जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 1498/2010 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 20/12/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-08/09/2015.
श्री.शिवाजी दगा पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.साकरे,ता.धरणगांव,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. प्रोप्रायटर, राशी सिडस,
273, कामराज नगर रोड, आतुर, जिल्हा सेलम,
मामिळनाडू (भारत)
2. प्रोप्रायटर,शहा अग्रो एजन्सीज,
धरणगांव, छत्रपती शिवाजी शॉपींग सेंटर,
धरणगांव,ता.धरणगांव,जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.डी व्ही भामरे वकील.
सामनेवाला क्र.1 तर्फे श्री.दिलीप बी.मंडोरे वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. शेती उत्पन्नातुन त्यांचे कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. सामनेवाला क्र. 1 हे राशी सिडस बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे. सामनेवाला क्र. 2 वेगवेगळया कंपनीने तयार केलेले बियाणे विक्रीचे काम करतात. तक्रारदार यांनी त्यांचे शेतात टोकन पध्दतीने राशी सिडस टिप टॉप कंपनीचे लॉट नंबर 356446 चे 15 किलो मका बियाणे सामनेवाला क्र. 2 यांचेकडुन खरेदी केले. सदरील बियाणे तक्रारदार यांनी त्यांचे शेतात पेरले. बियाणे पेरतेवेळेस जमीनीत मुबलक ओलावा उपलब्ध होता. तसेच पाऊसही पडला होता. तक्रारदार यांनी पेरलेले बियाणांपैकी फक्त 15 ते 20 टक्के बियाणांची उगवण झाली. तक्रारदार यांनी बियाणांची उगवण झाली नाही म्हणुन तालुका कृषी अधिकारी, धरणगांव यांचेकडे तक्रार केली. कृषी अधिकारी यांनी पिक पाहणी अहवाल तयार केला. उगवण न झाल्यामुळे तक्रारदाराचे अपरिमित नुकसान झाले. सामनेवाला यांनी खराब बियाणे पुरविल्यामुळे तक्रारदारांचेवर आर्थिक संकट ओढवले. तक्रारदार यांचे सुमारे रु.70,000/- चे नुकसान झाले. सामनेवाला यांनी सदोष बियाणांची विक्री करुन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडुन नुकसान भरपाई रक्कम रु.90,000/- मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा दाखल केला. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 यांचे दुकानातुन तथाकथीत मका बियाणे विकत घेतले आहे त्याची लागवड त्यांनी कोठे केलेली आहे याबाबत सामनेवाला यांना काहीही माहिती नाही. तक्रारदार यांनी मका बियाणांची लागवड केली असता त्यांनी त्याची योग्य काळजी घेतली नाही. सदरील बियाणांची व लॉटची प्रयोगशाळेतुन चाचणी करुन सदरील बियाणे विक्रीस काढले आहे. कृषी अधिकारी यांनी दिलेला रिपोर्ट हा वस्तुस्थितीला धरुन दिलेला नाही. सामनेवाला यांचे कथन की, संबंधीत वाणाच्या मक्याचे बियाणे महाराष्ट्रात फार मोठया प्रमाणांवर विक्री झालेले आहे. सदरील बियाणांमध्ये भेसळ झाल्याबाबत सामनेवाला यांना एकही तक्रार प्राप्त झाली नाही. सामनेवाला यांनी सदरील बियाणे बाजारात विक्रीसाठी आणण्याअगोदर संपुर्ण लॉटची प्रयोगशाळेतुन खात्री करुनच जी बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. बियाणांची उत्पादन क्षमता चांगली आहे. बियाणांची उगवण क्षमता ही अनेक बाबींवर अवलंबुन असते. जमीनीची प्रत, लागवडीची पध्दत, पुरेसा ओलावा, वातावरण, खतांच्या योग्य मात्रा, इत्यादी गोष्टींवर अवलंबुन असते. तसेच बियाणांमध्ये दोष आहे ही बाब बियाणे प्रयोगशाळेतुन तपासुन घेतल्याशिवाय शाबीत करता येणार नाही. तक्रारदार यांनी सदरील बियाणे तपासणीचा अहवाल या मंचापुढे सादर केल्याशिवाय बियाणे सदोष आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही तसेच कृषी अधिकारी यांनी मोका अहवाल तयार केला त्यावेळेस कंपनीचे हजर असणे आवश्यक असते. सामनेवाला यांचा कोणताही अभिप्राय घेता नाही. सदरील बियाणे हे अत्यंत गुणवान असल्यामुळे त्याची उगवण झाली नाही हे म्हणणे खोटे आहे. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
4. सामनेवाला क्र. 2 यांना नोटीस बजावणी झाली ते या मंचासमोर हजर झाले नाहीत. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच कृषी अधिकारी यांची साक्ष नोंदविली आहे. तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. तक्रारीसोबत 7/12 चा उतारा, मका बियाणे घेतल्याच्या मुळ पावत्या, कृषी अधिकारी यांचा अहवाल, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस इत्यादी दस्त हजर केलेले आहेत. सामनेवाला क्र. 1 यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष बियाणे
विक्री करुन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
5. तक्रारदार यांनी त्यांचे लेखी युक्तीवादात असे नमुद केलेले आहे की, त्यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडुन सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले मका बियाणे खरेदी केले. त्यांची लागवड त्यांनी त्यांचे शेतात केली. सदर बियाणांची 15 ते 20 टक्के उगवण झाली. सदरची बाब तक्रारदार यांनी कृषी अधिकारी यांचे निर्दशनास आणुन दिली. कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये सदोष बियाणे असल्याबद्यल नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदार यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष कृषी अधिकारी यांचे पुराव्यावर व प्रश्नावलीवर वेधले व सामनेवाला यांनी सदोष बियाणांची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवंलंब केला आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे म्हटले आहे.
6. सामनेवाला यांचा बचाव लक्षात घेतला असता, त्यांनी असे नमुद केलेले आहे की, पेरणीच्या वेळेस योग्य पाऊस न झाल्यास किंवा बियाणे खुप खोलवर पेरले गेल्यास ब-याच प्रमाणांत बियाणे उगवण होत नाही तसेच त्यांनी असेही नमुद केलेले आहे की, सदरील लॉटचे बियाणे मोठया प्रमाणांवर विक्री झाले आहे कोणत्याही शेतक-याने सदोष बियाणे असल्याबद्यल तक्रार केली नाही. तक्रारदार यांचे चुकीमुळे बियाणांची उगवण झाली नाही तसेच तक्रारदाराच्या शेतात योग्य ओलावा उपलब्ध होता किंवा काय ? याबाबतही कोणताही पुरावा उपलब्ध नाही तसेच बियाणांची तपासणी करुन घेतलेली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
7. तक्रारदार व सामनेवाला यांनी दिलेल्या संपुर्ण पुराव्याचे व दस्तऐवजांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्या दुकानातुन राशी टिप टॉप मका बियाणे खरेदी केले त्याची पावती रेकॉर्डवर दाखल आहे. तसेच तक्रारदार यांनी कृषी अधिकारी यांचेकडे जो अर्ज दिला आहे त्याची छायाप्रत रेकॉर्डवर दाखल आहे. कृषी अधिकारी यांनी दि.20/7/2010 रोजी मोका तपासणी केली त्यामध्ये 35 टक्के उगवण झाली आहे. मका पिकाची वाढ कमी आहे असे नमुद केलेले आहे. सदरचा मका हा जुन महीन्यात पेरला होता तदनंतर एक महीन्याच्या कालावधीत त्याची वाढ अत्यल्प असते. मका बियाणे विरळ उतरले आहे. सदरची बाब लक्षात घेतली असता, जर मका बियाणे खोल जमीनीत पडले असेल अगर पुरेसा ओलावा नसेल तर, बियाणे उगवण क्षमतेवर विपरित परिणाम होतो. तक्रारदार यांनी बियाणे पेरले त्यांवेळेस योग्य पाऊस झाला होता, शेतात ओलावा होता ही बाब सिध्द केलेली नाही. तसेच सामनेवाला यांनी सदरील लॉटच्या बियाणांचे मोठया प्रमाणांवर उत्पादन केलेले आहे. कोणत्याही शेतक-याची तक्रारदार करतात त्याप्रमाणे तक्रार सामनेवाला यांचेकडे प्राप्त झालेली नाही. तसेच मका बियाणांची प्रयोगशाळेतुन तपासणी करुन घेऊन बियाणांत उत्पादकीय दोष आहे किंवा काय ? हे ही या मंचासमोर उपलब्ध नाही. केवळ कृषी अधिकारी यांनी जो अहवाल दिला आहे त्याचे आधारे बियाणे सदोष आहे असे ठरविता येत नाही. कृषी अधिकारी यांचे रिपोर्टमध्ये उगवण झाली नाही असे नमुद केलेले आहे तसेच उगवण न झाल्यामुळे शेतक-याचे आर्थिक नुकसान होणार आहे असे नमुद केलेले आहे. जळगांव येथील विक्री अधिकारी म्हणजे बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांची साक्ष पाहीली असता, कोणत्याही शेतक-याने सदरील बियाणांबाबत तक्रार केलेली नाही. सदरील वाण हा चांगल्या प्रतीचा आहे व त्याची उगवण क्षमता चांगली आहे असे त्यात नमुद केलेले आहे. तसेच बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांची साक्ष पाहीली असता, बियाणे पेरल्यानंतर उगवण क्षमतेसाठी पाहीजे तेवढा पाऊस झाला नाही ही बाबही त्यात स्पष्टपणे नमुद केलेली आहे. कृषी अधिकारी यांचे अहवालामध्ये बियाणांची उगवण होण्यासाठी योग्य व पोषक वातावरण होते याबाबत कोठेही स्पष्ट उल्लेख केलेला नाही. कृषी अधिकारी यांची उलट तपासणी पाहीली असता, त्यामध्ये त्यांनी 35 टक्के मका उत्पादन झाल्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे असे नमुद केलेले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या साक्षीमध्ये 18 ते 20 टक्के उगवण झाल्याचे नमुद केलेले आहे म्हणजेच प्रत्यक्ष रिपोर्ट व साक्ष यांचे अवलोकन केले असता, नक्की किती टक्के उगवण झाली आहे याबाबत भिन्नता आढळुन येते. तसेच सदरील पिक मोका अहवाल तयार करतांना समितीचे सर्व सदस्य हजर असणे आवश्यक असते तेही हजर नसल्याबद्यलचे निष्पन्न होते. संपुर्ण पुराव्याचा विचार केल्यानंतर या मंचाचे मत की, सदर बियाणे हे सदोष होते असा निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. सबब मुद्या क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 08/09/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.