(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 08.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्या नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदारांकडील अभिन्यासासाठी भुखंड खरेदी करण्याचा निश्चय केला व त्या संबंधाने रक्कम रु.17,79,575/- विविध तारखांना गैरअर्जदाराकडे जमा केल्या. परंतु त्यानंतर गैरअर्जदारांनी अतिरिक्त विकास राशीची मागणी तक्रारकर्त्याकडे केली असता ती त्याला पटली नाही व त्याने गैरअर्जदारास जास्तीची राशी देण्यांस इंन्कार केला. गैरअर्जदाराने सदर अतिरिक्त रकमेची मागणीवर कायम असल्यामुळे तक्रारकर्त्याने आपला व्यवहार रद्द करुन रक्कम परत घेणे योग्य समजले. त्यानुसार गैरअर्जदाराने दि.28.02.2009 रोजी तक्रारीत नमुद भुखंडांचा करार निरस्त केला व तक्रारकर्त्यास रु.3,50,000/- परत करण्याचे कबुल केले. गैरअर्जदाराने पत्रासोबत दि. अकोला अर्बन को.ऑपरेटीव्ह बँकेत धनादेश पाठविले पहिला धनादेश क्र.726180 रु.2,00,000/- चा होता व दुसरा धनादेश क्र.726184 रु.1,50,000/- चा होता. सदर धनादेश वटविण्याकरता टाकले असता ते अप्राप्त निधीच्या कारणास्तव परत आले. त्यानंतर तक्रारकर्त्याने वारंवार विनंती केली तरी गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास रक्कम परत केली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन रु.3,50,000/- व त्यावर रु.65,000/- मागील दोन वर्षांपासुनचे व्याज, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.15,000/- ची मागणी केलेली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 4. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने करारानुसार रक्कम भरली नसल्यामुळे भुखंड रद्द करण्यांत आल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर धनादेश सहा महिन्यांचे अवधीनंतर बँकेत टाकल्यामुळे ते वटले गेले नसुन, त्यांची सेवेत कुठलीही त्रुटी नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.31.01.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचा युक्तिवाद त्यांचे वकीलांनी केला तसेच गैरअर्जदारांचे वकीलांनी वकीलपत्र काढून घेतल्याचे मंचास कळविले. उभय पक्षांचे कथन व मंचासमक्ष दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. उभय पक्षांचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारासोबत भुखंड खरेदी करण्याचा व्यवहार केला होता व गैरअर्जदारांचा भुखंड विकण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो, असे मंचाचे मत आहे. 7. उभय पक्षांचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांच्यात असमंजस्य निर्माण झाल्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडून स्विकारलेले रु.3,50,000/- परत करण्याकरता धनादेश दिले. सदर धनादेश वटविण्याकरता तक्रारकर्त्याने बँकेत टाकल्याचे त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. सदर धनादेश खात्यात पैसे नसल्यामुळे Insufficient Fund या शे-यासह परत आले, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 व 4 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात केलेले कथन अमान्य करण्यात येते, कारण तक्रारकर्त्याने विहीत कालावधीतच धनादेश वटविण्याकरता टाकले होते. गैरअर्जदाराने धनादेश देऊनही ते वटविल्या न जाणे ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा रु.3,50,000/- मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. तसेच सदर रकमेवर भुखंडाचा करार निरस्त केल्याचा दि.28.02.2009 रोजी पासुन द.सा.द.शे.9% दराने रक्कम मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र ठरतो. 8. गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेतील त्रृटीमुळे तक्रारकर्त्यास साहजिकच मानसिक त्रास झालेला आहे, त्याकरता तक्रारकर्ता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 9. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्याला भुखंडा करता स्विकारलेली रक्कम रु.3,50,000/- परत करावी. सदर रकमेवर भुखंडाचा करार निरस्त केल्याचा दि.28.02.2009 रोजी पासुन द.सा.द.शे. 9% व्याज रक्कम अदा होई पर्यंत देय राहील. 4. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 5. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |