Maharashtra

Bhandara

CC/19/52

DWARKABAI P.GAROTE - Complainant(s)

Versus

ORIENTAL INSURANCE COMPANY LTD - Opp.Party(s)

MR. DEVENDRA HATKAR

08 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/52
( Date of Filing : 18 Mar 2019 )
 
1. DWARKABAI P.GAROTE
JAMNAPUR TAH. SAKOLI DIST. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ORIENTAL INSURANCE COMPANY LTD
DIVISIONAL OFFICE NO.2,8,HINDUSTAN COLONY NEAR AJANI CHWOK WARDHA ROAD NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. TAHSILDAR ,TAHSIL OFFICE
TAH SAKOLI DIST.BHANDARA 441802
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Feb 2021
Final Order / Judgement

       (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागिरदार, मा.सदस्‍या)

                                                                        (पारीत दिनांक–  08 फेब्रुवारी, 2021)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूर आणि इतर एक यांचे विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा मृतक पती नामे श्री फकिरा फागण घरोटे हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- जमनापूर, तालुका- साकोली, जिल्‍हा भंडारा येथे भुमापन क्रं 356 या वर्णनाची होती.

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा पती नामे श्री फकिरा फागण घरोटे याचा दिनांक-05.06.2008 रोजी पावसाळयामध्‍ये आंगावर विज पडून मृत्‍यु झाला होता. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) तहसिलदार असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने “लाभार्थी” आहे. ती अशिक्षीत व ग्रामीण भागातील राहणारी असून तिला विमा योजनेची माहिती नव्‍हती. तिचे पतीचे मृत्‍यू नंतर माहिती मिळाल्‍या नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-2 तहसिलदार, तहसिल कार्यालय-साकोली, जिल्‍हा-भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला होता.

    तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, तिने विमा दाव्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार यांचे कार्यालयात वेळोवेळी विचारणा करुनही काहीही कळविले नाही. वस्‍तुतः विमाधारक शेतक-याच्‍या मृत्‍यू नंतर त्‍याच्‍या कायदेशीर वारसदारांना मदत मिळावी या उद्दात हेतूने शासनाने सदर विमा योजना सुरु केली परंतु विरुध्‍दपक्ष हे त्‍या उद्देश्‍यालाच तडा देत आहेत. तिला विमा दाव्‍या संबधात काहीही माहिती न मिळाल्‍याने तिने विरुध्‍दपक्षांना दिनांक-26.12.2018 रोजी वकीलांचे मार्फतीने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीसला विरुध्‍दपक्षांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी तिला दोषपूर्ण सेवा  दिलेली असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचे दिनांका पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 20,000/- आणि तक्रार खर्च रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूर तर्फे  मंडल प्रबंधक यांनी लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 43 ते 47 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरामध्‍ये प्राथमिक आक्षेप घेतला की, महाराष्‍ट्र शासन, ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि विमा एजंट कंपनी कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे मध्‍ये दिनांक-29.08.2007 रोजी त्रीपक्षीय विमा करार अस्वित्‍वात आला होता. शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-15.08.2007 ते 14.08.2008 असा होता. सदर विमा करारा प्रमाणे मुंबई येथे अधिकारक्षेत्र येते. प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला प्रतिपक्ष केलेले नाही त्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

      परिच्‍छेद निहाय उत्‍तरे देताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा पती हा शेतकरी होता ही बाब सिध्‍द होत नाही. तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजने संबधीचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिल कार्यालयात नेमका कोणत्‍या तारखेस सादर केला व त्‍यानंतर विमा एजंट कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दावा कोणत्‍या तारखेस सादर केला या बाबत काहीही नमुद केलेले नाही, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा दाखल केला होता या संबधीची विधाने नामंजूर करण्‍यात येतात. तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू झाला ही बाब दस्‍तऐवजाशी संबधित आहे. त्‍यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्तीने दिनांक-26.12.2018 च्‍या नोटीस मध्‍ये विमा दाव्‍या संबधात कोणतीही विस्‍तृत माहिती दिलेली नाही, त्‍यासाठी ती स्‍वतःच जबाबदार आहे. तक्रारकर्तीचे तक्रारी मधील अन्‍य परिच्‍छेद नाकारलेले असून तक्रारकर्ती ही मागणी प्रमाणे रक्‍कम व व्‍याज मिळण्‍यास पात्र नाही व तशी मागणी करण्‍याचा तिला काहीही अधिकार नाही. सबब प्रस्‍तुत तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, तहसिल कार्यालय, साकोली यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाकडे पोस्‍टाने लेखी निवेदन व कार्यालय रजिस्‍टर नोंदीचा दस्‍तऐवज अनुक्रमे पान क्रं-57 व पान क्रं-58 वर सादर केला. तहसिलदार साकोली यांचे दिनांक-14.06.2019 रोजीचे निवेदना नुसार मृतक नामे    श्री फकिरा फागन घरोटे, राहणार जमणापूर, तहसिल साकोली हा व्‍यवसायाने शेतकरी होता आणि दिनांक-05.06.2008 रोजी शेतामध्‍ये त्‍याचे आंगावर विज पडून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍याचे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रकरण तयार करुन त्‍यांचे कार्यालयीन पत्र क्रं-कली/संकीर्ण/कावी-316/2008, दिनांक-21.07.2008 अन्‍वये संबधित विमा कंपनीला पाठविल्‍या बाबतची कार्यालय रजिस्‍टर नोंदीचा दस्‍तऐवज ते या सोबत दाखल करीत आहेत. या व्‍यतिरिक्‍त या कार्यालयात संबधित प्रकरणाचे इतर दसतऐवज उपलब्‍ध नसल्‍याचे दिसून येते असे नमुद केलेले आहे.

05.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं-11 नुसार एकूण-08 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने शासन निर्णय, मृतकाचे मृत्‍यू प्रमाणपत्र, शेतीचे दस्‍तऐवज गाव नमुना-6-क, 7/12 उतारा प्रत, पोलीस दस्‍तऐवज, पी.एम.रिपोर्ट, तिने रजिस्‍टर्ड पोस्‍टाने विरुध्‍दपक्षांना पाठविलेली दिनांक-26.12.2008 रोजीची कायदेशीर नोटीस व रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍या अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. या शिवाय तक्रारकर्तीने पान क्रं-68 वरील दस्‍तऐवज यादी नुसार तहसिलदार साकोली यांनी तक्रारकर्तीचे वकीलांना दिनांक-09.05.2019 पत्रान्‍वये माहिती अधिकारा अंतर्गत दिलेली माहिती व कार्यालयीन नोंदीचा दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे वकीलांचे नावे दिनांक-17.01.2019 रोजीचे पाठविलेले नोटीसचे उत्‍तर अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तक्रारकर्तीने  पृष्‍ट क्रं-64 ते 66 वर स्‍वतःचा  शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-77 ते 79  अनुसार तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तक्रारकर्तीने पान क्रं-80 वर पुरसिस दाखल करुन तिची तक्रार शपथपत्र व लेखी युक्‍तीवादालाच तिचा मौखीक युक्‍तीवाद समजावा असे नमुद केले. तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 49 ते पान क्रं- 53 वर दाखल केले. तसेच पान क्रं-73 व पान क्रं-74 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. पान क्रं-75 वर पुरसिस दाखल करुन त्‍यांचे शपथे वरील लेखी उत्‍तरालाच त्‍यांचा शपथेवरील पुरावा समजण्‍यात यावा असे नमुद केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे वकीलांनी पुरसिस सादर करुन त्‍यांचे लेखी युक्‍तीवादालाच मौखीक युक्‍तीवाद समजावा असे नमुद केले.

07.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद आणि तिने दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष  क्रं-1) विमा कंपनी तर्फे दाखल लेखी उत्‍तर, लेखी युक्‍तीवाद इत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. त्‍यावरुन जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची ग्राहक होते काय?

-होय-

 

 

 

 

2

जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल तक्रार मुदतीत आहे काय

-होय-

3

वि.प क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

4

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

:: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

08.  तक्रारकर्तीने पान क्रं-23 वर  दिनांक-31.07.2017 रोजीचे सात बारा उता-याची प्रत दाखल केली, ज्‍यावरुन असे दिसून येते की, मौजा जमनापूर, तहसिल साकोली, जिल्‍हा भंडारा येथील तलाठी साझा क्रं 19 भूमापन क्रं-356 या शेती मध्‍ये गणेश फकीरा घरोटे आणि व्‍दारकाबाई गणेश घरोटे आणि ईतर  यांची नावे नमुद आहेत. दिनांक-29.05.2009 रोजी निर्गमित गाव नमुना 6-क वारसा प्रकरणाचे नोंदवही मध्‍ये मृतक भोगवटदाराचे नाव म्‍हणून तक्रारकर्तीचे पती श्री फकीरा फागन घरोटे याचे नाव नमुद असून कायदेशीर वारसदार म्‍हणून गणेश फकीरा घरोटे, व्‍दारकाबाई फकीरा घरोटे, गायकवाड अरुणाबाई हिरालाल,  उडकेमल कविता कृष्‍णा आणि वाघ सरिता अविनाश अशी नावे नमुद आहेत. कब्‍जाधारकाची नावे यामध्‍ये गणेश फकीरा घरोटे आणि व्‍दारकाबाई गणेश घरोटे नावे नमुद आहेत.  थोडक्‍यात वरील शेतीचे दस्‍तऐवजा वरुन ही बाब सिध्‍द होते की, मृतक श्री फकिरा फागण घरोटे याचे नावे अपघाताचे वेळी शेती होती आणि त्‍याचे मृत्‍यू नंतर पत्‍नी व कायदेशीर वारसदार या नात्‍याने ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची ग्राहक (लाभार्थी) आहे करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 बाबत

09.   या प्रकरणात तक्रारकर्तीचे पतीचे मृत्‍यू नंतर सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव तहसिलदार, तहसिल कार्यालय साकोली यांचे कार्यालयात दिनांक-21.07.2008 रोजी दाखल केला होता आणि प्रस्‍तुत ग्राहक तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दिनांक-18.03.2019 रोजी दाखल केलेली आहे, त्‍यामुळे सदर प्रकरण हे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार विहित मुदतीत दाखल झाले किंवा कसे हे पाहणे आवश्‍यक आहे. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार तक्रारीचे कारण घडल्‍याचे दिनांका पासून दोन वर्षाचे आत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करणे आवश्‍यक आहे परंतु आमचे समोरील हातातील प्रकरणात तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दाखल केल्‍या नंतरही तिला आज पर्यंत तिचे विमा दावा प्रस्‍तावा संबधी कोणतीही सुचना प्राप्‍त झालेली नाही तसेच तिचा विमा दावा प्रस्‍ताव मंजूर झाला किंवा नामंजूर झाला या संबधी सुध्‍दा तिला काहीही कळविण्‍यात आलेले नाही. तिला विमा दाव्‍या संबधी माहिती दिल्‍या बद्दल रजिस्‍टर पोस्‍टाची पोच असा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने या प्रकरणात दाखल केलेला नाही त्‍यामुळे जो पर्यंत तिला तिचे विमा दाव्‍या संदर्भात माहिती पुरविल्‍या जात नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडणारे (Cause of action is Continuing) असते असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल झालेल्‍या तक्रारीचे मुदतीचे संदर्भात  तक्रार मुदतीत दाखल झाली किंवा कसे या बाबत  मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग नवि दिल्‍ली यांनी दिलेल्‍या खालील न्‍यायनिवाडयावर प्रस्‍तुत जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-  

I)     Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-  REVISION PETTTION NO. 3118-3144 OF 2010  Lakshmi Bai & Ors.-Verus- ICICI Lombard General Insurance Company” Order   Dated 05 August, 2011

   या न्‍यायनिवाडयामधील परिच्‍छेद क्रं. 13 मधील अनुक्रंमांक 2) मध्‍ये असे नमुद केलेले आहे की-  “Cases where claim is made to nodal officer or nodal officer has forwarded the claim to Insurance Company or claim has been directly filed with Insurance Company within 2 years of the death and the claim has remained undecided. In such a case the cause of action will continue till the day the Respondent/insurance Company pays or rejects the claim”.

******

II)   Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-   “PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”- I (2006) CPJ-53 (NC)

         या प्रकरणा मध्‍ये विमा दावा खारीज केल्‍याचे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नव्‍हते तसेच त्‍या पत्राची प्रत तक्रारकर्तीला मिळाल्‍याचे पण सिध्‍द झाले नव्‍हते परंतु तरीही जिल्‍हा ग्राहक आयोगाने  ती तक्रार खारीज केली होती, जिल्‍हा ग्राहक आयोगाचा तो निर्णय मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने रद्दबातल ठरविला आणि तक्रार ही मुदतीत असल्‍याचे नमुद केले. हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर झाला वा नामंजूर झाला या  संबधीचे पत्र तिला मिळाल्‍याचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने अभिलेखावर दाखल केलेला नाही आणि म्‍हणून तक्रार दाखल करण्‍यास कारण हे सतत घडत असल्‍याने ही तक्रार मुदतबाहय होत नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

******

III)   Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others”

     उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्‍याचे पत्र तक्रारकर्तीला दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्‍याने सदर न्‍यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे. उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांचे आधारे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर  “होकारर्थी” नोंदवित आहोत.

******

मुद्दा क्रं 3 बाबत

10.   तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, तहसिल कार्यालय साकोली, तालुका साकोली जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा दाखल केला होता. या उलट विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार शेतकरी अपघात विमा योजना ही त्रीस्‍तरीय करारा नुसार म्‍हणजे विमा कंपनी, तहसिलदार आणि कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस यांचे मधील करारा नुसार अस्तित्‍वात होती. संबधित शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍या नंतर सर्वप्रथम विमा दावा आवश्‍यक दसतऐवजांसह तहसिलदार यांचे कडे सादर करावयाचा होता व त्‍यानंतर सदर विमा प्रस्‍ताव हा तहसिलदार यांचे कडून कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट कंपनीकडे पाठवावयाचा होता सदर कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी ही विमा दाव्‍याची छाननी करुन, त्रृटयांची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनी कडे विमा दावा निश्‍चीतीसाठी पाठवितात. तक्रारकर्तीचे प्रकरणात तिने विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह तहसिलदार यांचेकडे नेमका केंव्‍हा दाखल केला आणि त्‍यांनी तो विमा दावा कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड यांचेकडे आणि त्‍यानंतर विमा कंपनीकडे केंव्‍हा पाठविला या बाबत तक्रारी मध्‍ये व दिलेल्‍या कायदेशीर नोटीस मध्‍ये उल्‍लेख केलेला नाही. थोडक्‍यात विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांना तक्रारकर्तीचा विमा दावा प्राप्‍त झालेला नाही.

11.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, तहसिल कार्यालय, साकोली यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाकडे पोस्‍टाने लेखी निवेदन व कार्यालय रजिस्‍टर नोंदीचा दसतऐवज अनुक्रमे पान क्रं- 57  व पान क्रं-58 वर दाखल केलेला आहे. तसेच तक्रारकर्तीने सुध्‍दा माहिती अधिकारा अंतर्गत तिचे विमा दाव्‍या संदर्भात तहसिलदार साकोली यांचे कडून दिनांक-09.05.2019 रोजीचे पत्रान्‍वये प्राप्‍त माहिती व कार्यालयीन नोंदीचा दस्‍तऐवज दाखल केलेला आहे. तहसिलदार, साकोली  यांचे दिनांक-14.06.2019 रोजीचे लेखी निवेदना नुसार मृतक नामे श्री फकिरा फागन घरोटे, राहणार जमणापूर, तहसिल साकोली हा व्‍यवसायाने शेतकरी होता आणि दिनांक-05.06.2008 रोजी शेतामध्‍ये त्‍याचे आंगावर विज पडून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍याचे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रकरण तयार करुन त्‍यांचे कार्यालयीन पत्र क्रं-कली/संकीर्ण/कावी-316/2008, दिनांक-21.07.2008 अन्‍वये संबधित विमा कंपनीला पाठविल्‍या बाबतची कार्यालय रजिस्‍टर नोंदीचा दस्‍तऐवज ते या सोबत दाखल करीत असल्‍याचे नमुद केले. आम्‍ही तहसिलदार, साकोली यांचे कार्यालयातील विमा दावा प्राप्‍त नोंदीच्‍या रजिस्‍टरचे उता-याची पाहणी केली असता तक्रारकर्तीचा मृतक पती श्री फकीरा फागून घरोटे, राहणार-जमनापूर, तहसिल साकोली, जिल्‍हा भंडारा याचा दिनांक-05.06.2008 रोजी शेत विवारा मध्‍ये विज पडून मृत्‍यू झाल्‍याचे नमुद असून विमा दावा प्रस्‍ताव कार्यालयीन रजिस्‍टर क्रं-318/2008, दिनांक-21.07.2008 रोजी तहसिल कार्यालया कडून पाठविल्‍याचे आणि तो विमा प्रस्‍ताव विमा कंपनीकडे प्रलंबित असल्‍याची नोंद आहे. विमा योजनेच्‍या त्रीपक्षीय करारा मधील एक आवश्‍यक प्रतिपक्ष म्‍हणून महाराष्‍ट्र शासनाचे वतीने तहसिलदार हे आहेत. तहसिलदार हे संबधित मृतक शेतक-याचे वारसदारां कडून विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह प्राप्‍त करतात आणि पुढे तो विमा दावा विमा निश्‍चीतीसाठी पाठवितात. तहसिलदार साकोली यांचे लेखी निवेदन आणि पुराव्‍या दाखल कार्यालयीन रजिस्‍टर मधील नोंदीचा दसतऐवज यावरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्तीने तिचे पतीचा दिनांक-05.06.2008 रोजी शेतामध्‍ये आंगावर  विज पडून मृत्‍यू झाल्‍याने आवश्‍यक दस्‍तऐवजासह विमा दावा तहसिलदार यांचे कार्यालयात दिनांक-21.07.2008 रोजी दाखल केला होता. तहसिलदार हे महाराष्‍ट्र शासनाचे एक जबाबदार अधिकारी असल्‍याने त्‍यांचे लेखी निवेदनावर व त्‍यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजी पुराव्‍यावर अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा बचाव की त्‍यांना तक्रारकर्तीचा विमा दावाच प्राप्‍त झालेला नाही यामध्‍ये काहीही तथ्‍य दिसून येत नाही.

12.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तरा मध्‍ये असाही आक्षेप घेतलेला आहे की, महाराष्‍ट्र शासन, ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि विमा एजंट कंपनी कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे मध्‍ये दिनांक-29.08.2007 रोजी त्रीपक्षीय विमा करार अस्वित्‍वात आला होता. परंतु प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला प्रतिपक्ष केलेले नाही त्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. या आक्षेपा संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट कंपनी ही तहसिलदार आणि विमा कंपनी यांचे मध्‍ये कार्य करणारी  एक मध्‍यस्‍थ कंपनी असून तहसिलदार यांचे कडून प्राप्‍त विमा दावे ती कंपनी ही विमा कंपनी कडे विमा दाव्‍यांची छाननी करुन व विमा दावा प्रस्‍तावा मधील त्रृटींची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा कंपनीकडे विमा दावा निश्‍चीतीसाठी पाठविते. कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड या कंपनीला प्रतिपक्ष केले नाही म्‍हणून प्रकरणातील गुणवत्‍तेवर कोणताही फरक पडत नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजांवरुन सुध्‍दा गुणवत्‍तेचे आधारे सदर प्रकरणात निकाल पारीत करणे शक्‍य असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा आक्षेप की, कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीस या विमा एजंट कंपनीला प्रतिपक्ष न केल्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍यात यावी यामध्‍ये काहीही तथ्‍य जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.

13.   तक्रारकर्तीने पान क्रं-24 वर पोलीस स्‍टेशन अधिकारी, साकोली, तालुका साकोली जिल्‍हा भंडारा यांचे अकस्‍मात मृत्‍यू सुचनेचा दस्‍तऐवज दाखल केलेला असून त्‍यामध्‍ये फकीरा फागून घरोटे याचा शेतात विज पडून दिनांक-05.06.2008 रोजी मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. तसेच पान क्रं-25 ते 28 वर दाखल पोलीस घटनास्‍थळ पंचनाम्‍यात सुध्‍दा अशाच आशयाचा मजकूर आहे. तक्रारकर्तीने पान क्रं-31 ते पान क्रं-38 वर मृतक श्री फकीरा घरोटे यांचा शवविच्‍छेदन अहवाल जो वैद्दकीय अधिकारी, उपजिल्‍हा रुग्‍णालय, साकोली, जिल्‍हा भंडारा यांनी दिनांक-06.06.2008 रोजी तयार केलेला आहे, त्‍या शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृत्‍यूचे कारण हे “Death is due to electrocution injury”  असे नमुद आहे. यावरुन ही बाब सिध्‍द होते की, मृतक श्री फकीरा फागून घरोटे याचा मृत्‍यू हा शेतामध्‍ये विज अंगावरुन पडून झालेला आहे. तक्रारकर्तीने महाराष्‍ट्र शासनाचा शेतकरी अपघात विमा योजनेचा दिनांक-24 ऑगस्‍ट, 2007 रोजीचा शासन निर्णय पान क्रं-12 ते पान क्रं-18 वर दाखल केलेला असून त्‍यानुसार विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-15 ऑगस्‍ट, 2007 ते 14 ऑगस्‍ट, 2008 असा असल्‍याचे नमुद आहे. यावरुन मृतकाचा मृत्‍यू हा सदर विमा योजनेच्‍या कालावधी मध्‍ये झाल्‍याची बाब सिध्‍द होते. तहसिलदार, साकोली यांचे कार्यालयातील रजिस्‍टर नोंदी वरुन तक्रारकर्तीने पतीचे मृत्‍यू नंतर विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजासह तहसिलदार यांचे कार्यालयात दिनांक-21.07.2008 रोजी दाखल केला होता ही बाब सिध्‍द  होते.  थोडक्‍यात तक्रारकर्तीने विहित मुदतीत विमा दावा दाखल केल्‍याची बाब सिध्‍द होते. सदर महाराष्‍ट्र शासनाचे निर्णया नुसार विमा कंपनीला विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून एक महिन्‍याचे आत विमा दाव्‍यावर निर्णय घ्‍यावयाचा आहे असे नमुद आहे.

14.    या प्रकरणात तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, साकोली यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-21.07.2008 रोजी दाखल केला होता ही बाब कार्यालयातील नोंद रजिस्‍टर वरुन सिध्‍द होते परंतु पुढे तहसिलदारांनी सदर विमा प्रस्‍ताव कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे नेमका कोणत्‍या तारखेस पाठविला व कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट कंपनीने सदर विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा रकमेच्‍या निश्‍चीतीसाठी केंव्‍हा पाठविला या बाबी या प्रकरणात उघड झालेल्‍या नाहीत. थोडक्‍यात असे दिसून येते की, तहसिलदार-कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट कंपनी लिमिटेड-ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचे मध्‍येच समन्‍वयाचा अभाव (Lack of Co-Ordination between Tahsildar-Kabal Insurance Pvt. Ltd. And Oriental Insurance Company) आहे परंतु त्‍यासाठी तक्रारकर्तीला जबाबदार ठरविणे उचित होणार नाही व तसे केल्‍यास तिचेवर तो अन्‍याय होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे कारण दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्तीचा पती हा व्‍यवसायाने शेतकरी होता, विमा योजनेच्‍या कालावधी मध्‍येच त्‍याचे शेतात आंगावर विज पडून  अपघाती मृत्‍यू झाला होता आणि त्‍याचे  मृत्‍यू नंतर विहित मुदतीत कायदेशीर वारसदार या नात्‍याने तक्रारकर्तीने विमा दावा तहसिलदार यांचे कार्यालयात दाखल केलेला होता. परंतु योग्‍य समन्‍वयाचे अभावामुळे  तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍ताव विहित मुदतीत दाखल केल्‍या नंतर सुध्‍दा तिला तहसिलदार, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तसेच ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून तिचे विमा दाव्‍या संदर्भात कोणतीही सुचना प्राप्‍त झालेली नाही म्‍हणून तिने वकीलांचे मार्फतीने तहसिलदार साकोली यांचे कडून माहिती अधिकारा अंतर्गत तिचे विमा दाव्‍या संदर्भात माहिती सुध्‍दा मागविली होती व तशी माहिती त‍हसिलदार यांनी पुरविली होती या बाबी दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द होतात. अशाप्रकारे विमा दावा प्रस्‍ताव विहित मुदतीत दाखल करुन सुध्‍दा प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करे पर्यंत तिचे विमा दावा प्रस्‍तावा बाबत तिला काहीही कळविण्‍यात आलेले नाही आणि ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे सेवेतील त्रृटी आहे  आणि त्‍यामुळे तिला निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 चे उत्‍तर “होकारर्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 ते 3 चे उत्‍तर “होकारार्थी” नोंदविण्‍यात आल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 4 अनुसार प्रकरणात खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.

14.   उपरोक्‍त सखोल विवेचना वरुन तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू बाबत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) आणि सदर विमा रकमेवर  तक्रारकर्तीने सर्व प्रथम विमा दावा तहसिलदार यांचे कार्यालया दाखल केल्‍याचा दिनांक-21.07.2008 नंतर विमा दावा निश्‍चीत करण्‍यासाठीचा कालावधी 03  महिने सोडून म्‍हणजे दिनांक-21.10.2008 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. याशिवाय ति‍ला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- अशा नुकसानभरपाईच्‍या  रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार साकोली, जिल्‍हा भंडारा यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत दाखल केल्‍याने त्‍यांचे सेवेत कोणतीही त्रृटी दिसून येत नाही व तक्रारकर्तीची सुध्‍दा त्‍यांचे विरुध्‍द तशी कोणतीही तक्रार नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, तहसिल कार्यालय साकोली,  जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

18.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                                                     :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय क्रं-2, नागपूर यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर दिनांक-21.10.2008 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास सदर विमा रक्‍कम  आणि त्‍यावर दिनांक-21.10.2008 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याज यासह येणारी रक्‍कम तक्रारकर्तीला रक्‍कम देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं.-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष क्रं-(2) तहसिलदार, तहसिल कार्यालय साकोली, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध      करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्ती तर्फे दाखल “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात. विरुध्‍दपक्षा तर्फे दाखल फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.