मंचाचे निर्णयांन्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य. - आ दे श – (पारित दिनांक : 27/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदाराची सेवा घेऊन त्याचे प्रकरण क्र. 76/2010 मध्ये नोटीस श्री.प्रसाद मते, तहसिलदार, नागपूर यांना पाठविला होता. परंतू गैरअर्जदाराने सदर नोटीस संबंधित व्यक्तीला न दिल्याने संबंधित कारवाईला विलंब झाला. पोच पावती मिळण्यासही विलंब झाल्याने मंचाने परत नोटीस बजावण्याबाबत आदेश पारित केला. तक्रारकर्त्याच्या मते संबंधित व्यक्तीला नोटीस वेळेच्या आत न देऊन गैरअर्जदाराने निष्काळजीपणा केला व त्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, त्याकरीता सदर तक्रार दाखल करुन सदर त्रासाच्या भरपाईबाबत रक्कम व तक्रारीचा खर्चाची मागणी तक्रारकर्त्याने केलेली आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता गैरअर्जदारांनी सदर तक्रारी संयुक्तपणे लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन नमूद केले आहे की, ज्या नोटीसच्या पोचपावती विलंबाने मिळाली व ज्या वादाकरीता तक्रारकर्ता मंचासमोर तक्रार दाखल करीत आहे, ती नोटीस तक्रारकर्त्याची नसून ती मंचाची असल्याने तक्रारकर्ता हा ग्राहक ठरत नाही, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार व प्रार्थना नाकारलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयाच्या कार्यप्रणालीनुसार कोणत्याही विभागात डाक स्विकृती व प्रेषण याकरीता आवक-जावक कक्ष निर्धारित असतो. त्याप्रमाणे डाक तिथेच वितरीत केल्या जाते. त्याप्रमाणेच डाक वितरीत केल्याने गैरअर्जदाराच्या सेवेत कोणतीच त्रुटी नसल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता आल्यानंतर उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणात दाखल उभय पक्षांचे कथन, दस्तऐवज व निवाडयांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. गैरअर्जदारांनी उत्तरात आक्षेप घेतला की, सदर नोटीस मंचाने पाठविलेली आहे त्यामुळे तक्रारकर्ता तक्रार दाखल करु शकत नाही. मंचाचे मते सदर नोटीस तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारी संदर्भातील आहे, त्यामुळे तक्रारकर्ता लाभधारक या सज्ञेत येतो. या कारणावर गैरअर्जदारांचा आक्षेप अमान्य करण्यांत येतो व तक्रारकर्ता लाभधारक समजून गैरअर्जदारांचे विरुध्द तक्रार दाखल करु शकतो. 6. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या रजि. पोस्टाच्या पावतीप्रमाणे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे. तसेच मंचाने सदर प्रकरणी पोस्टाच्या पोच पावतीचे व मंचाचे आदेशाचे अवलोकन केले असता सदर नोटीस हा ज्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावर आहे त्यांना न देता तो आवक-जावक लिपिक यांचेकडे देण्यात आलेला आहे. मंचाची वैयक्तीक नावावर नोटीस असतांना व रजि. पोस्टाने तो पाठविण्यात आला असतांना तो आवक-जावक कक्षाकडे कसा काय देण्यात आला. यामध्ये गैरअर्जदारांचा निष्काळजीपणा दिसून येतो. विशिष्ट व्यक्तीच्या नावाचे टपाल त्याला न देता आवक-जावक कडे देणे ही सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने याबाबत त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला व या त्रासाबाबत रु.95,000/- ची मागणी केलेली आहे. मात्र सदर त्रासाबाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. मंचाचे मते जरीही तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला असला तरीही सदर मागणी ही अवास्तव वाटते. तक्रारकर्ता हा शारिरीक व मानसिक त्रासाबाबत न्यायोचितदृष्टया रु.500/- मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदारांच्या कृतीमुळे तक्रारकर्त्याला मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रारकर्ता तक्रारीच्या खर्चाबाबत रु.500/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची क्षतिपूर्ती म्हणून रु.500/- द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.500/- द्यावे. 3) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |