(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :16 /08/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 09.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्ता क्र.1 ही एक ग्राहक संस्था असुन ती मुंबई विश्वस्त कायदा 1950 नुसार नोंदणीकृत आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 ही मिनरवा एक्वा नावाने पिण्याचे पाऊच तयार करते व गैरअर्जदार क्र.2 हा त्यांचा अधिकृत वितरक आहे. तक्रारकर्ता क्र.2 यांनी दि.18.03.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून पाण्याचे पाऊच विकत घेऊन ते उघडले असता त्या मध्ये कचरा, गाळ व चामडकासारखे किडे आढळले. सदर बाब त्यांचे नजरेत आणुन दिली असता त्यांनी दुर्लक्ष करुन आपली असमर्थता दाखवुन पैसे परत करण्यांस नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचात दाखल करुन तीव्दारे रु.1,00,000/- एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून द.सा.द.शे.18% व्याजासह मिळवी व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आले असता गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात उपस्थित झाले नाही व त्यांनी आपले कथन सादर केले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द दि.19.10.2010 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस प्राप्त झाली असुन त्यांनी मंचात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारकर्ता क्र.2 ने त्यांचेकडून पाणी पाऊच खरेदी केल्याची बाब अमान्य केली व सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. तसेच तक्रारकर्ता क्र.2 किंवा इतर कोणालाही किंचीतही उघडलेले पाणी पाऊच, कचरा, गाळ व चामडक सारखे किडे असलेले कोणतेही पाणी पाऊच विकलेले नाही. यामध्ये त्यांनी आपल्या सेवेत कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही म्हणून सदर तक्रार खारिज करावी असा उजर घेतला आहे.
4. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 3 वर तक्रारकर्ता क्र.1 कडे केलेली तक्रार, गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविलेले पत्र/नोटीस व प्रतिउत्तर इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.01.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्यांचे व गैरअर्जदार क्र.2 चे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकूण प्रकरण निकालाकरीता दि.15.07.2011 रोजी ठेवण्यांत आले. मात्र निकाल देण्याचे दृष्टीने तपासणी केली असता पाण्याचे पाऊच उपलब्ध नसल्याचे आढळून आले, त्यामुळे सदर प्रकरण प्रबंधकांचे पढील कार्यवाहीस्तव दि.16.08.2011 रोजी निकालाकरीता ठेवण्यांत आले. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. यातील तक्रारकर्त्यांनी तक्रार मंचात दाखल केल्यानंतर सदर पाण्याचे पाऊच निरीकडे परिक्षणासाठी पाठविले असता निरीचे पत्र दि.20.07.2010 आवक क्र.408/10 दि.10.08.2010 नुसार उपलब्ध नमुना परिक्षणासाठी अपूरा असुन किमान 1 लिटर पाण्याची आवश्यकता असल्याबाबत कळविण्यांत आले. त्यानंतर दि.10.08.2010 रोजी मंचाने आदेश पारित केला की, सदरचे पाणी पाऊच बोलावण्यांत यावे व प्रबंधकाकडे ठेवण्यांत यावे. सदरचे पाणी पाऊच शेवटपर्यंत आले नाही आणि पुढे या संबंधाने त्या संस्थेतर्फे सदरचे पाणी पाऊच मुदत संपल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यांत आली, असे कळविण्यांत आले आहे. सध्याची स्थीती अशी आहे की, मंचासमक्ष सदरचे पाऊच पाणी उपलब्ध नाही, जेणेकरुन त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करुन निर्णय देता येईल. आणि सदरच्या पाण्याच्या शुध्दतेसंबंधी कोणताही अहवाल मंचासमक्ष आलेला नाही, त्यामुळे या प्रकरणात निकाल देण्याचे दृष्टीने निष्कर्ष काढता येणे शक्य नाही.
वरील सर्व परिस्थिचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.