(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :18/11/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील सर्व तक्रारकर्त्यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार ही एक कंपनी असुन इतर सर्व गैरअर्जदार हे संचालक आहेत. तक्रारकर्ते हे मध्यमवर्गीय सामान्य लोक आहेत, त्यांना गैरअर्जदारांनी भुलथापा देऊन गुंतवणूक केलेली रक्कम तीन पट करुन मिळेल, असे सांगून या योजनेत सहभागी करुन घेतले व त्यांना रक्कम गुंतवण्यांस सांगितले. गैरअर्जदारांनी यासंबंधी माहितीपत्रक वाटले ते अत्यंत आकर्षक होते. गैरअर्जदारांनी करारनामा करुन दिला आणि परताव्याकरता धनादेश सुध्दा दिले, मात्र प्रत्यक्षात दिलेले आश्वासना प्रमाणे व योजने प्रमाणे काहीही घडले नाही. योजना अशी होती की, तक्रारकर्त्यांनी गुंतवणूक करावी व त्याव्दारे विदेशात विकल्या जाणा-या डुक्करांची खरेदी करुन ते प्रत्यक्षात न देता त्यांचे गैरअर्जदार हे त्यांच्या आधुनिक फार्मवर पालन पोषण करणार होते. त्यांना वयस्क करुन त्यांची विदेशात विक्री करुन जवळपास तीनपट गुंतवणूकीपेक्षा जास्त देणार होते.
3. तक्रारकर्त्यांचे म्हणणे असे आहे की, सदर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांची फसवणूक करुन त्यांनी नागपूरातील आपला व्यवसाय बंद करुन टाकला आणि तक्रारकर्त्यांसारख्या सामान्य नागरीकांची लुबाडणूक केली व तक्रारकर्त्यांची रक्कम परत केली नाही, तसेच गैरअर्जदारांनी दिलेले धनादेश वटल्या गेले नाही, अश्या प्रकारे तक्रारकर्त्यांची फसवणूक केल्यामुळे त्यांनी ही तक्रार मंचात दाखल केली. यातील तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडे दि.20.09.2008 ते दि.22.09.2008 पर्यंत डिमांड ड्राफ्टव्दारे एकूण रक्कम रु.4,50,000/- जमा केलेली आहे. तक्रारकर्त्यांनी सदर रक्क्म व्याजासह मिळावी व नुकसानी दाखल रु.60,000/- मिळावे, मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- तसेच तक्रारीच्या खर्च रु.10,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
4. तक्रारकर्त्याने प्रस्तुत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात करारनामा, मिनीट्स ऑफ मिटींग व पावत्या या दस्तावेजाच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
5. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.3 व 4 यांना पाठविण्यांत आलेल्या नोटीसेस न स्विकारल्यामुळे परत आल्या, त्यामुळे दि.03.12.2010 रोजी त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. तसेच गैरअर्जदार क्र.1,2 व 6 यांना पाठविण्यांत आलेल्या नोटीसेस सुध्दा परत आल्यामुळे दि.24.02.2011 रोजी त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. गैरअर्जदार क्र.5 व 7 यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. यातील गैरअर्जदार क्र.2 व 6 दि.01.08.2011 रोजी मंचात उपस्थित होऊन त्यांचे विरुध्दचा एकतर्फी आदेश रद्द करण्याचा अर्ज सादर केला असुन त्यांना जबाब दाखल करण्याची परवानगी देण्यात आली असता त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे.
6. गैरअर्जदार क्र.5 व 7 यांनी आपल्या लेखी जबाबात गैरअर्जदार क्र.1 व 2 हे पिग प्रॉन्स एन पेट एग्रो (इंडिया) प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर होते ही बाब मान्य केलेली आहे. तसेच सदर कंपनीचा संपूर्ण व्यवहार गैरअर्जदार क्र.1,2 व 6 पाहतात व ते नॉमीनल डायरेक्टर असुन त्यांना कोणत्याच व्यवहाराची माहिती नाही व कंपनीच्या कामकाजात कुठलाही सहभाग नाही. गैरअर्जदार क्र.5 व 7 यांनी नमुद केले आहे की, त्यांनी दि.25.11.2008 व 23.11.2008 रोजी कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे व तो गैरअर्जदार क्र.1 यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक या नात्याने मान्य केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.5 व 7 यांचा कंपनीच्या कामकाजात कुठलाही संबंध नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
7. गैरअर्जदार क्र.2 व 6 यांनी आपल्या लेखी जबाबात ते नाममात्र डायरेक्टर असुन गैरअर्जदार क्र.1 हेच फक्त सदर कंपनीचा संपूर्ण व्यवहार पाहत असल्याचे नमुद करुन तेच कंपनीच्या प्रत्येक व्यवहारासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी तक्रारकर्त्यांसोबत कोणताही करारनामा केला नाही अथवा कोणत्याही प्रकारचे चार्जेस किंवा फी वसुल केलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ते व गैरअर्जदार क्र.2 व 6 यांच्यातील नाते ग्राहक या संज्ञेत बसत नसून त्यांचे विरुध्दची तक्रार मंचासमक्ष चालू शकत नाही व ती खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
8. सदर तक्रार मंचासमक्ष दि.03.11.2011 रोजी युक्तिवादाकरीता आली असता तक्रारकर्त्यांचा युक्तिवाद पूर्वीच ऐकला, मंचाने ऐकला, गैरअर्जदार एकतर्फी. तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
9. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.2,6,5 व 7 यांनी आपला जबाब दाखल करुन त्यात ते नाममात्र डायरेक्टर असुन गैरअर्जदार क्र.1 हेच फक्त सदर कंपनीचा संपूर्ण व्यवहार पाहत असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्त्यांना गैरअर्जदारांनी दिलेल्या रकमेच्या पावत्या, करारनामा, वर्तमान पत्रातील जाहीरात पत्रक दाखल केलेले आहेत. तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्याला गैरअर्जदारांनी कोणत्याही पुराव्याव्दारे खोडून काढले नाही. गैरअर्जदार क्र.1,3 व 4 यांनी मंचात हजर होऊन कोणतेही बचावात्मक उत्तर किंवा दस्तावेज दाखल केले नाही. त्यामुळे सदर प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारित केलेला आहे.
10. तक्रारकर्त्यांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांव्दारे हे सिध्द केले आहे की, त्यांचेकडून प्रलोभन दाखवुन गुंतवणूक करुन घेण्यांत आली व कोणतीही सेवा दिली नाही वा त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत केलेली नाही, ही गैरअर्जदारांचे सेवेतील अनुचित व्यापार प्रथा असुन गैरअर्जदारांनी देऊ केलेली सेवेतील त्रृटी आहे.
प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्यांच्या तक्रारी अंशतः मंजूर करण्यांत येतात.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी एकलरित्या किंवा संयुक्तरित्या रु.4,50,000/- रक्कम जमा केल्याचे तारखांपासुन द.सा.द.शे.12% व्याजासह परत करावे.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना प्रत्येकी मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रु.2,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन एकलरित्या किंवा संयुक्तरित्या आदेशाची प्रत
मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा गुंतवलेल्या रकमेवर द.सा.द.शे. 12% ऐवजी 15% व्याज देय राहील.