पारीत दिनांकः- 30/11/2013
(द्वारा- अंजली देशमुख, अध्यक्ष
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदारांनी त्यांच्या इमारतीमध्ये आणि सदनिकेमध्ये अनेक त्रुटी ठेवलेल्या आहेत, म्हणून दाखल केली आहे. प्रस्तुतची तक्रार ही सोसायटीमार्फत दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांनी जाबदारांकडून (1) सोसायटी इमारतीच्या अंतर्भागातील रस्ता जो टाईल्स शिवाय (फरशी/कॉंक्रीट) तसाच आहे तो दक्षिणोत्तर आतील रस्ता फरशा बसवून अथवा दर्जेदार कॉंक्रीट करुन पूर्ण करुन द्यावा. (2) संपूर्ण इमारतीतील ड्रेनेज कामी संडास, बाथरुम व वॉश बेसिन सिंक आदींतून प्रवाहीत होणा-या सांडपाण्याची विल्हेवाट लावणारी विसर्ग नलिका जी खोडसाळपणाने जाबदारांनी सुमार दर्जाच्या प्लॅस्टिकची पुरविलेली आहे ती बदलून इमारतीच्या दर्शनी भागात येणार नाही अशारितीने नवी व दुसरी पक्क्या सिमेंटच्या मोठया नलिकांचा वापर करुन इमारतीच्या मागील भागात अद्ययावत करुन द्यावी. (3) इमारतीतील सांडपाण्याचा होणारा विसर्ग हा ग्रामपंचायत प्रशासनाच्या परवानगीनुसार मलमुत्र विसर्जन इमारतीपासून दूर आरोग्याच्या दृष्टीने योग्य अशा ठिकाणी वाहून नेला जाईल अशी व्यवस्था जाबदारांनी करुन द्यावी. तसेच पार्कींगमध्येच जाबदारांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे. सोसायटीचे बांधकामाचे साहित्य उदा. दर्जाहीन प्लॅस्टिक वापरून ड्रेनेजपाईप लाईन घातली आहे, त्यामुळे सगळीकडे गळती होत आहे त्यामुळे दुर्गंधी येत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना राहणे कठीण जात आहे. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदारांकडून वरील सर्व त्रुटी दूर करुन मागतात. तसेच रु. 2,00,000/- नुकसानभरपाई, रक्कम रु. 10,000/- प्रत्येकी मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र, फोटोग्राफ्स, करारनामा आणि खरेदीखत व इतर कागदपत्रे दाखल केली आहेत.
2. जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेच तक्रार घडण्याचे कारण नमुद केले नाही जाबदारांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील सर्व सदनिकाधारकांना सन 2003 मध्येच ताबा दिला होता व सन 2007 मध्ये सोसायटी नोंदणीकृत करुन दिली आहे आणि मंजूर प्लॅननुसार सर्व बांधकाम केलेले आहे. सदर इमारतीचे बांधकाम आठ वर्षांपूर्वी झाले असून त्याच वेळेस संपूर्ण काम करुन ड्रेनेज पाईपलाईन पार्कींग, फ्लोअरींग काम, सिमेंट कॉंक्रीटमध्ये करुन दिलेले आहे. जाबदारांनी सन 2007 मध्येच सोसायटी स्थापन करुन दिली आहे. फलॅटधारकांकडून कोणतेही मेंटेनन्स चार्जेस त्यांनी स्विकारलेले नव्हते, सोसायटी करुन दिल्यानंतर इमारतीची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी सोसायटीची व तिथे राहत असलेल्या सोसायटीतील सदनिकाधारकांची आहे, त्यामुळे सात वर्षानंतर पाईपलाईनमधून गळती व इतर त्रुटी ते दाखवतात त्यास विलंब झाल्याचे जाबदार म्हणतात. उलट काही सदनिकाधारकांकडून रकमेची येणेबाकी आहे ते द्यायला लागू नये म्हणून ही तक्रार दाखल केली आहे असे जाबदारांचे म्हणणे आहे, यावरुन जाबदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात. जाबदारांनी कागदपत्रे, शपथपत्र आणि विजेची बिले दाखल केली. जाबदारांनी फ्लॅटधारक जब्बार कादर फकीर आणि रफिक कादर फकिर यांचे प्रतिज्ञापत्र, व फ्लॅट नं. 19 चे सन 2003 मध्ये वीजमीटर मिळाल्याचा पुरावा म्हणून वीज बिल दाखल केले.
3. त्यानंतर तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले.
4. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांची तक्रार संपूर्णपणे वाचल्यानंतर त्यांनी कुठेही सदनिकेचा ताबा केव्हा घेतला हे नमुद केले नाही, असे दिसून येते. तक्रारदार सोसायटीने त्यांच्या इमारतीमध्ये किती त्रुटी आहेत, बांधकामाचा दर्जा चांगला नाही, ड्रेनेजलाईन व्यवस्थित नाही त्यामुळे तेथील रहिवाशांना त्रास होत आहे, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असे तक्रारीत म्हणतात. मात्र जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये सन 2003 मध्येच खरेदीतखत करुन त्यांचे ताबा दिल्याचे म्हणतात, खरेदीखताची प्रत दाखल केली आहे, ती सन 2003 ची आहे व सोसायटी सन 2007 मध्ये करुन दिली आहे. तेथील रहिवासी फलॅट नं. 19 – श्री. मोहम्मदजाफर छोटेमियाँ टक्की यांच्या विज बिलामध्ये विज-पुरवठा तारीख 10/4/2003 असे नमुद केले आहे. तसेच श्री. तिरंदाज अयाज अरिफ यांचेही बिल दाखल केले आहे त्यातील पुरवठाही 2003-04 चा दिसून येतो. म्हणजेच सन 2003 साली सर्व तक्रारदारांना सदनिकेचा ताबा मिळाला होता हे स्पष्ट होते. जाबदारांनी तेथील रहिवासी श्री. जब्बार कादर फकिर व रफिक कादर फकिर यांचे शपथपत्र दाखल केले, त्यामध्ये ते म्हणतात कि दि. 14/12/2002 नंतर त्यांना ताबा मिळाला, इमारतीबाबत त्यांची कुठलीही तक्रार नव्हती, जाबदारांनी त्यांना सर्व सोई सुविधायुक्त बांधकाम करुन दिले होते असे ते नमुद करतात. सदरील संस्थेतील आतील रस्ते हे दुकानदारांच्या रहदारीमुळे खराब झाले आहेत तसेच त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात संस्थेच्या अध्यक्षांनी काही सभासदांना हाताशी धरुन बिल्डरच्याविरुध्द ही तक्रार दाखल केली आहे असे म्हणतात. हे शपथपत्र चुकीचे आहे असे तक्रारदारांनी म्हंटले नाही. तक्रारदारास सन 2003 मध्ये खरेदीखत करुन दिल्याचे दिसून येते आणि तक्रारदारांनी त्याबाबत कुठेही तक्रारीत नमुद केले नाही तसेच त्यांच्या तक्रारीत ज्या काही त्रुटी मांडल्या आहेत, त्यासाठी आर्कीटेक्ट किंवा सिव्हील इंजिनिअरचा कुठलाही स्वतंत्र पुरावा तक्रारदारांनी दाखल केला नाही. जाबदारांनी सन 2003 ची तेथे राहणा-या सभासदांची विजेची बिले दाखल केली आहेत, यावरुन सन 2003 मध्येच ताबा दिल्याचे दिसून येते. राहावयास सन 2003 मध्ये जाऊन सन 2010 मध्ये ही तक्रार दाखल केलली आहे त्यासाठी विलंब माफीचा अर्जसुध्दा तक्रारदारांनी दाखल केला नाही. मुळातच ही तक्रार मुदतबाहय आहे तसेच त्रुटींबाबत पुरावाही दिलेला नाही, या दोन्ही कारणांवरुन तक्रार नामंजूर करण्यात येते.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत काही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
याव्यात.