निकाल
दिनांक- 31.07.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदोष टायर व टयूब बदलून मिळणेबाबत किंवा त्याची किंमत परत मिळणेबाबत दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, गैरअर्जदार क्र.1 हा अपोलो टायर कंपनीचा विक्रेता(डिलर) आहे. गैरअर्जदार क्र.2 हा अपोलो टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. तक्रारदार यांनी, तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टर ट्रेलर नं.एम.एच.10-एच-9073 आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादन केलेले टायर व टयूब दि.14.12.2010 रोजी रक्कम रु.9,200/- मध्ये विकत घेतला. सदरील टायर व टयूब विकत घेतेवेळेस गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदारास टायर टयूबची सहा महिन्याची गॅरंटी दिली होती.
तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन की, तक्रारदार यांनी टायर टयूब विकत घेतल्यानंतर ते ट्रॅक्टर ट्रेलरच्या चाकांना बसविले व योग्य ती हवा भरली. सदरील ट्रेलर ऊस वाहतुक करण्याकरता वापरण्यास सुरुवात केली. दि.13.01.2011 रोजी नविन टायरचे रिंगगोट तुटले व ते फुटले. तक्रारदार यांचे कथन की, सदरील टायर व टयूब हे निकृष्ट दर्जाचे होते, त्यामध्ये उत्पादन करतेवेळेसच दोष होता.
तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे जाऊन टायर टयूब खराब निघाल्याबाबत माहिती दिली व ते बदलून देण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यांना टायर व टयूब गैरअर्जदार क्र.2 कंपनीकडे पाठवावे लागेल त्यासाठी खर्च रु.500/- येईल असे सांगितले. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना रु.500/- दिले, व टायर टयूब बदलून देण्यासाठी परत केले. एक महिन्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यांना टायर टयूब बदलून देण्यास नकार दिला. गैरअर्जदार क्र.2 यांनी टायर व टयूब यांची वैज्ञानिक व तांत्रिक पध्दतीने तपासणी न करताच खोटा व चुकीचा अभिप्राय देऊन तक्रारदार यांची मागणी नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दि.26.02.2011 रोजी नोटीस पाठविली, परंतू गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदार यांचे ट्रॅक्टर दोन दिवस बंद राहिले त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास सोसावा लागला. तसेच तक्रारदार यांना दुस-या कंपनीचे टायर टयूब विकत घ्यावे लागले. सबब तक्रारदार यांना एकूण रक्कम रु.19,700/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडून दाव्याचा खर्च व मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली.
गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी निवेदन दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी, तक्रारदार यांनी त्यांचेकडून टायर व टयूब खरेदी केले ही बाब मान्य केली आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2 हे टायर व टयूबचे उत्पादक आहे ही बाब मान्य केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन की, जर टयूब व टायरमध्ये निर्मिती दोष आढळल्यास सदरील टयुब व टायर कंपनीकडून बदलून मिळते. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन की, टायर व टयूब बदलून देण्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असते. गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत कसूर केलेली नाही.
गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी निवेदन सादर केले आहे. गैरअर्जदार 2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार दाखल होण्यास पात्र नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचे कथन की, टयूब व टायरमध्ये कोणताही उत्पादीकीय दोष नव्हता. गैरअर्जदार क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, त्यांनी टायर तपासणीसाठी पाठविले होते, त्यामध्ये उत्पादन दोष आढळून आला नाही. त्यामुळे तक्रारदार यांची मागणी मान्य करता आली नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी टायर व्यवस्थित बसविले नव्हते व सदोष रिंगगोट मुळे सदरील टायर फुटले आहे. सबब, गैरअर्जदार क्र.2 यांचे कथन की, तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, राम टायर्स यांची पावती, दावा नामंजूर केल्याचे सामनेवाले यांचे पत्र, सामनेवाले क्र.1 यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोस्टाच्या पावत्या, पोस्टाची पोहच पावती, नोटीस परत आल्याचे पाकीट इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.सामनेवाले क्र.1 यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ उमेश रामप्रकाश जग्गी यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ संजय जैन पि एम.एस.जैन यांचे शपथपत्र दाखल केले आहे तसेच सामनेवाले यांनी राज्य आयोगाचे अपिललातील निर्णयाची प्रत, तसेच जिल्हा मंच बीड यांचे निर्णयाची प्रतीक्षा इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत.
तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सदर टायर टयुब मध्ये उत्पादित दोष
असल्याचे सिध्द करु शकतात काय नाही.
2. तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय नाही.
3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकिलांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाले यांचे कागदपत्राचे अवलोकन केले असता आणि तक्रारदाराच्या कथनानुसार तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडून सामनेवाले क्र.2 यांनी उत्पादित केलेले टायर व टयुब दि.14.5.2010 ला रक्कम रु.9200/- देऊन खरेदी केले आहे ही बाब सामनेवाले क्र.1 व 2 यांना मान्य आहे. तक्रारदारांच्या कथनानुसार सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून घेतलेले टायर टयूब दि.13.01.2011 रोजी टायरचे रिंगगोट तुटले व ते फुटले. सदर टायरमध्ये दोष असल्याबाबत तक्रारदाराने दि.15.01.2011 रोजी सामनेवाले क्र.1 व 2 यांना कळविले व टायर तपासणीसाठी खर्चासह पाठविले. सदर टायरटयूब सामनेवाले क्र.2 यांनी तपासणी करुन त्यामध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही असे पत्र दि.28.01.2011 रोजी पाठविले.
सदरील टायरमध्ये उत्पादकीय दोष होता ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? हे प्रामुख्याने पाहणे महत्वाचे आहे. तक्रारदार यांनी संबंधित टायर गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविले, गैरअर्जदार क्र.2 कंपनीने सदरील टायरची शास्त्रीय तपासणी केली असता टायरमध्ये उत्पादकीय दोष आढळून आला नाही. सदरील रिपोर्ट गैरअर्जदार यांनी अर्जदारास कळविला आहे, तो रिपोर्ट गैरअर्जदार यांनी मंचापूढे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सदरील टायर मंचासमोर हजर केले नाही अगर त्या टायरमध्ये उत्पादकीय दोष आहे किंवा काय? हे पाहण्यासाठी योग्य त्या प्रयोगशाळेत पाठविण्यासंबंधी कोणतीही कारवाई केली नाही,
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 व 2 यांनी दाखल केलेल्या पत्रावर स्पष्ट असा पुरावा दाखल केला नाही. त्या व्यतिरिक्त तक्रारदार यांनी टायरटयुब मध्ये उत्पादकीय दोष असल्याबाबत कोणत्याही तज्ञाचे मत तक्रारीमध्ये दाखल केलेले नाही.तसेच त्याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही.तक्रारदारांनी मंचालाही अशी विनंती केली नाही की, सदर टायर टयूब मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवावे. ही परिस्थिती लक्षात घेता तक्रारदार हे योग्य पुराव्यासह मंचासमोर आलेले नाहीत. त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रूटी केली ही बाब सिध्द होत नाही.
वरील सर्व विवेचनावरुन मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.