जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 485/2011 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 15/12/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-30/06/2015.
श्री.शांताराम लोटु पवार,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.पातोंडा,ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. राशी सीडस प्रा.लि.
273, कमराजनार रोड, अत्तुर जि.सालेम (तामिलनाडु)
2. मॅनेजर, हरियाली किसान बाजार,
यावल रोड,चोपडा,ता.चोपडा,जि.जळगांव. ........ सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.जयप्रकाश आर.महाजन वकील.
सामनेवाला क्र. 1 तर्फे श्री.दिलीप बी.मंडोरे वकील.
सामनेवाला क्र. 2 तर्फे श्री.शरद आर.न्हायदे वकील.
निकाल-पत्र
आदेश व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार श्री.शांताराम लोटु पवार यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी निकृष्ठ प्रतीचे बियाणे विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदाराचा मुलगा सुनिल शांताराम पवार यांचे मालकीची मौजे पातोंडा येथे गट नंबर 286/1/अ शेत जमीन आहे. सदरील शेत जमीन हे तक्रारदार वहीती करतात. सदरील शेत जमीन कोरडवाहु पिकाचे उत्पादन घेण्यासाठी उत्तम प्रतीची आहे. तक्रारदारास शेतीचा भरपुर अनुभव आहे. त्यांची सन 2008 ते सन 2011 या कालावधीसाठी संपर्क शेतकरी म्हणुन निवड करण्यात आली आहे. सामनेवाला क्र. 1 हे बियाणे उत्पादन करणारी व विक्री करणारी कंपनी आहे. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेल्या बियाणांची विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांचेकडे जवळ जवळ 30 ते 32 एकर शेत जमीन आहे. तक्रारदाराने त्याचे काही शेत जमीनीमध्ये लागवडीकरिता बियाणे खरेदी करावयाचे असल्यामुळे त्यांनी सामनेवाला क्र. 2 यांचेकडे संपर्क साधला व बिजी कॉटन-I RCH-2 राशी कपाशी बियाणांची चौकशी केली. सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदारास सदरील बियाणासोबत लिंकींग असलेले बिटी कॉटन RCH SAI-I-118 BG-I हे बियाणे विकत घ्यावे लागतील तरच त्यांना बिजी कॉटन-I RCH-2 राशी बियाणे मिळतील असे सांगीतले. तक्रारदाराने सामनेवाला यांनी दिलेल्या हमीवर विश्वास ठेवुन बिजी कॉटन-I RCH-2 राशी हे बियाणे विकत घेतले व त्यावर लिंकींग म्हणुन बिटी कॉटन RCH SAI-I-118 BG-I राशीचे बियाणे खरेदी केले. रक्कम रु.4,980/- चा भरणा सामनेवाला यांचेकडे करुन बी घेतले आहे. तक्रारदाराने गट नंबर 286/1 यामध्ये 1 हेक्टर 71 आर क्षेत्राची मशागत करुन दि.7/7/2011 रोजी बिटी कॉटन RCH SAI-I-118 BG-I बियाणांची लागवड केली. पिक लागवडीनंतर पासऊन झाला. तक्रारदाराने निंदणी, कोळपणी व खताच्या मात्रा देऊन जमिनीची कस वाढविला. काही ठिकाणी रोपे उगवली नाहीत. तक्रारदाराने पेरणी नंतर 8 ते 18 दिवसांनी आशिष कृषी सेवा केंद्र,चोपडा यांच्याकडुन अजित 155 बीजी-2 बियाणे विकत घेऊन शेत जमीनीत जागोजागी सांधणी केली व शेतीची मशागत केली तसेच आवश्यक ते खते तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे दिले. तक्रारदाराने औषध फवारणी वेळोवेळी केलेली आहे. तक्रारदाराने संपुर्ण काळजी घेऊन बिटी कॉटन RCH SAI-I-118 BG-I राशी बियाणांच्या पिकाची वाढ झाली नाही. झाडांची वाढ ही साधारणतः एक ते दिड फुटापेक्षाही कमी आहे. 25 ते 30 टक्के झाडे ही मुळापासुन शेंडयापर्यंत कोरडी झालेली आहेत. तक्रारदाराने सांधणी करुन पेरलेले अजित 155 बीजी-2 झाडांची वाढ जोमाने झाल्याचे आढळुन आले. तसेच त्यावर रोगाचा प्रार्दुभाव आढळुन आला नाही. बियाणे सदोष असल्यामुळे तक्रारदाराचे फार मोठे नुकसान झाले. तक्रारदारास 72 ते 75 क्विंटल कापुस उत्पादन होते. तक्रारदाराने दि.10/9/2011 रोजी मोबाईलवरुन तक्रार केली. सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दि.1/11/2011 रोजी जिल्हा कृषी अधिकारी,जळगांव यांचेकडे लेखी अर्ज दिला व बियाणांबाबत तक्रार केली. दि.8/11/2011 रोजी तालुका कृषी कार्यालयाचे तपासाधिकारी व मंडल अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, विक्री प्रतिनिधी व पंच यांनी तक्रारदाराचे शेतावर येऊन पिक परिस्थितीचा पंचनामा केला. तक्रारदार यांनी विक्री केलेले बियाणे हे अत्यंत सदोष, निकृष्ठ व अनुवांशीक दोष असल्याचे लक्षात आले. तक्रारदाराचे विनंतीवरुन जिल्हा कृषी अधिकारी,जळगांव यांनी फेर पंचनामा केला. त्यात झाडांची अत्यंत अल्प वाढ झाल्यामुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसान झाले आहे असे नमुद केलेले आहे. सामनेवाला क्र. 1 व 2 हे सदरील नुकसानीस जबाबदार आहेत. तक्रारदाराचे एकुण रु.4,77,480/- चे नुकसान झाले आहे. सबब तक्रारदारास ती नुकसान भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी जवळपास एकसारखाच लेखी खुलासा सादर केला. सामनेवाला क्र. 1 व 2 चे कथन की, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाला क्र. 1 व 2 चे कथन की, गट नंबर 286/1 अ हा तक्रारदाराचा मुलगा सुनिल शांताराम पवार यांचे नावावर आहे. तक्रारदार हे सदरील शेतीची वहिवाट करतात याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. सदरील बियाणे तक्रारदाराने नमुद केलेल्या क्षेत्रात पेरणी केली होती याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराने लागवडीनंतर रिकामे असलेले पाकीट या मंचासमोर हजर केलेले नाही त्यामुळे तक्रारदाराने कोणत्या बियाणांची लागवड केली आहे हे स्पष्ट होत नाही. सामनेवाला क्र. 2 यांचेकडुन बियाणे विकत घेतांना ते मोहरबंद पाकीटात विकत घेतले आहे. सामनेवाला क्र. 1 यांनी बियाणे उत्पादीत केले आहे. तक्रारदाराचे व्यतिरिक्त ब-याच शेतक-यांनी बियाणे खरेदी केले आहे त्यांनी बियाणांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार केली नाही. तक्रारदार म्हणता तेवढा खर्च तक्रारदार यांनी शेत जमीनीच्या मशागतीसाठी, औषधे फवारणीसाठी केलेला नाही. कृषी अधिकारी यांनी केलेला पिक पंचनामा हा मोघम स्वरुपाचा आहे. बियाणे कंपनीचे प्रतिनिधी श्री.जगदीश कवडे हे पंचनाम्याच्या वेळेस हजर होते त्यांनी आपला अभिप्राय दिला आहे की, कपाशी पिकावर रस शोषणा-या आळीचा प्रार्दुभाव झाल्याचा तसेच इतर वाणाची त्यात साधणी केलेली होती. त्याचा प्रभाव कपाशी वर झालेला होता. तक्रारदाराचे चुकीमुळे व बेजबाबदारपणामुळे त्याचे नुकसान झाले आहे. सामनेवाला क्र. 2 हे सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले बियाणे नियमाने ठरवुन दिलेल्या तत्वाचे पालन करुन सिलबंद पाकीटातुन विक्री करतात त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारदाराने घेतलेल्या बियाणांची प्रयोगशाळेकडुन तपासणी करुन घेतलेली नाही. महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्याच्या बाहेर ब-याच शेतक-यांनी सदरील लॉट चे बियाणे खरेदी केले आहे. सदरील बियाणांच्या गुणवत्तेबाबत कोणाचीही लेखी अगर तोंडी तक्रार आली नाही. सामनेवाला क्र. 1 ही नामांकीत कंपनी असुन सदरील बियाणे बाजारात विक्रीसाठी आणण्याचे अगोदर त्या लॉटची संपुर्ण प्रयोगशाळेतुन तपासणी होऊन स्किल टेस्ट होऊन शासनाने निर्देशीत केलेल्या गुणवत्तेनुसार खात्री करुन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. तसेच अर्जदार शांताराम लोटू पवार यांनी भगवान लोटू पवार यांची शेती मक्त्याने घेतली आहे त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाही. बियाणामध्ये कोणताही दोष नव्हता. कपाशी पिकाची वाढ ही ब-याचशा गोष्टीवर अवलंबुन असते. जमिनीचा कस, अन्न घटकाची आवश्यकता, योग्य रासायनीक खताचा वापर, हवामान, पुरेसे पाणी हे महत्वाचे घटक आहेत. जास्त पाऊस अथवा रासायनीक खताचे कमी प्रमाण यामुळे पिकावर विपरीत परिणाम होतो. गट नंबर 286/1/अ ही तक्रारदाराच्या मालकीची नाही व त्याचे वहिवाटीत नाही. पिक पेरा सुनिल शांताराम पवार यांचे नावावर आहे. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे.
4. तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराने अतिरिक्त पुराव्याचे शपथपत्रही दाखल केलेले आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र, दस्तऐवज हजर केलेले आहेत. सामनेवाला यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदाराने लेखी युक्तीवाद सादर केला आहे तसेच केस लॉ दाखल केला आहे. तक्रारदार व सामनेवाला वकीलांचा युक्तीवाद ऐकला, न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली
आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3) कोणता आदेश ? शेवटी दिलेप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2
5. तक्रारदाराने दाखल केलेला लेखी युक्तीवाद लक्षात घेतला असता तक्रारदाराचे कथन की, त्यांनी गट नंबर 286/1/अ मध्ये 1 हेक्टर 71 आर या शेत जमिनीत सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले बिटी कॉटन RCH SAI-I-118 BG-I राशीच्या बियाणांची लागवड केली होती. सदरील बियाणे हे सामनेवाला क्र. 2 यांच्याकडुन घेतलेले होते. सदरील बियाणांची लागवड केल्यानंतर कपाशीच्या पिकाची वाढ झाली नाही. झाडांना फुले, पाती आली नाही. झाडांची वाढ एक ते दिड फुटापेक्षा जास्त झाली नाही. तक्रारदाराने कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार देऊन पिक पाहणी करण्याबाबत विनंती केली. कृषी अधिकारी यांनी पिक पाहणी केली असता बियाणे सदोष आहे त्यामुळे झाडांची वाढ झाली नाही. तक्रारदाराने असे कथन केलेले आहे की, त्याचे 75 क्विंटल कपाशीचे नुकसान झाले आहे तसेच शेत मशागत, औषधे, खते यामध्ये खर्च करावा लागला आहे. तक्रारदाराने त्याचे युक्तीवादाचे समर्थनार्थ 2012 (0) BCI 29 मा.सुप्रिम कोर्ट नॅशनल सिड कॉर्पोरेशन लि // विरुध्द // एम मधुसुदन रेडडी या केसचा हवाला दिला आहे व असा युक्तीवाद केला आहे की, तक्रारदाराने सॅम्पल राखुन ठेवले नाही केवळ त्या कारणासाठी तक्रारदाराची तक्रार रद्य होऊ शकत नाही कारण कृषी अधिका-यांचा रिपोर्ट आहे तो ग्राहय धरण्यात यावा.
6. सामनेवाला यांनी असा युक्तीवाद केला की, सदरील शेत जमीन तक्रारदाराचे नावावर नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदाराने सामनेवाला यांचे कडील उत्पादीत केलेल्या बियाणांची लागवड तक्रारीत नमुद केलेल्या शेत जमीनीत केल्याबाबत कोणताही पुरावा नाही तसेच सदरील शेत जमीन ही तक्रारदार करीत नसुन सुनिल शांताराम पवार यांचे वतीने ति-हाईत इसम करीत आहेत. सदरील शेत जमिनीच्या आधारे सुनिल शांताराम पवार यांचे नावावर तक्रारदाराने एकत्र कुटूंबात शेती करतात याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराने कृषी अधिकारी यांचा रिपोर्ट सादर केला आहे त्यामध्ये रस शोषणा-या किडीचा मोठया प्रमाणांवर प्रार्दुभाव झाला आहे त्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे तसेच लाल्या रोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे. तक्रारदाराने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे कपाशीच्या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे त्यामुळे बियाणे सदोष होते असा निष्कर्ष काढता येत नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे.
7. वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार व त्याचे साक्षीदारांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्तऐवजाचे अवलोकन केले. सदरील गट नंबर 286/1/अ हा तक्रारदाराच्या नावावर नाही. तो सुनिल शांताराम पवार यांचे नावावर आहे. तक्रारदार म्हणतात त्यांनी सामनेवाला यांचेकडुन बिटी कॉटन RCH SAI-I-118 BG-I राशीचे बियाणे विकत घेतले आहे व त्याची लागवड केली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या खरेदीच्या पावत्या लक्षात घेतल्या असता सदरील पावती ही हरीयाली किसान बाजार येथुन बिटी कॉटन BG-I RCH-2, बिटी कॉटन BG-II, तसेच बिटी कॉटन BG-II खरेदी केल्याबाबत निर्दशनास येते. सदरील पावत्यांचे निरिक्षण केले असता खरेदीदाराचे नांव या ठिकाणी खरेदीदाराचे कुणाचेही नांव लिहीलेले नाही तो कॉलम कोरा आहे. तक्रारदाराने सदरील बियाणे खरेदी केले आहे व ते खरेदीदार आहेत हे सुचित केलेले नाही त्यामुळे तक्रारदाराने हरीयाली किसान बाजार येथुन त्याचे नांवे वादातील बियाणे विकत घेतले हे ठरविता येत नाही. तसेच तक्रारदाराने बियाणांचा कॅश मेमो दाखल केला आहे त्या कॅश मेमोवर आशिष कृषी सेवा केंद्र या दुकानाचे नांव छापलेले आहे. तक्रारदाराने इतर ज्या पावत्या दाखल केलेल्या आहेत त्या त्यांनी खते व औषधे विकत घेतल्याचे दर्शवितात. तक्रारदार म्हणतात की, त्यांचे नांवे 30 ते 32 एकर शेती आहे. सहाजिकच सदरचे खते व औषधे तक्रारदाराने त्याचे स्वतःचे शेतातील पिकासाठी घेतलेले आहे. कृषी अधिकारी यांचा अहवाल पाहीला असता, त्यामध्ये स्पष्ट नमुद केलेले आहे की, कपाशीच्या वाणावर रस शोषणा-या किडीचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर दिसुन आला, वाढ खुंटलेली आहे. शेतक-यास कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सदरील पिक पाहणीचे वेळेस हरियाली किसान बाजार, चोपडा यांचे मॅनेजर हजर होते त्यांचे कथनानुसार रस शोषणा-या किडीचा ब-याच जास्त प्रमाणांत प्रार्दुभाव आहे त्यामुळे पिकाची वाढ खुंटलेली आहे. वाणावर बोंडे व पाती असल्यामुळे झाडांची पुनरावृत्ती वाढ झालेली आहे. श्री.शांताराम लोटू पवार यांचे शेत भगवान हिलाल पाटील हे करतात असे स्पष्ट नमुद केलेले आहे. तसेच पंचनाम्यामध्ये संपुर्ण शेत लाल्या रोगाने ग्रस्त झाले आहे असे नमुद केलेले आहे. वर नमुद केलेल्या बाबींचा विचार केला असता, असे निर्दशनास येते की, तक्रारदाराने रोग प्रतिबंधक उपाययोजना वेळोवेळी गेलेल्या नाहीत. रस शोषणा-या किडीचा प्रार्दुभावामुळे झाडांची वाढ होणे शक्य नाही तसेच त्यास बोंडे येणे शक्य नाही. सदरील रोगाचा प्रार्दुभाव हा बियाणांमध्ये दोष आहे त्या कारणामुळे झालेला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराने खरेदी केलेल्या लॉट मध्ये इतर ब-याचशा शेतक-यांना बियाणे विक्री केलेली आहे., कुठल्याही शेतक-यांनी बियाणे निकृष्ठ असल्याबाबत तक्रार केल्याचे आढळुन येत नाही. सबब वर नमुद केलेल्या कारणमिमांसेवरुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. सबब या मंचाचे मत की, तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. यास्तव आदेश.
आ दे श
1) तक्रारदारांची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 30/06/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.