::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 24/04/2019)
अर्जदार हिने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
1. अर्जदार वरील पत्त्यावर राहत असून अर्जदाराचे पती वामन लहानू खोब्रागडे हे दिनांक 24/1/2008 रोजी सायकलने जात असताना एका ट्रकने धडक दिल्यामुळे दुखापत होऊन ते मरण पावले. अर्जदाराचे पती शेतीव्यवसाय करीत होते व मृत्युसमयी त्यांच्या नावे मौजा पार्टी चिमूर येथे भूमापन क्र. 130 ही शेतजमीन होती. सदर शेतीच्या उत्पन्नावर तो संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. शासनामार्फत अर्जदाराचे पतीचा शेतकरी अपघात विमा काढला असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कडे विमादावा मिळण्यास्तव अर्ज सादर केला. गैरअर्जदार क्र.2 यांना सदर पॉलिसीचे नियमानुसार विमादावा स्विकारण्यासाठी नियुक्त केलेले आहे. सदर पॉलिसीच्या नियमानुसार गैरअर्जदार क्र. 2 हे सर्व कागदपत्रांची शहानिशा करून दावे स्वीकारतात व ते पुढे इन्शुरन्स ॲडव्हायझर यांच्याकडे पाठवतात व इन्शुरन्स ॲडव्हायझर सदर दावे गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे पाठवतात. सदर योजने प्रमाणे मृतक यांचा रुपये 1 लाखाचा विमा हा महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आला होता सदर शासनाच्या विमा प्रमाणे तक्रार करता ही मयत यांची पत्नी असल्यामुळे सदर विम्याची लाभार्थी आहे. अर्जदाराने आवश्यक दस्तावेजांसह गैरअर्जदार क्र. 2 कडे दावा सादर करूनसुद्धा तिला आजपर्यंत तिच्या दाव्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे चौकशी करून सुद्धा तिला तिच्या दाव्याबद्दल कोणतीही माहिती गैरअर्जदार क्र. 2 यांनी दिली नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दाखल केलेला दाव्या अनुषंगाने विरुद्ध पक्ष क्र.1 यांनी ज्या दस्ताची मागणी केली होती त्याची पूर्ण पूर्तता अर्जदाराने केलेले आहे तरीसुद्धा त्याचे भुगतान न करता व तो प्रलंबित ठेवून अर्जदाराची गैरअर्जदार यांनी फसवणूक केलेली आहे व त्यामुळे अर्जदार हिला अतिशय हाल-अपेष्टा सहन करावा लागत आहे व दाव्यालाही मुकावे लागत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा देण्याकरता निर्गमित केलेल्या योजनेच्या उद्देशालाच गैरअर्जदारांनी तडा दिलेला आहे व अर्जदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे. सबब गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुद्ध मंचासमक्ष प्रस्तूत तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार हिने तक्रारीत मागणी केली आहे की गैरअर्जदाराणे अर्जदार बाईला विमा दाव्याची रक्कम एक लाख गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्यापासून दसादशे 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत तसेच शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रू.20,०००/-व तक्रारीचा खर्च रू.१०,०००/- देण्यात यावा.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरूध्द नोटीस काढण्यात आले.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी मंचासमक्ष उपस्थित राहून त्यांचे उत्तर प्रकरणात दाखल केले. त्यांनी की तथाकथीत अपघात हा दिनांक 24/1/2008 मध्ये होऊन तक्रारर्कीचे पती वामन हे मृत्यू पावले. अशा परिस्थितीत 2008 मध्ये घडलेल्या कारणाकरिता दिनांक 21/12/2017 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविणे हे तक्रार दाखल करण्याकरता कारण होऊ शकणार नाही. अर्जदाराची तक्रार प्राथमिक दुष्टया मुदतबाह्य आहे. वास्तविक अर्जदाराने विमादाव्यासोबत काही दस्तावेज गैरअर्जदार क्र. 2 चे माध्यमातून गैरअर्जदार विमा कंपनीकडे सादर केले. त्या दस्तऐवजांचा अभ्यास केल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास वारंवार मृतकाचे नाव असलेला जमिनीचा मूळ 7/12, नमुना 8 अ, व 6 क तसेच मृत्यू आधीचे मूळ फेरफार पत्रक इत्यादी दस्तावेज मागणी केली. परंतु अर्जदाराने या दस्तऐवजांची पूर्तता न केल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 2/8/2008 रोजी अर्जदारास पत्र पाठवून उपरोक्त दस्तावेज सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु अर्जदाराने सदर दस्तावेज दाखल न केल्यामुळे गैर अर्जदाराने पुन्हा 7/5/2009 रोजी पत्र पाठवून मागणी केली की 15 दिवसाच्या आत दस्तावेज न दिल्यांस तिचा विमादावा बंद करण्यात येईल. परंतु अर्जदाराने कागदपत्रे सादर न केल्यामुळे शेवटी गैरअर्जदाराने दावा बंद केला, ही बाब अर्जदाराने मंचापासून लपवून ठेवली आहे. अशा परिस्थितीत तब्बल नऊ वर्षानंतर दाखल केलेला हा ग्राहक वाद मुदतबाह्य झाल्यामुळे प्राथमिक दृष्ट खारीज होण्यास पात्र आहे. सबब गैरअर्जदार विरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा अर्जदाराला अधिकार नाही अशा परिस्थितीत विमा पॉलिसी अटी व करारातील तरतुदीनुसार गैरअर्जदार विमा कंपनीची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे व त्याप्रमाणे ती खारीज करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्र. 2 यांना मंचातर्फे नोटीस निशाणी क्र. 19 नुसार प्राप्त होऊन सुद्धा गैरअर्जदार क्र. 2 प्रकरणात उपस्थित न झाल्यामुळे निशाणी क्र. 1 वर गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश दि.3/1/2019 रोजी पारीत करण्यांत आले.
5. अर्जदारची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच अर्जदार व वि. प क्र.1 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
1. अर्जदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? नाही
2. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत
6. अर्जदाराच्या पतीचा मृत्यू 24 1 2008 रोजी ते सायकलने जात असता ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन झाला ही बाब वादातीत आहे. प्रकरणात दाखल मर्ग खबरी, घटनास्थळ पंचनामा व शवविच्छेदन अहवाल यावरूनही ही बाब सिद्ध होते. तसेच अर्जदाराच्या पतीच्या नावे त्याच्या मृत्यूच्या वेळी मौजा पार्डी तहसील चिमूर येथे भूमापन क्र. 130 ही शेतजमीन होती हेदेखील वादातीत आहे. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून विमा दावा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज २००८ मध्ये अर्ज केला व गैरअर्जदाराच्या उत्तरात नमूद असल्याप्रमाणे शहानिशा करून अर्जदाराने आवश्यक दस्तावेज दाखल केले नाहीत या कारणास्तव खारीज केला. परंतु अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैर अर्जदारांनी पाठविलेल दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. परंतु मंचाच्य मते इखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्य्नंतर तो दावा प्राप्त करण्यासाठी ९ ते १० वर्ष वाट पाहणार नाही किवा दावा मिळण्याकरिता तिचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्यवहार किंवा पाठपूरावा केल्याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही. त्यामुळे प्रस्तूत प्रकरणात दावा दाखल केल्यानंतर फक्त दावा नाकारण्याचे पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्या सारखी नाही . शिवाय गैरअर्जदाराने प्रकरणात दाखल केलेल्या दस्तावेजांवरून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास वारंवार मृतकाचे नाव असलेला जमिनीचा मूळ 7/12, नमुना 8 अ, व 6 क तसेच मृत्यू आधीचे मूळ फेरफार पत्रक इत्यादी दस्तावेज मागणी केली होती परंतु अर्जदाराने या दस्तऐवजांची पूर्तता न केल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 2/8/2008 रोजी अर्जदारास पत्र पाठवून उपरोक्त दस्तावेज सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु अर्जदाराने सदर दस्तावेज दाखल न केल्यामुळे गैर अर्जदाराने पुन्हा 7/5/2009 रोजी पत्र पाठवून 15 दिवसाच्या आत दस्तावेज न दिल्यांस तिचा विमादावा बंद करण्यात येईल असे स्पष्ट कळविले. परंतु अर्जदाराने कागदपत्रे सादर न केल्यामुळे शेवटी गैरअर्जदाराने दावा बंद केला. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीचा दावा बंद करून गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही असे मंचाचे मत आहे. सबब सदर तक्रार मुदतीत नाही तसेच ती गुण्णवत्तेवरही सिध्द होत नसल्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.१९/२०१८ खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.