवणुक केली आहे. सामनेवालेने दुषीत सेवा पुरवली म्हणुन सदर तक्रार दाखल करणेस कारण घडले आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सदरची प्लॅस्टीक्स फिल्मच्या दर्जाची पाहणी, पडताळणी करून गुणवत्ता तपासुन, नमुण्याकरीता तक्रारदार व पंचासमक्ष सदरची फिल्म तपासणीकरीता घेवून पंचनामा, अहवाल मिळावा, तक्रारदाराचे शेततळ्यातील सततच्या पाणी गळतीमुळे फळबागांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच तक्रारदारास आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास व नुकसान भरपाई म्हणुन रक्कम रूपये १५,००,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- मिळावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्यात आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.१ प्रकरणात हजर झाले व सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचे म्हणणे निशाणी १५ वर असे दिले की, तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले क्र.१ चे विरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.१ ने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने दाखल केलेल्या बिलांप्रमाणे संपुर्ण रक्कम ही तक्रारदार याने सामनेवाले क्र.२ यांना अदा केलेली आहे. सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराच्या शेततळ्यास प्लॅस्टीक कागदाचा पुरवठा केलेला आहे. त्यामुळे सदर तक्रारदाराच्या कोणत्याही मागणीस अथवा तक्रारीस सामनेवाले क्र.१ हे जबाबदार नाहीत. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
४. सदर प्रकरणात सामनेवाले क्र.२ हजर झाले व त्यांचे म्हणणे निशाणी १७ वर असे दिले की, सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.२ कंपनीकडुन प्लॅस्टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शेत तळ्यामध्ये बसवुन देण्याचा व्यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेत तळ्यात जर बारीक दगड असल्यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्यावतीने तसेच डिलर याच्यावतीने शेतकरी यांना तश्याच प्रकारची सुचना देण्यात येतात. इतक्यात नव्हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्याने व शेतामध्ये बारीक दगड असल्याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्यात उत्पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्लॅस्टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्ये झाले असले तरी त्यात कोणताही उत्पादीत दोष नाही. सामनेवाले क्र.२ यांनी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार-पाच वर्ष सतत दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीमुळे तक्रारदार यांनी कागद टाकलेल्या शेत तलावात पाणी न भरल्याने उन्हाळ्यामुळे तसेच शेततलाव कोरडा असल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचा वापर होऊन त्यामुळे तक्रारदार याचे शेत तलावातील कागदाचे नुकसान होऊ शकते. सदरची बाब ही नैसर्गिक असल्याने त्यास सामनेवाला यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही. सदरचा कागद बसवतांना कागद बसविण्याचा खर्च हा संपुर्णपणे डिलरला दिलेला असतो. त्यामुळे तो सामनेवाला यांच्याकडुन वसुल करण्याचा कोणताही अधिकार तक्रारदार यांना नाही. शेतात अनेक दिवस पाणीसाठा नसल्याने नैसर्गिक कारणाने सदर कागद खराब झाला असल्याचे सामनेवाले यांच्याविरूध्द खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीत शेतकरी यांनी सदर शेत तलावासाठी लागणारे कागदाची शासनाकडुन मिळणारी संपुर्ण सवलत मिळल्यानंतर सदरची खोटी बनावट तक्रार सामनेवाले यांच्याविरूध्द दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले क्र.२ यांनी महाराष्ट्राबाहेर राज्यात शेततलावासाठी सदर कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्तऐवज सामनेवाले क्र.१ व २ यांचे शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | नाही |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्याच्या शेततळ्यात प्लॅस्टीक खरेदी व कागद बसविण्याकरीता सामनेवाले क्र.२ ला रक्कम दिली, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.६ दस्त क्र.१ व २ वरून सिध्द होत आहे. म्हणुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र.२ -
७. तक्रारदाराने नि.क्र.२२ वर पंचनाम्याची प्रत दाखल केलेली आहे. त्यात असे नमुद आहे की, तक्रारदाराचे शेततळ्यावर असलेले प्लॅस्टीक पेपर पुर्णपणे निर्जळ झालेले आहे. तो निष्कृष्ट दर्जाचा असल्याने त्यास ठिकठिकाणी चिरा पडुन छिद्र पडलेले आहे. तक्रारदाराने नि.क्र.२२ वर शेत तलावाचे छायाचित्र दाखल केलेले आहेत. सदर छायाचित्रात असे दिसुन येते की, त्या शेततलावात मोठे मोठे दगडे आहेत. सामनेवालेने त्याची कैफीयतीत असे कथन केलेले आहे की, शेततळ्यावर दगडांमुळे प्लॅस्टीकचे पेपर फाटु शकतात. सदर प्रकरणात तक्रारदाराने त्याच्या शेततलावात लावण्यात आलेले प्लॅस्टीकचे पेपर निष्कृष्ट दर्जाचे असल्याने त्या संदर्भांत कोणतेही तज्ञ विशेषज्ञाचा आवहाल सादर केलेला नाही. म्हणुन तक्रारदार या तक्रारीत हे सिध्द करू शकले नाही की, तक्रारदाराचे शेततलावात लावण्यात आलेले प्लॅस्टीक पेपर निम्न दर्जाचे होते व त्यामुळे तक्रारदाराच्या शेततळ्यातुन सतत पाणी गळत होते. सबब सामनेवालेने तक्रारदाराला कोणतीही न्युनतम सेवा दिली नाही, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
८. तक्रारदाराने सदर तक्रारीत अशीही मागणी केलेली आहे की, तक्रारदाराचे शेततळ्याचे प्लॅस्टीक फिल्मच्या दर्जाची पाहणी, पडताळणी करून गुणवत्ता तपासुन व तक्रारदारासमोर पंचासमक्ष सदर प्लॅस्टीक कागदाची तपासणी करता घेऊन पंचनामा व अहवाल सामनेवालेकडुन मिळावा. सदर मागणी व मुद्दा क्र.१ व २ च्या विवेचनावरून व न्यायाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. सामनेवाले क्र.१ व २ यांनी व्यक्तिगत किंवा संयुक्तरितीने तक्रारदाराचे शेततळ्याचे प्लॅस्टीकचे कागदाचे दर्जाची पाहणीकरीता पंचासमक्ष व तक्रारदारासमक्ष तक्रारदाराचे शेत तलावातुन प्लॅस्टीकचे कागद काढुन व तज्ञ विशेषज्ञाकडुन अहवाल मागवुन तक्रारदाराला द्यावे. ३. वरील आदेश सामनेवाले क्र.१ व २ यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाच्या आत पुर्तता करावी. ४. उभयपक्षांची तक्रारीचा खर्च सहन करावा. ५. तक्रारदाराला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करण्यात यावी. |