निकालपत्र
निकाल दिनांक – २७/११/२०१९
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
___________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन कले आहे की, सानमनेवाले क्र.३ ही कंपनी असुन सदर कंपनी ही शेततळ्यासाठी लागणारा वॉटर प्रुफ कागद बनवणे व विक्री करण्याचा व्यवसाय करत असुन तिचे रजिष्टर्ड ऑफिस मुंबई येथे आहे. सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ या कंपनीचे सी.ई.ओ. असुन सामनेवाले क्र.१ हे कर्जत जि.अहमदनगर मधीलसदर कागद विक्रेता/ कंपनी डिलर आहेत. तक्रारदाराने शेतात शेततळे तयार करण्याचे ठरविले व सामनेवाले क्र.१ यांच्याशी संपर्क साधला. सामनेवाले क्र.१ यांनी मी कंपनीचा डिलर असुन तुम्हाला चांगल्या प्रतीचा कागद देईल व व्यवस्थित फिटींग करून देईल, असा भरवसा व खात्री दिली. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ यांचेवर व कंपनीवर विश्वास ठेवुन शेततळ्याकरीता लागणारा ४००० चौ.मी. कागदासाठी दिनांक ०५-०९-२०१४ रोजी सामनेवाले क्र.३ च्या बॅंक खात्यावर पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को.ऑप बॅंकेद्वारे आर.टी.जी.एस. करून सदर रक्कम रूपये ४,००,०००/- ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर सामनेवाले क्र.२ यांनी मोबाईलवर कळविले की, तुम्ही खरेदी केलेल्या कागदाचे बिल दिनांक ०८-०९-२०१४ रोजी झालेली असुन त्याचा टॅक्स इनव्हॉईस नं.००९८ आहे. सदर बिल व कागद तुम्हाला आमचे एजंट चव्हाण आणुन देतील. सदर कागदास लिकेजची ५ वर्षाची गॅरंटी आहे. काहीही झाले तरी याच प्रतीचा दुसरा कागद बदलुन देऊ, असा भरवसा व खात्री दिली. त्यानंतर सामनेवाले क्र.१ यांनी शेततळ्यात येऊन सदर कागदाची फिटींग करून दिली. परंतु सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारास मुळ बिल दिले नाही व परत देतो असे म्हणला. तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर शेततळ्यात पाणी सोडण्यास सुरूवात केली. तक्रारदाराने विहीर, बोअर तसेच टॅंकरने पाणी आणुन शेततळे भरून घेतले व पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली. सदर शेततळे केल्याने तक्रारदाराने त्यातील पाण्यावर विसंबुन राहुन २.५ एकर क्षेत्रात डाळींबाची झाडे व २.५ एकर क्षेत्रात ऊसाचे पिकाचे लागवण केली. त्यानंतर सदर शेततळ्यातील पाणी पातळी वेळोवेळी कमी होत होती. सन २०१५ चे उन्हाळ्यात तक्रारदाराचे असे लक्षात शेततळ्याच्या कागदास लहान लहान छिद्रे असुन त्याद्वारे कागद लिकेज होत आहे व त्यामुळे आपोआप शेततळ्यातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडे लगेचच विचारणा केली. त्यानंतर सामनेवाले क्र.१ यांनी शेततळ्यावर येऊन कागदाची पाहणी केली व कागद डिफेक्टिव असल्याचे मान्य केले वकंपनीला कळवुन कागद बदलुन देतो असे सांगितले. तक्रारदाराने याबाबत सामनेवाले क्र.२ व ३ कंपनीचे ऑफीसला भेटुन सांगितले परंतु सामनेवाले यांनी कागद बदलुन दिला नाही. सामनेवाले यांनी दिलेले टॅक्स इनव्हॉईसनुसार शेततळ्याच्या ४००० चौ.मी. कागदाची एकुण किंमत रक्कम रूपये ३,०८,०००/- होती, परंतु सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराकडुन सामनेवाले क्र.३ कंपनीच्या बॅंकेतील खात्यावर आर.टी.जी.एस. द्वारे रक्कम रूपये ४,००,०००/- भरून घेतलेली आहे, अशाप्रकारे सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराकडून रूपये ९६,०००/- एवढी रक्कम तक्रारदाराची फसवणुक करून जादा रक्कम घेतलेली आहे. याबाबत सामनेवाले यांना रजिस्टर नोटीस पाठवूनही सामनेवाले यांनी मागणी पुर्ण केली नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी करून दुषित सेवा दिलेली आहे, म्हणुन तक्रारदार यांना सदर तक्रार दाखल करणेस कारण घडले आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी ४००० चौ.म. मायक्रॉन साईजचा शेततळ्यातील नवीन कागद तक्रारदाराचे शेततळ्यात कुशल कामगाराकडुन व्यवस्थित फिटींग करून द्यावा अथवा सदर कागदाची संपुर्ण रक्कम ही सदर रक्कम घेतलले तारखेपासुन संपुर्ण रक्कम देईपावेतो द.सा.द.शे. १२ % व्याजासह तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्तिकरित्या परत करावी. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराकडुन शेततळ्याच्या कागदाच्या मोबदल्यापेक्षा जादा घेतलेली रक्कम रूपये ९६,०००/- ही सदर रक्कम घेतले तारखेपासुन संपुर्ण रक्कम देईपावेतो द.सा.द.शे. १२% व्याजासह तक्रारदारास परत करावी, तक्रारदाराचे ऊसाचे पिक व डाळींबाचे झाडांचे नुकसान झाल्यामुळे तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणुन रक्कम रूपये १२,००,०००/- द्यावे, तसेच तक्रारदारास शारीरिक, मानसीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व सदर अर्जाचा खर्च सामनेवाले क्र.१ ते ३ यांच्याकडुन मिळावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्यत आली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र.३ प्रकरणात हजर झाले व सामनेवाले क्र.३ यांनी त्यांचे म्हणणे निशाणी १६ वर असे दिले की, पृथ्वीराज अशोकराव चव्हाण हे सामनेवाले क्र.३ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.३ कंपनीकडुन प्लॅस्टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शेत तळ्यामध्ये बसवुन देण्याचा व्यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेत तळ्यात जर बारीक दगड असल्यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्यावतीने तसेच डिलर याच्यावतीने शेतकरी यांना तश्याच प्रकारची सुचना देण्यात येतात. इतक्यात नव्हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्याने व शेतामध्ये बारीक दगड असल्याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्यात उत्पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्लॅस्टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्ये झाले असले तरी त्यात कोणताही उत्पादीत दोष नाही. सामनेवाले क्र.३ यांनी या कंपनीचे उत्पादीत केलेला कागद हा आय.एस.ओ. प्रमाणीत असुन उच्च दर्जाचा आहे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार-पाच वर्ष सतत दुष्काळी परिस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीमुळे तक्रारदार यांनी कागद टाकलेल्या शेत तलावात पाणी न भरल्याने उन्हाळ्यामुळे तसेच शेततलाव कोरडा असल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचा वापर होऊन त्यामुळे तक्रारदार याचे शेत तलावातील कागदाचे नुकसान होऊ शकते. सदरची बाब ही नैसर्गिक असल्याने त्यास सामनेवाला यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही. सदरचा कागद बसवतांना कागद बसविण्याचा खर्च हा संपुर्णपणे डिलरला दिलेला असतो. त्यामुळे तो सामनेवाला यांच्याकडुन वसुल करण्याचा कोणताही अधिकार तक्रारदार यांना नाही. शेतात अनेक दिवस पाणीसाठा नसल्याने नैसर्गिक कारणाने सदर कागद खराब झाला असल्याचे सामनेवाले यांच्याविरूध्द खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीत शेतकरी यांनी सदर शेत तलावासाठी लागणारे कागदाची शासनाकडुन मिळणारी संपुर्ण सवलत मिळल्यानंतर सदरची खोटी बनावट तक्रार सामनेवाले यांच्याविरूध्द दाखल करण्यात आली आहे. सामनेवाले क्र.३ यांनी महाराष्ट्राबाहेर राज्यात शेततलावासाठी सदर कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.३ यांनी केली आहे.
४. सामनेवाले क्र.१ व २ यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत, म्हणुन त्यांचेविरूध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्यात आला.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्तऐवज सामनेवाले क्र.३ यांचे शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराप्रती अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
६. तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्याच्या शेततळ्यात प्लॅस्टीक खरेदी व कागद बसविण्याकरीता सामनेवाले क्र.१ ते ३ ला रक्कम दिली, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.७ दस्त क्र.१ व २ वरून सिध्द होत आहे. म्हणुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र.२ -
७. तक्रारदाराने दाखल नि.७ दस्त क्र.१ देयकाची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारदार यांच्याकडुन प्लॅस्टीकच्या कागदाची देयकाची रक्कम रूपये ३,०८,०००/- होती. परंतु तक्रारदाराने निशाणी ७ दस्त क्र.२ वर दाखल केलेल्या बॅंकेचे पास बुक (खाते उतारा) याची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, दिनांक ०५-०९-२०१४ रोजी सामनेवाले क्र.३ यांनी रक्कम रूपये ४,२५,०००/- असे घेतलेले आहे. याचा अर्थ सामनेवालेने तक्रारदाराकडुन रक्कम रूपये ९२,०२५/- इतकी रक्कम जास्त घेण्यात आलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण सामनेवाले क्र.३ ने त्याच्या खुलाश्यामध्ये दिलेले नाही. तसेच सामनेवाले क्र.१ व २ हे मंचात हजर झाले नाही व त्यांची बाजु मांडलेली नाही. म्हणुन तक्रारीत सामनेवाले क्र.१ व २ यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदाराचे शपथपत्रावरुन सिध्द होते की, सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदाराकडुन प्लॅस्टीक कागदाची रूपये ९२,०२५/- इतकी जास्त रक्कम स्विकारून तक्रारदाराप्रती अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३
८ मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. सामनेवाले क्र.३ ने तक्रारदाराकडुन प्लॅस्टीक कागदाची रूपये ९२,०२५/- इतकी जास्त रक्कम घेतली असल्याने त्यांनी ती तक्रारदाराला परत करावी. ३. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/-, तसेच तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी व्यक्तिगत व संयुक्तरितीने द्यावे. ४. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाच्या आत करावी. ५. तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी. ६. आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. |