श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 22/08/2011)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तो अशोक लिलँड टिप्पर ट्रक, नोंदणी क्र. MH 36 1996 चा मालक असून सदर वाहन त्यांनी गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्र. VOC 0020421000100 अन्वये दरमहा रु.13,024/- प्रीमीयम देऊन, दि.08.04.2009 ते 07.04.2010 या कालावधीकरीता रु.8,90,000/- विमा घोषित मुल्याकरीता विमाकृत केले होते. सदर वाहन 12.05.2009 व 13.05.2009 च्या मध्य रात्रीला पोलिस स्टेशन कन्हानच्या हद्दीतून चोरीस गेले. सदर घटनेची सुचना संबंधित पोलिस स्टेशनला 13.05.2009 ला देण्यात आली, मात्र गुन्हा नोंदविण्यात आला नाही. संबंधित पोलिस स्टेशनमधील अधिका-यांनी आधी वाहनाचा शोध घ्या व वाहन नाही सापडले तर तक्रार नोंदवा असे सांगितले. म्हणून 14.05.2009 रोजी तक्रारकर्त्याने यू.पी.सी.द्वारे लेखी तक्रार पो.स्टे.कन्हान येथे केली. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर वाहनाचा तपास न लागल्याने अंतिम अहवाल क्र.62-अ/2009 देण्यात आला. गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल करुन रु.8,90,000/- ची मागणी करण्यात आली. गैरअर्जदारांनी विमा दावा नाकारला व त्यांचा मुख्य आक्षेप त्वरित सुचना दिली नाही आणि काळजी घेतली नाही यासंबंधीचा होता. म्हणून तक्रारकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली असून विमा रक्कमेबाबत रु.8,90,000/- व रु.5,00,000/- मानसिक व शारिरीक त्रासाची नुकसान भरपाईबाबत व्याजासह मिळावे, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत एकूण 16 दस्तऐवज दाखल केले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांवर बजावली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले आणि सर्व विपरीत विधाने नाकबूल केली व पॉलिसीची बाब मान्य केली. तक्रारकर्त्यांनी त्यांच्याकडे एकच चाबी दिली व दुसरी चाबी दिली नाही. पोलिस स्टेशनला तक्रार देतांना खुप उशिर केला. तसेच गैरअर्जदारांकडे पॉलिसीच्या शर्तीप्रमाणे त्वरित सुचना दिली नाही. यामध्ये तक्रारकर्त्याचा हलगर्जीपणा आहे व पॉलिसीच्या शर्तीभंग आहे, म्हणून तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात अनेक निवाडयांचा उल्लेख केलेला आहे.
3. युक्तीवादाचे वेळेस तक्रारकर्ते व त्यांचे वकील वेळोवेळी संधी देऊनही गैरहजर. गैरअर्जदारातर्फे वकिलांनी युक्तीवाद केला. प्रकरण निकालाकरीता बंद करण्यात आले.
-निष्कर्ष-
4. यातील तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराच्या आरोपाला नाकारण्याकरीता प्रतिज्ञालेखाद्वारे कोणतेही उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याच्या निवेदनाप्रमाणे चोरी झाली त्याच्या दुस-याच दिवशी पोलिस स्टेशन कन्हान येथे सुचना दिली. तसेच लिखित स्वरुपात गैरअर्जदाराकडे वाहनाचे चोरीसंबंधी तक्रार आणि सुचना यु.पी.सी.द्वारे पाठविले असे तक्रारीत नमूद केले आहे. मात्र असा कोणताही दस्तऐवज व पोस्टाचा दाखला या प्रकरणात दाखल केलेला नाही.
5. गैरअर्जदाराने दुस-या चाबीसंबंधी घेतलेला आक्षेप व वाहनाची तक्रारकर्त्याने योग्य प्रकारे काळजी घेतली नाही यासंबंधी घेतलेला आक्षेप यास तक्रारकर्त्यांना संधी देऊनही प्रतिज्ञालेखाद्वारे योग्य उत्तर दिले नाही व आक्षेप खोडून काढले नाही.
6. गैरअर्जदाराने NEW INDIA ASSURANCE COMPANY LIMITED VS. TRILOCHAN JANE (APPEAL NO. 321 OF 2005) या प्रकरणामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने 09.12.2009 रोजी दिलेला निकाल दाखल करुन, त्यावर आपली भीस्त ठेवली आहे. सदर निकालाप्रमाणे मा. राष्ट्रीय आयोगाने, योग्यवेळेस सुचना दिली नाही, योग्य वेळी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली नाही, अशावेळेस चोरीच्या प्रकरणी पॉलिसीतील शर्तीचा भंग होतो आणि संबंधित व्यक्ती ही विम्याची रक्कम मिळण्यास प्राप्त ठरत नाही असा स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता व कायदेविषयक परिस्थिती लक्षात घेता, तक्रार निकाली काढण्यात येते. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सहन करावा.