(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांचे पती कै.राजाराम लखु बारे यांचे दि.09/03/2010 रोजी मोटार अपघातात निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- दि.09/04/2010 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
सामनेवाले क्र.2 तर्फे पोष्टाने प्राप्त जबाब पान क्र.15 लगत दाखल आहे. सामनेवाला क्र.1 यांचा जबाब मुदतीत दाखल नाही म्हणून त्यांचेविरुध्द नो से चे आदेश करण्यात आले.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
तक्रार क्र.155/2011
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?-नाही.
3. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता 12/8/2009 चे परिपत्रकाप्रमाणे व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा सुरु केलेला आहे. त्याचा कालावधी 15/8/2009 ते 14/8/2010 असा होता.
सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
सदर पॉलिसीचे स्वरुप पहाता सदरची विमा पॉलिसी ही महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यांकरीता “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी शासनामार्फत उतरवली आहे. याचा विचार होता अर्जदार हया मयत शेतकरी राजाराम लखु बारे यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.21 लगत पुरसीस दाखल केली आहे त्यामध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून विमा रक्कम रु.1,00,000/-चा धनादेश मिळालेला आहे. परंतु सदर रक्कम रु.1,00,000/- वर व्याज, मानसिक त्रास व अर्जाचा खर्च यांची रक्कम मागणीचा हक्क अबाधीत ठेवून सदरचा अर्ज मंचात चालु ठेवत आहे” असे नमूद केलेले आहे.
तक्रार क्र.155/2011
मयताचा मृत्यू हा अपघातात झालेला आहे ही बाब मान्य करुन, सामनेवाले यांनी अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- चा धनादेश दिलेला आहे. अर्जदारास सदरची रक्कम मिळालेली आहे व इतर खर्चाच्या मागणीकरीता सदर अर्ज दाखल आहे, परंतु अर्जदार यांनी सदर नमूद धनादेश क्रमांक व तारीख तसेच धनादेश केंव्हा मिळाला या बाबी पुरसीसमध्ये नमूद केलेल्या नाहीत. तसेच सदर विम्याची रक्कम हक्क राखून स्विकारली असल्याबाबत कोर्टासमोर पुरावा सादर केलेला नाही. अर्जदार यांनी विमा रकमेचा चेक सामनेवालाकडून स्विकारलेला आहे. सदर तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सामनेवाला यांनी विमा क्लेमच्या रकमेचा चेक अर्जदार यांना अदा केलेला आहे व सदर चेक अर्जदार यांना मिळालेला आहे. यावरुन सामनेवाला यांची सेवा देण्याची तत्परता दिसून येत आहे. सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही. त्यामुळे व्याज, तक्रार अर्जाचा खर्च व मानसिक त्रास मागण्यास अर्जदार हे पात्र ठरत नाहीत असे या मंचाचे मत आहे.
सबब वरील कारणांचा विचार होता सामनेवाले यांचे सेवेत कमतरता स्पष्ट होत नाही. या मुद्यावर सदरची तक्रार नामंजूर करावी असे मंचाचे मत आहे.
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.