( मंचाचे निर्णयान्वये - श्री.मिलिंद केदार - सदस्य.) //- आदेश -// (पारित दिनांक – 07/08/2010) 1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारांविरुध्द दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आश असा आहे की, तिचे गैरअर्जदार बँकेमध्ये बचत खाते क्र.03500100180893 असून यावर धनादेश पुस्तिकेची सेवा प्रदान केलेली आहे. दि.04.04.2009 रोजी तक्रारकर्तीने धनादेश पुस्तिकेमध्ये संलग्न असणा-या अर्जावर सही करुन नविन धनादेश पुस्तिका मागणीकरीता गैरअर्जदार क्र. 5 कडे अर्ज केला. गैरअर्जदाराने नंतर बोलाविले असता तक्रारकर्ती दि.23.04.2009 गेली असता धनादेश पुस्तिका आधीच देण्यात आल्याचे सांगितले व नविन धनादेश पुस्तिकेकरीता नविन अर्ज द्यावा लागेल असे सुचविले व त्यानुसार तक्रारकर्तीने दुसरा अर्ज करुन गैरअर्जदारांना दिला व त्यांनी धनादेश पुस्तिका क्र.212461 ते 212480 तक्रारकर्तीस दिली. चौकशीअंती असे कळले की, आधीच्या अर्जानुसार कोणीतरीही जुन्या अर्जाप्रमाणे धनादेश पुस्तिका खोटी स्वाक्षरी करुन घेतली व सदर बचत खात्यातून रु.2,02,000/- काढलेले आहेत. त्यामुळे तक्रारकर्तीचे टाटा फायनांस लिमिटेडला दिलेले धनादेश परत आले व तिला रु.2400/- चा दंड सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली असून बचत खात्यातून काढण्यात आलेली रक्कम व्याजासह, मानसिक व शारिरीक त्रासापोटी भरपाई, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी सदर तक्रारीस संयुक्तपणे लेखी उत्तर दस्तऐवजासह दाखल केले. दि.30.01.2010 चे मंचाचे आदेशांन्वये गैरअर्जदार क्र. 3 व 5 ला सदर तक्रारीतून वगळण्यात आले. 3. गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस संयुक्तपणे उत्तर दाखल करुन नमूद केले आहे की, तक्रारकर्तीला तिने धनादेश मागणी करणारी पावती (अधियाचन रसिद) स्वाक्षरी करुन दिल्यावरच देण्यात आली. तसेच धनादेशाची रक्कम ही पूर्ण तपासणी करुन व सही तपासून देण्यात आली. ज्या मुदतीत ही रक्कम काढल्या गेली त्या मुदतीत तक्रारकर्तीने कधीच गैरअर्जदाराला कळविले नाही की, तिच्या खात्यातून चुकीने रक्कम काढण्यात आलेली आहे. दि.08.04.2009 ते 17.04.2009 या कालावधीमध्ये तक्रारकर्तीच्या खात्यातून रक्कम काढण्यात आली होती व यानंतर तक्रारकर्तीने दि.23.04.2009 रोजी मुलातर्फे धनादेश पुस्तिका मिळण्याबाबत अर्ज केला व तिला धनादेश पुस्तिका देण्यात आली. जेव्हा तक्रारकर्तीने त्यांच्याकडे तक्रार केली की तिच्या खात्यातून रक्कम काढण्यात आलेली आहे, तेव्हा गैरअर्जदारांनी संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार क्र.109/09 दाखल करुन या घटनेशी संबंधित व्यक्तीला अटक केली व त्याचेवर फौजदारी दावा दाखल केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण तपास होऊन निकाल लागत नाही, तोपर्यंत गुन्हेगार कोण व तक्रारकर्तीच्या सहीवरुन कोणाच्या फायद्याकरीता रक्कम काढली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे पुरावा व उलटतपासणी होणे आवश्यक आहे, म्हणून सदर तक्रार ही दिवाणी न्यायालयासमोर चालविण्यात यावी. गैरअर्जदार बँकेची यात कुठलीही सेवेत त्रुटी नसून त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच गैरअर्जदार क्र.3 व 5 हे सदर प्रकरणी आवश्यक पक्ष नसल्याने त्यांना तक्रारीतून वगळण्याची विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमोर दि.13.07.2010 रोजी युक्तीवादाकरीता आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. उभय पक्षांच्या कथनावरुन तसेच दाखल दस्तऐवजावरुन तक्रारकर्तीचे गैरअर्जदाराकडे बचत खाते होते, म्हणून तक्रारकर्ती गैरअर्जदाराची ग्राहक आहे ही बाब स्पष्ट होते. 6. तक्रारकर्तीचा सदर प्रकरणी वाद असा आहे की, तिच्या बचत खात्यान्वये तिने चेकबुककरीता केलेली मागणीद्वारा अनोळखी त्रयस्थ व्यक्तीने ते चेकबुक हस्तगत करुन तिच्या बचत खात्यातून बनावट स्वाक्षरी करुन रु.2,02,000/- काढलेले आहेत. याबाबत तिने गैरअर्जदारांकडे तक्रार केली असता गैरअर्जदारांनी सदर बाबीला प्रतिसाद देऊन पोलीसांकडे फौजदारी गुन्हा नोंदवून संबंधित इसमास ताब्यात घेण्यात आले आहे व अधिक चौकशी सुरु आहे असे गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीच्या खात्यातून त्रयस्थ व्यक्तीने रक्कम काढली आहे. मंचाचे मते कोणालाही अथवा ग्राहकाला रक्कम देताना गैरअर्जदार यांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी होती. परंतू सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी योग्य काळजी न घेता रक्कम दिली ही बाब सिध्द होते. ही गैरअर्जदार यांची सेवेतील त्रुटी आहे. तसेच गैरअर्जदार हे संबंधित व्यक्तीकडून सदर रक्कम ही पोलिसांमार्फत वसुल करु शकतात. तक्रारकर्तीची धनादेश पुस्तिका ही गैरअर्जदारांकडून हस्तगत करुन बनावट सह्या त्यावर करुन तक्रारकर्तीच्या बचत खात्यातून मोठया प्रमाणात रक्कम काढून घेण्यात आलेली आहे व गैरअर्जदाराच्या ही बाब लक्षात आलेली आहे. मंचाचे मते सदर धनादेश जेव्हा गैरअर्जदारांकडे रक्कम काढण्याकरीता दाखल करण्यात आले, तेव्हा गैरअर्जदारांनी धनादेशावरील सह्याबाबत तपासणी करुन त्याबाबत संशय उत्पन्न व्हावयास पाहिजे होता. परंतू गैरअर्जदारांनी योग्य तपासणी केली नसल्याने सदर वाद उत्पन्न झालेला आहे. मंचाचे मते गैरअर्जदारांची ही सेवेतील त्रुटी असून त्यामुळे तक्रारकर्तीला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे तक्रारकर्तीची रक्कम दुस-या व्यक्तीने काढुन घेतली असल्यामुळे गैरअर्जदाराने सदर रक्कम (रु.2,02,000/-) तक्रारकर्तीस दि.19.11.2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी असे मंचाचे मत आहे. 7. सदर प्रकरणी तक्रारकर्तीने मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.3,00,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी अवाजवी आहे. परंतू तक्रारकर्तीच्या बचत खात्यातून अवैधरीत्या रक्कम काढण्यात आल्याने तिला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागाला ही बाब सत्य आहे, म्हणून सदर त्रासाच्या भरपाईबाबत तक्रारकर्ती रु.10,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस द्यावे. सदर निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. 7. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1, 2 व 4 ला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.2,02,000/- ही रक्कम तक्रार दाखल दिनांकापासून (दि.19.11.2009) तर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत 9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1, 2 व 4 ने तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.10,000/- द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1, 2 व 4 ने तक्रारकर्तीला रु.2,000/- अदा करावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1, 2 व 4 ने संयुक्तपणे किंवा वैयक्तीकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. 6) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे. |