दोन्ही पक्ष हजर, तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिचे पती श्री.विष्णु वसंत साठे होते त्यांचा दि.22.10.2008 रोजी अपघाती मृत्यू झाला. शासनाने अपघाती मृ’त्यू होणा-या शेतक-यांच्या वतीने शेतकरी अपघात विमा योजना निर्माण केलेली आहे व गैरअर्जदार विमा कंपनी अशा शेतक-यांना विमा देण्यांस जबाबदार आहे. तक्रारकर्तीने विमा रकमेची मागणी केली मात्र गैरअर्जदारांनी विमा दिला नाही, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांशी संबंधीत सर्व आवश्यक दस्तावेज तलाठयामार्फत गैरअर्जदारांकडे जमा केली. तक्रारकर्तीला जानेवारी 2011 ला गैरअर्जदारांनी विमा दावा फेटाळल्याची माहिती मिळाल्यामुळे तिने प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे विम्याची रक्कम रु.1,00,000/- मिळावी तीवर 12% व्याज मिळावे, नुकसान भरपाई म्हणून रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता त्यांनी मंचात हजर होऊन आपला जबाब दाखल केला त्यात सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, कराराप्रमाणे सदर वादाचे अधिकारक्षेत्र हे मुंबई येथील न्यायमंचास दिलेले आहे, त्यामुळे ही तक्रार येथे चालू शकत नाही. त्यांना तक्रारकर्तीने तिचे पती शेतकरी असल्याचा सातबाराचा उतारा मान्य नाही, त्याचप्रमाणे संपूर्ण पोलिस दस्तावेजामध्ये मृत झालेल्या व्यक्तिचे वर्णन ’अज्ञात व्यक्ती’ म्हणून आहे. विष्णु वसंत साठे हेच मृत पावले याबाबतचा कोणताही पुरावा तक्रारकर्तीने दाखल केलेला नाही, म्हणून तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे.
यातील गैरअर्जदारांचा महत्वाचा आक्षेप असा आहे की, या मंचास अधिकार क्षेत्र नाही, कारण कराराप्रमाणे मुंबई येथील मंचास अधिकारक्षेत्र दिले आहे. या संबंधात प्रत्यक्षात कराराप्रमाणे संबंधीताचे हक्क नष्ट करता येत नाही असा निर्वाळा राष्ट्रीय आयोगाने यापूर्वीच दिलेला आहे. गैरअर्जदार विमा कंपनीचे नागपूर येथेच कार्यालय आहे व त्यांनी या प्रकरणी पॉलिसी दिलेली आहे. अश्या स्थितीत या मंचास अधिकारक्षेत्र आहे हे स्पष्ट आहे. तक्रारकर्तीचे मृत पती हे शेतकरी होते याबाबत सातबाराचा उतारा दाखल केलेला आहे, पोष्ट मार्टम रिपोर्टवरुन मृतकाचे नाव विष्णु वसंत साठे आहे हे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे गैरअर्जदारांचा ’अज्ञात व्यक्ती’ बाबतचा आक्षेप विचारात घेण्यांत येत नाही. तसेच पान क्र.17 वर दाखल केलेला दस्तावेज पोलिस फायनल रिपोर्ट मध्ये मृतकाचे नाव नमुद नाही या कारणावरुन विमा नाकारला, ते कारण चुकीचे आहे हे उघड आहे.
वरील सर्व परिस्थिचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला विम्याची रक्कम रु.1,00,000/- दावा नाकारल्याचे दि.12.11.2009 पासुन 12% व्याजासह मिळून येणारी रक्कम अदा करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीकरीता वरील रकमेवर द.सा.द.शे. 12% व्याज देय राहील.