(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक 15 सप्टेंबर, 2011)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदार श्री अरविंद गोडबोले यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी दिनांक 6/4/2010 रोजी काठमांडू (नेपाल) ते दिल्ली च्या 2 तिकीटा गैरअर्जदार नं.1 यांचेमार्फत प्रत्येकी रुपये 5,631/- याप्रमाणे घेतल्या. त्यानुसार त्यांनी प्रोसेसिंग चार्जेस इत्यादी जोडून रुपये 11,634/- चे इन्व्हाईस दिले आणि ते अर्जदाराने भरले. तसेच दिल्ली ते नागपूरसाठी रुपये 5,094/- ची तिकीट घेतली व त्यानुसार प्रोसेसिंग चार्जेस इत्यादी जोडून रुपये 5,318/- चे इन्व्हाईस दिले ते तक्रारदाराने भरले. दोन प्रवासांत 7 तासांचा अवधी ठेऊन तक्रारदाराने दिल्ली ते नागपूरच्या 7.30 वाजता निघणा-या विमानांची तिकीटे खरेदी केली. त्यानुसार तक्रारदार आपले कुटूंबासह नियोजित वेळी विमानतळावर पोचले, मात्र शेड्युलच्या बदलाप्रमाणे विमान सकाळी 10.40 वाजता ऐवजी दुपारी 4.45 ला निघणार असल्याचे समजले आणि उशिरा प्रवासामुळे पुढील विमान निघुन गेले. त्यासाठी तक्रारदारास नवीन तिकीटांसाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागला. पुढे तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदार नं.1 यांनी माहिती देऊन सुध्दा शेड्युलचे बदलाबाबत सूचना न दिल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला आणि दुस-या विमानाने प्रवास करावा लागला असून गैरसोय व अनावश्यक खर्चास सामोरे जावे लागले. तक्रारदाराने याबाबत नोटीस देऊन रकमेची मागणी केली व नंतर वकीलामार्फत नोटीस दिली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणुन शेवटी तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे रुपये 26,165/- एवढी नुकसान भरपाईची रक्क्म 12% व्याजासह मिळावी आणि तक्रारीचे खर्चासाठी रुपये 5,000/- मिळावेत अशा मागण्या केलेल्या आहेत.
यातील गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपापले लेखी जबाब दाखल केलेत.
यातील गैरअर्जदार नं.1 यांनी तक्रारदारानेने त्यांचेविरुध्द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्यांनी आपले जबाबात असे नमूद केले की, वेळापत्रकात होणा-या फेरबदलाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. तक्रारदारास फोनवरुन संपर्क करुन सुध्दा विमानाबद्दल चौकशी करता आली असती, कारण जारी केलेल्या तिकीटाच्या लिफाफ्यावर देखील तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीत नमूद केलेल्या सर्व बाबी ह्या खोट्या आहेत. विमानाच्या वेळेतील बदलाबाबतची माहिती ही सर्वस्वी गैरअर्जदार नं.2 यांच्या अख्त्यारितली असून त्यासाठी ते कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत व त्यांची जबाबदारी फक्त तिकीट काढून देण्यापुरतीच मर्यादित आहे. म्हणुन त्यांचेविरुध्द तक्रार खारीज व्हावी असा उजर घेतला.
यातील गैरअर्जदार नं.2 यांनी आपला जबाब दाखल केला असून, त्यांनी तक्रारदाराची संपूर्ण विपरीत विधाने नाकबूल केली. गैरअर्जदार यांचे म्हणणे असे आहे की, विमानात झालेल्या वेळेतील बदलाबाबत त्यांचेकडून गैरअर्जदार नं.1 एजंटला दूरध्वनीवरुन कळविण्यात आले होते आणि तक्रारदाराला सुध्दा 09422602538 ह्या नंबरवर झालेल्या बदलाबाबत कळविण्याचा प्रयत्न करण्यात आला व पीएनआर हिस्ट्रीनुसार गैरअर्जदार नं.2 यांचेकडून तक्रारदारास कळविले होते. पुढे तक्रारदारास 9422602538 या नंबरवरुन एसएमएस सुध्दा करण्यात आले, जो की तक्रारदाराने हा नंबर त्याचे तिकीट बुकींगचे वेळी गैरअर्जदारास दिलेला होता. गैरअर्जदार याचे पुढे असेही म्हणणे आहे की, विमानाचा सुटण्याचा निर्धारित वेळ बदलविण्यात येऊन 5.05 ला करण्यात आला, हा शेड्यूलमधील बदल करण्यात आला व कळविले आणि त्याची खात्री तक्रारदाराच्या पीएनआर हिस्ट्रीमधुन होते, त्यामुळे तक्रारदाराला शेड्यूलमध्ये झालेला बदल माहित नसन्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदाराच्या नोटीसला त्यांनी रितसर उत्तर दिलेले आहे, जे की तक्रारदाराने स्वतः मान्य केले व त्याची प्रत तक्रारीसोबत लावलेली आहे. गैरअर्जदाराचा यात कोणताही दोष नाही व त्यांचे सेवेत कोणताही निष्काळजीपणा नाही. म्हणुन सदर तक्रार दंडासहित खारीज करावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, सोबत काठमांडू ते दिल्ली चे इन्व्हाईस, विमान तिकीटे, अग्रीम रकमेच्या पावत्या, एबर इंडिया दिल्ली नागपूर च्या बोर्डिंग पासेस, व्हाऊचर, गैरअर्जदारांस दिलेल्या नोटीसा, नोटीस मिळाल्याच्या पोस्टाच्या पावत्या, नोटीसला दिलेले उत्तर, नोटीससंदर्भातील मेल आणि प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार नं.1 यांनी एअर तिकीट असा एक दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केला आहे. गैरअर्जदार नं.2 यांनी अटी शर्तीची प्रत, एसएमएस डिलीव्हरी रिपोर्ट, पीएनआर हिस्ट्री रिपोर्ट याप्रमाणे दस्तऐवज दाखल केले आहेत.
सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद मंचाने ऐकला.
यातील विवाद फार थोडा आहे. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी गैरअर्जदार
यांनी झालेल्या विमान उड्डानाचे वेळेत झालेल्या बदलाबाबतची कोणतीही सूचना त्यांना दिलेली नाही, आणि याचे परीणामी तक्रारदार यांची संपूर्ण गैरसोय झाली व त्यासाठी ही तक्रार उद्भवलेली आहे.
यातील गैरअर्जदार नं.2 यांचे म्हणणे असे आहे की, अशा झालेल्या वेळेच्या फेरबदलाबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क करुन आणि एसएमएस देऊन त्याची सूचना देण्यात आली त्यासंबंधिचा रेकॉर्ड त्यांनी मंचासमक्ष दाखल केलेला आहे. मात्र तक्रारदार यांनी प्रतिज्ञालेख दाखल करुन त्यात असे स्पष्ट केले की, गैरअर्जदार नं.2 यांनी दर्शविलेल्या फोननंबरशी त्यांचा संबंध कधीही आलेला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9823286208 हा मागील 13—14 वर्षांपासून त्यांचेकडे आहे आणि दुसरा क्रमांक नाही. तसेच त्यांचे मुलाचा भ्रमणध्वनी क्र.9823092820 हा मागील 7—8 वर्षांपासून त्यांचेकडे आहे आणि यावर कोणतीही सूचना दिल्याचे गैरअर्जदार नं.2 यांचे म्हणणे नाही. पुढे तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने ज्या दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांचा उल्लेख केलेला आहे त्यावरुन स्पष्ट होते की, तक्रारदारास कधीही संपर्क केला नाही आणि विमान उड्डाणात झालेल्या बदलाबाबतची सूचना दिलेली नाही. तक्रारदाराचे हे म्हणणे योग्य असल्याचे दिसून येते. गैरअर्जदाराचे म्हणणे की, त्यांनी तक्रारदारास दूरध्वनीवरुन सूचना दिली ते दूरध्वनी तक्रारदाराचे आहेत हे सिध्द करण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची होती, मात्र त्यासंबंधी कोणताही वस्तूनिष्ट पुरावा गैरअर्जदार नं.2 यांनी मंचासमोर आणला नाही. तक्रारदाराने यासंबंधी गैरअर्जदाराकडे तक्रार केल्यानंतर व नोटीस दिल्यानंतर यासंबंधिचा खुलासा गैरअर्जदार करु शकले असते, मात्र त्यांनी असा कोणताही खुलासा केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे तक्रारदारास आगाऊ सूचना दिली, हा गैरअर्जदाराचा युक्तीवाद निरर्थक ठरतो.
एखादा व्यक्ती विशिष्ट काम ठरवून व त्यातील वेळेतील अंतर ठरवून दोन विमानाने प्रवास करीतो त्या योग्य वेळी त्योचा प्रवास होणे गरजेचे आहे, मात्र त्यासंबंधिची वेळेतील बदलाची सूचना दिली होती असा कोणताही पुरावा त्यांनी समोर आणला नाही हीच त्यांचे सेवेतील मोठी त्रुटी ठरते. त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारदाराने आपल्या सर्व नुकसानीकरीता जास्तीचे तिकीटाचे रकमेसह व नुकसान भरपाई मिळून रुपये 26,165/- एवढ्या रकमेची मागणी केलेली आहे ती अवास्तव नाही आणि तेवढी रक्कम मिळण्यास ते पात्र आहेत असे आमचे मत आहे.
वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करता, आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-/// अं ती म आ दे श ///-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार नं. 1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिरित्या तक्रारदारास रुपये 26,165/- एवढी रक्कम नुकसान भरपाईदाखल द्यावी. तीवर, तक्रार दाखल झाल्याचा दिनांक म्हणजेच 20/11/2010 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम द्यावी.
3. गैरअर्जदार नं. 1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिरित्या तक्रारदारास झालेला शारीरिक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च यासाठी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
4. गैरअर्जदार नं.1 व 2 यांनी वरील आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासून एक महिन्याचे आत करावे
5. . नपेक्षा उपरोक्त रकमेवर द.सा.द.शे. 9% ऐवजी 12% दराने दंडनिय व्याज गैरअर्जदार देणे लागतील.