(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 19/01/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.30.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याचा मे. दामोधर कार्गो मुव्हर्स यानावाने व्यवसाय असुन त्याने ट्रेलर मॉडेल ए.एम.डब्लू, नोंदणी क्र.एमएच-40/6744 हे वाहन गैरअर्जदार क्र.4 यांचेकडून विकल घेतले होते व सदर वाहन आरटीओ, नागपूर (ग्रामीण) यांचेकडून स्वतःचे नावे केले आहे. तसेच सदर वाहन सुदरम फायनान्स यांचेकडे Hypothecate केलेला आहे. तक्रारकत्याने सदर वाहनाचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे काढलेला असुन त्याचा पॉलिसी क्र.123100/31/2009/2171 असुन कालावधी दि.16.05.2008 ते 15.05.2009 असा होता. तसेच सदर विमा काढण्याचे वेळेस सदर ट्रेलर हा गैरअर्जदार क्र.4 चे नावे होता. दि.27.04.2009 रोजी सदर वाहन जालना ते औरंगाबाद हायवेवरुन जात असतांना हॉटेल महाराजा, बदनापूर समोर अचानक ऑटोरिक्षा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरील ट्रीपलला धडकून ट्रेलर रोडच्या बाजूला पलटी झाला. सदर अपघाताची सुचना पोलिस स्टेशनला देण्यांत येऊन पंचनामा करण्यांत आला. त्यानंतर सदरचे वाहन ‘मिटलॅड मोटर्स’, यांचेकडे दुरुस्तीसाठी देण्यांत आली. त्यापुर्वी सदर ट्रकचा श्री. जे.बी.जिंतुरकर (सर्व्हेअर) यांचेकडून स्पॉट सर्व्हे करण्यांत आला. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे श्री. व्ही.के. गर्ग यांचेकडून सर्व्हे करण्यांत आला. मिडलॅड मोटरने खर्चाचे प्राथमिक इस्टीमेट दिले, त्यानुसार गाडी दुरुस्तीचे अंतिम बिल तसेच आवश्यक कागतपत्रासह गैरअर्जदार विमा कंपनीकडे दावा प्रपत्रासोबत सादर केले. त्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने वारंवार मागणी केल्याप्रमाणे आवश्यक ती माहिती देण्यांत आली. सदर ट्रेलर सुंदरम फायनान्स, नागपूर यांचेकडे Hypothecate केले होते म्हणून त्यांचेकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’, व इतर कागदपत्रांचे जुळवा-जुळव करावी लागली. तसेच सुंदरम फायनान्स व गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनी यांनी आरटीओ, नागपूर यांचे नावे पत्र देऊन ट्रेलर विकल्याबाबत कळविण्यांत आले. परंतु काही कारणास्तव तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.4 ट्रेलरच्या मुळ मालकाचे नाव बदलवुन स्वतःच्या नावे चढविण्यासाठी सादर करुन शकले नाही. परंतु त्यापुर्वीच सदर वाहनाचा अपघात झाला व त्यानंतर अपघातामुळे पुन्हा काही काळ नाव बदलवु शकले नाही. तक्रारकर्त्याने ट्रेलर दुरुस्त झाल्यानंतर दि.03.03.2010 रोजी आरटीओ, नागपूर यांचेकडे ट्रेलर मालकाचे नाव बदलवुन तक्रारकर्त्याचे नाव चढविण्यांत आले. सदरच्या वाहनाची दुरुस्तीसाठी तक्रारकर्त्यास एकूण रु.4,69,934/- एवढा खर्च आला व सदरची रक्कम गैरअर्जदार क्र.4 ‘मिडलँड मोटर्स’ यांना संपूर्णपणे अदा केलेली आहे. गैरअर्जदार कंपनीने विमा दावा निकाली काढतांना उपरोक्त बाबींचा कुठलाही विचार न करता तक्रारकर्त्यास विमा दावा दि.25.11.2009 रोजी नोंदणीकृत प्रमाणपत्रामधे तक्रारकर्त्याचे नाव चढले नसल्याचे कारणास्तव परत केला. गैरअर्जदारांची ही कृति सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 7 च्या छायांकीत प्रती पान क्र.9 ते 23 वर जोडलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदार क्र.1 ते4 यांनी आपल्या कथनानुसार सदरचे वाहन (ट्रेलर) चे विमापत्र तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.3 यांच्या ठाणे येथील कार्यालयातुन प्राप्त केले असल्यामुळे तसेच सदर विमापत्रावर ‘संपूर्ण समाचार विमापत्र जारी करणा-या कार्यालयाशी करावा’, असे नमुद असतांना देखिल तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1,2 व 4 यांना प्रतिवादी म्हणून समावेश केलेला आहे, त्यामुळे सदरची तक्रार खारिज करण्यांत यावी. गैरअर्जदारांच्या मते सदरचे वाहन तक्रारकर्त्याने गेरअर्जदार क्र.4 यांचेकडून खरेदी केल्याचे दस्तावेज क्र.3 नुसार दि.09.07.2008 रोजी आरटीओ, नागपूर (ग्रामीणे) यांना कळविल्याचे दस्तावेज तसेच सदर वाहन हे तक्रारकर्त्याच्या नावे दि.03.03.2010 रोजी आरटीओ, (ग्रामीण) यांचेकडे स्थानांतरीत झाल्याचे सिध्द होते. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्र.4 यांनी दि.28.02.2008 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टरचे सभेमधे सदर वाहन तक्रारकर्त्यास विकण्याचे ठरविल्याचे दिसुन येते. परंतु संबंधीत विमापत्र हे दि.16.05.2008 रोजी तक्रारकर्त्याने तो वाहनाचा मालक नसतांना दि.09.07.2008 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांनी आरटीओ, नागपूर (ग्रामीण) यांना सदर वाहनाचे मालकी हक्क तक्रारकर्त्याचे नावे स्थानांतरीत करण्याचे पत्र दिले, त्या तारखेच्या ब-याच अगोदर म्हणजे दि.16.05.2008 रोजी तक्रारकर्त्यास गैरअर्जदार क्र.3 यांची फसवणूक करुन स्वतःचे नावे काढले आहे. गैरअर्जदारांनी सदर झालेला अपघात, नुकसान, ट्रकचा प्रथम सर्व्हे आणि अंतिम सर्व्हे केल्याचे मंजूर करुन इतर बाबी नामंजूर केलेल्या आहेत. त्याच प्रमाणे वाहन दुरुस्तीचे अंतिम बिल तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे सादर केल्याचे म्हणणे अमान्य केलेले आहे. तक्रारकर्ता अपघात व्हायच्या अगोदर मुख्यत्वे विमा पत्र प्राप्त करण्याचे तारखेच सदर वाहन आरटीओ, रेकॉर्डनुसार तक्रारकर्ता नोंदणीकृत किंवा पंजीकृत मालक नव्हता. तसेच अपघाताचे दिवशी आरटीओ रेकॉर्डनुसार ‘माईन्स्ट्रक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.’, पनवेल हे मालक होते.
5. गैरअर्जदारांचे म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.4 यांना दुरुस्तीपोटी आलेल्या खर्चाची रक्कम दिल्याचे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदारांनी सदर वाहनाची सुचना मिळाल्या बरोबर वाहनाचे निरीक्षण करण्याकरीता श्री. व्ही.के. गर्ग, यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली होती. तसेच त्यांनी दिलेल्या अहवालानुसार सदर वाहनाचे नुकसानीची रक्कम रु.3,56,048/- एवढी ग्राह्य मानली आहे.
6. वरील सर्व बाबी लक्षात घेता तसेच अपघाताचे वेळी तक्रारकर्त्याने वाहनाचे नोंदणीकृत मालक नसल्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास कुठलाही मुहावजा देण्यांस कायदेशिररित्या बंधनकारक नाही. त्यामुळे सदर तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
7. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.19.01.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
8. सदरच्या प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती, पुरावे व दोन्ही बाजुंचे म्हणणे पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हा ट्रेलर क्र. एमएच-40/6744 चा मालक असुन सदरी वाहन त्याने गैरअर्जदार क्र.5 कडून विकत घेतले होते. तसेच सदर वाहन सुंदरम् फायनान्स कंपनीकडे Hypothecate केलेले असुन दस्तावेज क्र.1 वरुन असे स्पष्ट होते की, सदर वाहनपाचा विमा तक्रारकर्त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे काढलेला होता व त्याचा पॉलिसी क्र.123100/31/2009/2171 असुन कालावधी दि.16.05.2008 ते 15.05.2009 असा होता. दि.27.04.2009 रोजी सदर वाहनाचा अपघात झाला ही बाब गैरअर्जदाराने सुध्दा आपल्या जबाबात मान्य केलेली आहे. तसेच दाखल दस्तावेजांवरुन हेही दिसुन येते की, तक्रारकर्त्याने सदर पॉलिसी अंतर्गत गैरअर्जदार विमा क्रपनीकडे विमा सादर केला होता. दि. 25.11.2009 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने अपघाताचे समयी आरटीओ, नागपूर (ग्रामीण) व रजिस्टेशन प्रमाणपत्र तक्रारकर्त्याचे नावे चढविले नव्हते या कारणास्तव तक्रारकर्त्याचा दावा नाकारला.
9. परंतु सदर वाहनाची नोंदणी जरी तक्रारकर्त्याचे नावे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेली नव्हती, तरी दस्तावेज क्र.17, 18 वरुन असे दिसते की, ‘सुंदरम् फायनान्स’, कंपनीने दि.09.07.2008 रोजी नोंदणी अधिकारी, नागपूर येथे सदर वाहनाचे पुर्वीचे मालक गैरअर्जदार क्र.5 ‘‘माईन्स्ट्रक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.’, पनवेल यांचे नावावरुन नवीन मालक म्हणजेच तक्रारकर्त्याचे नावे वाहनाच्या नोंदणीकरता ‘हा हरकत प्रमाणपत्र’, दिले होते. तसेच दस्तावेज क्र.9 वरुन असेही दिसुन येते की, गैरअर्जदार क्र.4 यांनी दि.28.02.2008 रोजी त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या सभेत सदर वाहन तक्रारकर्त्यास विकण्याचे ठरविलेले होते.
10. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारकर्त्याचे सदर वाहनाचा विमा काढलेला असल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीच्या अटी व शर्तींना अधिन राहून विमा दावा देण्याची जबाबदारी गैरअर्जदार कंपनीची आहे. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्त्याने त्यांची फसवणूक करुन सदरचा विमा काढलेला आहे, परंतु तक्रारकर्त्याने फसवणूक केल्याबाबत गैरअर्जदारांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे गैरअर्जदारांचे सदरचे म्हणणे मंचास मान्य करता येत नाही. तसेच जरी तक्रारकर्त्याचे सदर वाहन सुदरम् फायनान्स यांचेकडे ‘Hypothecate’, असले तरी वाहनाचे दुरुस्तीचा खर्च हा तक्रारकर्त्याने स्वतःच केलेला असल्यामुळे तो विमा दाव्याची रक्कम मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे.
11. दस्तावेज क्र.14 वरुन असे निदर्शनांस येते की, गैरअर्जदारांनी सदर वाहनाचे निरीक्षण करण्यासाठी श्री. व्ही.के. गर्ग आणि कंपनी, चंद्रपूर यांची नेमणुक केलेली होती. त्यांनी दिलेल्या अहवालावरुन नुकसानीची किंमत रु.3,56,048/- एवढी ग्राह्य धरण्यांत आली आहे. तक्रारकर्त्याने सदर अहवालात त्यांनी ठरविलेल्या नुकसान भरपाईबाबत कुठलाही आक्षेप घेतलेला नाही, हे पाहता नुकसान भरपाईपोटी सदरची किंमत योग्य आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
12. तक्रारकर्त्याची गैरअर्जदार क्र.5 विरुध्द कुठलीही तक्रार नाही त्यामुळे त्यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नाही, त्यामुळे ते तक्रारकर्त्याचे नुकसान भरपाईस जबाबदार नाही. तसेच गैरअर्जदार ही मुख्य कार्यालय व गैरअर्जदार क्र.2, 3 व 4 ही त्यांची विभागीय कार्यालये असल्यामुळे मंच खालिल प्रमाणे आदेश देत आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदार क्र.1,2,3 व 4 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रु.3,56,048/- द्यावी. सदर रकमेवर दि.25.11.2009 पासुन रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदार क्र.1,2,3 व 4 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदार क्र.5 यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते.
5. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र.1,2,3 व 4 यांना आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या करावी.