श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 22/07/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्याच्या वाहनाचा विमा 22.02.2009 ते 21.02.2010 या कालावधीकरीता काढला होता. तक्रारकर्ता स्वतःच्या परिवारासोबत हैद्राबादवरुन नागपूरला येत असतांना वाहनाचा रमयापेठ, आऊटस्कर्ट, मेडक जिल्हा या ठिकाणी रस्त्यावर म्हशी आल्याने त्यांना वाचवितांना वाहनाने रस्ता दुभाजकाला धडक दिली आणि यामध्ये वाहनाची तुटफुट झाली. याबाबत पोलिस स्टेशनला रीपोर्ट दिला. गैरअर्जदाराला सुचना दिली. वाहन हैद्राबाद येथे टोयोटा डिलरकडे दुरुस्तीकरीता पाठविण्यात आले. गैरअर्जदाराकडे दस्तऐवजांसह विमा दावा नोंदविला. 04.02.2010 ला वाहन दुरुस्त झाले. गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी वाहनाची तपासणी केली. 05.02.2010 ला तक्रारकर्त्यास वाहन मिळाले. वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च तक्रारकर्त्याला रु.1,46,933.50 इतका आला. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांनी मागणी केल्यानंतर विमा मागणी मंजूर केली नाही आणि प्रत्यक्ष अपघात व दर्शविलेले कारण यामध्ये फरक असल्याचे कारण सांगून विमा नाकारला. 12.03.2010 चे पत्र त्यासाठी दिले. तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराने या आधी कोणतेही पत्र पाठविले नाही व कागदपत्रांची मागणी केलेली नाही आणि खोटे कारणांवरुन विमा दावा नाकारला. गैरअर्जदारांना नोटीस पाठविला असता गैरअर्जदारांनी त्यास उत्तर दिले नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली व तीद्वारे रु.1,46,933.50 एवढी रक्कम 18 टक्के व्याजासह विमा दाव्याचे मिळावेमानसिक त्रासापोटी रु.1,50,000/-, कामधंदा नुकसानापोटी रु.1,00,000/-, प्रकरणाच्या खर्चापोटी रु.25,000/- अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर प्रकरणी गैरअर्जदारास नोटीस पाठविण्यात आली असता, त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व तक्रारीतील पॉलिसीची बाब मान्य करुन इतर विपरीत विधाने नाकारलीत. हा दावा मंचासमक्ष चालू शकत नाही, कारण अपघात हा आंध्र प्रदेश येथे झालेला आहे. गैरअर्जदाराचे शाखा कार्यालय नागपूर येथे आहे, मात्र त्या कारणांवरुन ही तक्रार येथे चालू शकत नाही. यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘सोनिक सर्जिकल वि. नॅशनल इंशुरंस कंपनी लि. IV (2009) CPJ 40 (SC)’ यावर भीस्त ठेवली आहे. गैरअर्जदाराने असा बचाव घेतला की, विमा धारकांनी अपघाताचे विवरण हे दिलेले आहे, ते पंचनाम्याशी जुळत नाही, त्यामुळे दावा नाकारला आहे. सर्व्हेयरने वाहनाचे निरीक्षण केले आणि संबंधित अपघाताचा वाहनाच्या नुकसानीसंबंधी कोणताही संबंध नाही असे लिहिले आहे. सर्व्हेयरचा अहवाल महत्वाचा आहे व त्याला नाकारला नाही. तो लक्षात घेणे गरजेचे आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व गैरकायदेशीर आहे असा उजर घेतला आहे. 3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद हा त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. गैरअर्जदाराचा असा आक्षेप आहे की, या मंचाचे अधिकारक्षेत्रात सदर प्रकरण येत नाही, कारण अपघात हा आंध्र प्रदेशमधे घडलेले आहे. या संबंधीत त्याने ‘सोनिक सर्जिकल वि. नॅशनल इंशुरंस कंपनी लि. {IV (2009) CPJ 40 (SC)}’ या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वरील ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. यावर त्यांनी भिस्त ठेवली आहे. पॉलिसी ही मुळातच नागपूरवरुन घेतली आहे आणि तक्रारकर्त्याने दावासुध्दा नागपूर येथे केलेला आहे, नागपूर येथे गैरअर्जदाराचे शाखा कार्यालय असून, ते व्यवसायाकरीता आहे, या वस्तूस्थितीच्या संदर्भात गैरअर्जदाराने दाखल केलेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामध्ये खुप भिन्नता आहे. त्यावेळी संबंधित व्यक्तीने अंबाळा येथील पॉलिसी संबंधित दावा हा चंदिगढ येथे दाखल केलेला होता व त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यामुळे गैरअर्जदाराने अधिकारक्षेत्रासंबंधी घेतलेल्या आक्षेपात कोणतेही तथ्य नाही हे स्पष्ट होते. 5. सदर प्रकरणात विमा पॉलिसी ही मान्य आहे. गैरअर्जदाराचा आक्षेप एवढाच आहे की, अपघाताची माहिती जी तक्रारकर्ता देत आहे, ती प्रत्यक्ष वस्तूस्थितीशी जुळत नाही. तक्रारकर्त्याचे कथनानुसार जो दावा त्यांनी गैरअर्जदाराकडे दाखल केला होता, त्यामुध्ये वाहनाची म्हशीला धडक लागत होती, म्हणून त्यांना वाचविण्याकरीता रस्ता दुभाजकाला धडक लागली व त्यातून अपघात झाला असे नमूद आहे. गैरअर्जदाराने नि.क्र.4 यावर पंचनामा दाखल केलेला आहे आणि त्यावर ते भिस्त ठेवीत आहे, त्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की, वाहन हे रस्त्याच्या बाजूला पडलेले दाखविलेले आहे आणि त्यामुळे त्याची तुटफुट झालेली आहे. पंचनामा करणा-यांनी ड्रायव्हरकडे चौकशी केली असता त्यांनी वाहनाने रस्ता दुभाजकाला धडक लागली व त्यानंतर ते झाडावर जाऊन धडकले असे सांगितल्याचे नमूद केले आहे. आमच्या मते या दोन्ही विधानांशी व तक्रारकर्त्याने नमुद केलेल्या परिस्थितीशी, परिस्थितीमध्ये फारसा विसंगती नाही. दुसरे असे की, वाहनाचा अपघात झालेला आहे हे स्पष्ट आहे. तो तक्रारकर्त्याने अन्य कारणाने झाला व भलत्याच कारणाने दाखवित आहेत, याबाबतही योग्य तो पुरावा गैरअर्जदाराकडून आलेला नाही आणि गैरअर्जदाराचे आक्षेपामध्ये त्यासंबंधी योग्य तथ्य नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा दावा नाकारतांना जे पत्र दिलेले आहे, ते पत्र 19.03.2010 चे आहे, त्यामध्ये गैरअर्जदाराने आधी पाठविलेले तीन पत्रांचा उल्लेख दिसत आहे. तक्रारकर्त्याने कारणांसंबंधीचे दस्तऐवज दिले नाही असे नमूद केले आहे. मात्र असे कोणतेही पत्र गैरअर्जदाराने आपल्या उत्तरासोबत दाखल केले नाही वा ती तक्रारकर्त्यास पाठविली होती हे दर्शविणारा पुरावा दाखल केला नाही. थोडक्यात 19.03.2010 चे गैरअर्जदाराचा दावा नाकारणारे पत्र व त्यात दर्शविलेले कारण हेच मुळात लबाडीचे दिसते. 6. तक्रारकर्त्याने वाहनाचे दुरुस्तीसंबंधी मोटर कंपनी हैद्राबाद येथील डिलरकडून केलेली आहे, त्यासंबंधी दस्तऐवज दाखल केलेले आहे. मात्र गैरअर्जदाराने सर्व्हे रीपोर्ट दाखल केलेला आहे, परंतू सदर दस्तऐवज हा गैरअर्जदाराचा दस्तऐवज आहे. त्यामुळे जो कोणी सर्व्हेयर दाखविला आहे, तो स्वतः सर्व्हेयर आहे असे दिसून येत नाही. त्यासंबंधीची कोणतीही माहिती त्यात नमूद नाही. उलट दस्तऐवजांची सुरुवात गैरअर्जदार कंपनीच्या नावापासून होत आहे. या तथाकथीत सर्व्हेयरने आपल्या रीपोर्टमध्ये त्यांनी काढलेले नुकसान व नोंदविलेली निरीक्षणे यांना काय आधार आहे याचे सविस्तर वर्णन केले नाही. तसेच या सर्व्हेयरचा कोणताही प्रतिज्ञालेख गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे हा सर्व्हे रीपोर्ट मुळातून विचारात घेणे शक्य नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने यासंबंधी मा. राष्ट्रीय आयोगाचा दाखल केलेला ‘चंपालाल वर्मा वि. ओरीएंटल इंशुरंस कंपनी मर्या., III (2008) CPJ 93 (NC)’ निकाल विचारात घेणे शक्य नाही. सर्व्हेयरच्या रीपोर्टमध्ये न्यायदानाचे दृष्टीने तो पूर्णतः स्वतंत्र व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यांनी आपली निरीक्षणे स्वतंत्र नोंदवून त्याबाबतचा अहवाल देणे गरजेचे आहे, तसे या प्रकरणात घडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे त्यासंबंधीचा तक्रारकर्त्याचा अहवाल विचारात घेणे शक्य नाही. 7. गैरअर्जदार ह्यांनी तक्रारकर्त्याच्या दावा चुकीच्या कारणास्तव निष्कारण नाकारलेला आहे. तक्रारकर्त्यासोबत कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही आणि तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तरही दिलेले नाही. या सर्व बाबी गैरअर्जदार ह्यांच्या सेवेतील त्रुटी दर्शवितात. 8. तक्रारकर्त्याने यात एकूण रु.1,46,933.50 एवढया दुरुस्तीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. यातील 10 टक्के एवढी रक्कम घसा-यापोटी, तसेच 5 टक्के एवढी रक्कम सॉल्व्हेजपोटी आणि अशा अपघाताच्या दुरुस्तीमध्ये अन्य दुरुस्त्या केल्या जातात, त्यापोटी 10 टक्के रक्कम असे एकूण 25 टक्के रक्कम वगळणे योग्य होईल असे आम्हास वाटते. यास्तव खालीलप्रमाणे आदेश. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला रु.1,10,200.12 (रु.1,46,933.50 – रु.36,733.38 (25टक्के)) ही रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह, दावा नाकारल्याच्या दि.08.06.2010 पासून संपूर्ण रकमेच्या अदायगीपर्यंत द्यावी. 3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.5,000/’ आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे, न पेक्षा 9 टक्केऐवजी 12 टक्के व्याज देय राहील.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |