निकाल
दिनांक- 27.12.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार भास्कर श्रीराम शिंदे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदोष बियाणाची विक्री करुन सामनेवाला यांनी सेवेत कसूर केल्याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हा मौजे भारज ता.अंबाजोगाई जिल्हा बिड येथील रहिवाशी असून शेतकरी आहे. शेतात व्यवसाय करुन स्वतःचा व आपल्या कुटूंबाची उपजिवीका भागवतो. तक्रारदार त्याचे वडील व पत्नी यांच्या नावे मौजे भारज ता.अंबाजोगाई येथे गट नं.193,235, 197, 239, 229 व 189 या सर्वर गटामध्ये एकूण 6 हेक्टर 40 आर जमीन आहे. सदर जमिनीत तक्रारदार याने सोयाबीनचे पिकाची लागवड केलेली आहे. तक्रारदार याने शेतामध्ये सोयाबीनची लागवड करण्यासाठी सामनेवाला क्र.1 कडून दि.06.07.2011 रोजी सामनेवाला क्र.2 यांच्या कंपनीचे ग्रीन गोल्ड जे.एस.306 वानाचे प्रत्येकी रु.1300/- प्रमाणे 15 बॅग खरेदी केल्या सदर बॅगाची एकूण रक्कम रु.19,500/- ला खरेदी केले. बियाणे हे उच्च प्रतीचे असल्याबददल सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास हमी दिली. तक्रारदार याने बियाणे खरेदी केल्यानंतर सदर सोयाबीनच्या पिकाची पेरणी दि.8.7.11 रोजी आपल्या शेतात केली. तक्रारदारास पेरणी करता रु.25,000/- खर्च आला.
तक्रारदाराने सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर साधारणतः आठ दिवसामध्ये सर्व बी उगवणे अपेक्षित होते परंतू आठ दिवसामध्ये कसल्याही प्रकारचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे तक्रारदाराने ही बाब सामनेवाला क्र.1 यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कळविले परंतू सामनेवाला 1 यांनी तक्रारदारास उडवाउडवीचे उत्तर दिले. सबब तक्रारदाराने दि.16.7.11 रोजी पंचायत समिती व कृषी अधिकारी यांच्याकडे बियाणे सदोष असल्याबाबत तक्रार दिली. सदर तक्रारीबददल पंचायत समिती व कृषी अधिकारी यांनी दि.19.7.11 रोजी पाहणी केली व तक्रारदाराचा जबाब नोंदवून घेतला. सोयाबीन पेरलेल्या शेताचा पंचनामा करण्यात आला त्याचवेळी सदर कृषी अधिका-यांनी त्या शिवारातील जवळपास 8 ते 10 शेतक-याचे सोयाबीन पिकाची पाहणी केली तदनंतर कृषी अधिकारी बीड यांनी आपला अहवाल दिला. अहवालामध्ये असे सांगितले की, तक्रारदार याने आपल्या शेतात ग्रीन गोल्ड जे.एस.306 या सोयाबीन वानाची पेरणी केली आहे. सद्यःस्थितीमध्ये सोयाबीन बियाणाची उगवण निरंक दिसून आली. तसेच इतर शेतक-याचे शेतामध्ये सुध्दा सोयाबीन वाणाची उगवण निरंक असल्याचे अहवालामध्ये नमुद केले. या संदर्भात तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना कळवले होते व तसे लेखी सुचना दिली होती. सामनेवाला क्र.1 व 2 यांचे प्रतिनिधी तक्रारदाराच्या शेतामध्ये पंचनाम्याचीवेळी हजर होते. तक्रारदार याचे सोयाबीन पिक न उगवल्यामुळे त्याला एकूण रु.4,80,000/-चे नुकसान झाले आहे याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांना कळविण्यात आले होते परंतू सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई दिली नाही.
तक्रारदार याने सोयाबीन पेरणीच्यावेळी सर्व काळजी घेऊन पेरणी केली होती तरी सोयाबीनची उगवण झाली नाही त्याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदोष बियाणाची निर्मिती करुन ती विक्री करुन तक्रारदाराची फसवणूक केली आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदोष बियाणे विक्री केल्यामुळे तक्रारदाराचे खालीलप्रमणे नुकसान झालेले आहे.
1) बियाणे खरेदी खर्च रु. 19,500/-
2) 06 हे.40 आर जमिनीवर सोयाबीन न
उगवल्यामुळे झालेले एकुण नुकसान रु. 4,80,000/-
3) पेरणीसाठी लागलेला खर्च रु. 25,000/-
4) मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु. 20,000/-
5) तक्रारीचा खर्च रु. 5,000/-
----------------
एकूण रु. 5,49,500/-
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये कसूर केल्यामुळे तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी रु.5,49,000/- ची मागणी केली आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाला क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. त्यांच्या कथनेनुसार तक्रारीमधील संपूर्ण मजकूर हा हेतुपूर्वक व बनावट तयार केलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारीतील तक्रेार ही संपूर्णतः नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी सोयाबीन पेरतेवेळी जी खबरदारी घ्यावयास पाहिजे होती ती घेतली नाही व शेतामध्ये ओल किती आहे व कोणत्या साधनाने पेरणी करावी या बाबतचा कसलाच विचार न करता सोयाबीन पिक पेरणी केलेली आहे. या पिकास पुरक असलेले पेरणी व पाळी बियावरील बोजा याचा तक्रारदारास ताळमेळ न जमल्याने सोयाबीन पिक पाहिजे त्याप्रमाणे उगवू शकले नाही. कृषी अधिकारी यांनी पंचनामा करतेवेळेस सर्व गोष्टीचा विचारविनिमय करुन पंचनामा करणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी जे.एस.306 बियाणाचे वाण पेरले हे म्हणणे बरोबर आहे. तक्रारदार याने जी नुकसान भरपाई मागितली, ती पूर्णपणे चुकीची आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सोयाबीनचे जे बियाणे आहे ते पूर्ण चांगले बियाणे आहे असा अहवाल सरकारने दिलेला आहे. याउलट सदरच्या बियाणात कसलाही दोष नाही. तक्रारदाराने पेरणीच्या वेळेस काळजी घ्यावयास पाहिजे होती ती न घेतल्याने झालेल्या नुकसानीस स्वतः तक्रारदार हा जबाबदार आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास बियाणे पुरवण्यास कोणाही कसूर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. त्यांच्या कथनेनुसार तक्रारीतील मजकुर हा चुकीचा आहे. दुकानदार अथवा कंपनी बिबियाणाची हमी देत नाही. बियाणे उगवण्यास त्यावेळची परिस्थिती ही पावसावर अवलंबून असते. तक्रारदार याने सोयाबीनचे पिक पेरलेले ही बाब सामनेवाला क्र.2 यांना मान्य आहे. तक्रारदार यांनी कृषी अधिकारी यांच्याशी सल्ला मसलत करुन चुकीचा पंचनामा तयार केलेला आहे व तो सामनंेवाला क्र.1 व 2 यांच्या उपस्थितीत असणे आवश्यक आहे. सामनेवाला यांच्या कथनेनुसार सामनेवाला क्र.2 यांची ही कंपनीची सोयाबीनची ग्रोन गोल्ड बियाणे तयार करतेवेळेस प्लॉट वाईज जनरेशन रिपोर्ट चेक केल्याशिवाय खोटे बियाणे विक्री पाठवत नाही व जनरेशनचा रिपोर्ट हा बियाणे सोबत जोडलेला असतो. त्यामुळे बियाणे सदोष आहे हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदार यांनी कृषी अधिका-याकडून केलेला पंचनामा चेक असून तो सामनेवाला क्र.1 व 2 यांच्या गैरहजेरीत केलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना त्याबाबत कोणतीही नोटीस दिली नाही. तक्रारदार याने कृषी अधिका-याशी सल्ला मसलत करुन सामनेवाला क्र.1 व 2 च्या गैरहजेरीत पंचनामा केला आहे. सदर पंचनामा हा सामनेवाला क्र.1 व 2 यांच्यावर बंधनकारक नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत स्वतःचे शपथपत्र दाखल केले, तसेच नि.4 द्वारे कागदपत्र दाखल केले आहेत. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी मधुकर शंकरराव सिरसट यांचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार यांनी यूक्तीद केला नाही, सामनेवाले क्र.1 व 2 यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांने सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेले
सोयाबीनचे बियाणे सदोष आहे ही बाब सिध्द केली काय ? नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी ठेवली आहे
काय ? नाही.
3. तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे कथन की, त्याने सामनेवाले क्र.1 यांच्याकडून सामनेवाले क्र.2 यांच्या कंपनीचे सोयाबीनचे बियाणे ग्रीन गोल्ड जे एस 306 वाणाचे खरेदी केले. सदर बियाण्याची किंमत रक्कम प्रति बॅग रु.1300/- प्रमाणे 15 बॅग खरेदी केल्या. तक्रारदार यांने सदरील बियाणे दि.8..7.2011 रोजी स्वतःच्या शेतात पेरले. तक्रारदाराचे पुढील कथन की, शेतातील बियाण्याची उगवण झाली नाही. तक्रारदार हे स्वतः शेतकरी आहे. तक्रारदार यांने बियाणे उगवले नाही असे कथीत केले आहे. बियाण्याची उगवण झाली नाही म्हणून तक्रारदार यांहने दि.16.7.2011 रोजी कृषी अधिकारी व पंचायत समिती अंबाजोगाई येथे तक्रार अर्ज दिला. तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने दि.16.7.2011 रोजी 19.0.7.2011 रोजी भेट देऊन तक्रारदार यांच्या शेतातील पाहणी केली व आपला अहवाल सादर केला. त्यात तक्रारदार यांच्या शेतात बियाण्याची उगवण निरंक असल्याबददल सांगितले.
सामनेवाले क्र.1 व 2 यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला, युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार यांने सामनेवाले क्र.2 च्या कंपनीचे सामनेवाले क्र.1 कडून सोयाबीनेचे बियाणे खरेदी केले ही बाब मान्य आहे.सामनेवाले क्र.2 यांचे कथन की,तक्रारदार यांने सोयाबिनच्या बियाण्याची बॅग मंचासमोर हजर केली नाही व बियाणे हे सदोष आहेत. बियाण्यात दोष आहे या बाबत योग्य प्रयोगशाळेत बियाण्याची तपासणी करुन प्रयोगशाळेचा अहवाल सादर केला नाही. तसेच शेतातील पाहणी करुन पंचनामा सादर करताना तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांनी हजर राहण्यासाठी कळविले नाही किंवा सुचना दिली नाही.
पंचनामा करताना सुचना देणे आवश्यक असते. तसेच तक्रारदाराने कृषी अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करुन पंचनामा केला. सदर पंचनामा हा सामनेवाले क्र.1 व 2 यांना बंधनकारक नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- देण्याता यावे.
वर नमूद केलेले कथन व सामनेवाले यांच्या वकीलांचे युक्तीवाद व तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाले क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले संजय प्रकाश महाजन व भास्कर विठठल गिराम यांचे शपथपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारदार यांनी खरेदी केलेले सोयाबीनचे बियाणे हे सदोष आहे काय हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांने सामनेवाले क्र.1 कडून सोयाबीने बियाणे खरेदी केले. बियाणे विकत घेतल्याची पावती दाखल केली आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांना ही बाब मान्य आहे. मंचाच्या मते सर्वसाधारणतः सोयाबीनचे बियाणे उगवण्यासाठी त्यांला 8 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. बियाणे उगवण्यासाठी जमिनीतील पोषकपणा व ओलावा असणे आवश्यक आहे. बियाण्याची उगवण ही जमिनीतील पोषकपणा, ओलावा वातावरण व पावसावर अवलंबून असते.तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांनी तक्रारदाराच्या शेतात भेट देऊन पाहणी करुन पंचनामा सादर केला. त्यात तक्रारदार यांच्या शेतातील बियाण्याची उगवण निरंक असल्याबददल सांगितले. सदरील पंचनाम्यात बियाणे उगवण्यासाठी जमिन पोषक व ओलावा आहे किंवा नाही यांचा स्पष्ट उल्लेख नाही. सदर पंचनाम्यात इतर शेतक-याच्या शेतामधील पिकांच्या उगवणी बाबत नमुद केले आहे. त्यात इतर शेतक-याच्या शेतामध्ये 15/20 टक्के बियाण्याची उगवण झालेली दिसते. सदरील शेतक-याने वेगवेगळया सोयाबीन वाणाच्या बियाण्याची पेरणी केलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या शेतात काही प्रमाणात बियाणे उगवलेली दिसतात. सर्वसाधारणतः जमिनीत बियाणे उगवण्यासाठी जमिनीत आवश्यक ओलावा व पोषक वातावरण असणे गरजेचे आहे. जमिन कोरडी असल्यास बियाणे पेरले तर ते उगवू शकत नाही. तक्रारदार यांने जमिनीत किती ओलावा होता व बियाणे उगवण्यासाठी पोषक असे वातावरण होते ही बाब सिध्द केली नाही. तक्रारदार यांने बियाणे उगवण्याची वाट न पाहता बियाणे उगवण्याच्या कालावधीतच कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचे निदर्शनास येते.
तक्रारदार यांनें बियाणे उगवण्यासाठी पुरेसा पाऊस झाला होता काय किंवा पाऊस न झाल्यास सदरील पिकाकरिता विहीरीतून पाणी शेतास दिले यांचा सुध्दा पुरावा मंचासमोर हजर केला नाही.
तक्रारदार यांने विकत घेतलेल्या बियाण्याचा नमुना मंचासमोर हजर केला नाही.. तसेच ज्या बँगमध्ये बियाणे भरली होती ती बँग सुध्दा हजर केली नाही. सदर बियाणे हे सदोष आहे ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांने बियाणे तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले नाही. केवळ बियाणे उगवले नाही म्हणून बियाणे सदोष आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांचे तोंडी कथन स्विकार्य नाही.
तक्रारदार यांनी बियाणे पेरल्यानंतर 15 दिवस वाट पाहणे गरजेचे होते परंतु तक्रारदार यांने बियाणे उगवण्याच्या कालावधीत कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला. तक्रारदार यांने सामनेवाले क्र.1 व 2 यांना बियाण्याची उगवण झाली नाही त्याबाबत त्यांना पाहणी करण्यास कळविले नाही. तसेच जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारदार यांच्या शेतात पंचनामा केला. त्यावेळी बियाणे उत्पादक कंपनीचे मालक असणे आवश्यक असते. तसे तक्रारदार यांने सामनेवाले क्र.1 व 2 यांना कळविले नाही. शेतातील पंचनामा हा सामनेवाले क्र.1 व 2 यांच्यासमोर केला नाही. त्याबाबत सामनेवाले क्र.2 यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी निवेदकाचे शपथपत्र सादर केले. त्यांचे अवलोकन केले असता सदरील बियाणे हे चांगली आहे असे निदर्शनास येते. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांहने सदरील बियाणे हे सदोष आहे ही बाब सिध्द केली नापही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड