(मा. सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र
अर्जदार यांचे पती मयत खंडू उर्फ खंडेराव विठोबा निर्मळ यांचे दि. 9/10/2009 रोजी रस्ता अपघातात निधन झाले. अर्जदार यांना विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ न दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु. 1,00,000/- दि. 1/11/2010 पासून 18% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,आर्थिक व शारिरीक त्रासापोटी रु. 25,000/- मिळावे, सेवेतील कमतरतेपाटी रु. 20,000/- मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.
सामनेवाले क्र. 1 यांचा जबाब पान क्र. 27 लगत व पान क्र. 28 लगत प्रतिज्ञापत्र दाखल आहे. सामनेवाले क्र. 2 तर्फे पोष्टाने प्राप्त जबाब पान क्र. 23 लगत दाखल आहे.
अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः
मुद्देः
1. अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय
2. सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- होय. सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली
आहे.
3. अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व्याजासह
मिळण्यास पात्र आहेत काय? -- होय
4. अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 कडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? -- होय
5. अंतीम आदेश? -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 विरुध्द
नामंजूर करणेत येत आहे व सामनेवाले क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
विवेचनः
याकामी अर्जदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.
महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता 12/8/2009 चे परिपत्रकाप्रमाणे व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा सुरु केलेला आहे. त्याचा कालावधी 15/8/2009 ते 14/8/2010 असा होता. सामनेवाले क्र. 1 यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.
सामनेवाले क्र. 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज्य शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 विरुध्द नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले क्र. 1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही शेतक-यांकरीता विमा योजना घेतलेली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार हया मयत खंडू उर्फ खंडेराव विठोबा निर्मळयांच्या पत्नी आहे ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यामधील कथनावरुन अर्जदार हया मयत खंडू उर्फ खंडेराव विठोबा निर्मळ यांचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, “अर्जदार हया सामनेवाले यांच्या ग्राहक नाहीत. मयताकडे अपघाताचेवेळी वाहन चालविणेचा परवाना नव्हता. त्यामुळे पॉलिसीचे अटी शर्तीं कलम VI(A)(2)(3) नुसार सदर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब सामनेवाले यांनी सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता केलेली नाही, त्यामुळे सदरचा अर्ज रद्द करावा,” असे नमूद केलेले आहे.
अर्जदार यांनी पान क्र. 6 ते 9 लगत अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमधील खबर,फिर्याद, पंचनामा व पोस्ट मार्टेम रिपोर्ट या कागदपत्राचा विचार होता मयत खंडू उर्फ खंडेराव विठोबा निर्मळ हे दि. 9/10/2009 रोजी मोटार सायकल क्र. एम.एच.15 ए.एफ.9174 या वाहनाने भगूरकडून नाशिककडे जात असतांना एस.टी.बसने धडक देऊन अपघात केला. त्यात त्यांचे निधन झाले. याबाबतचा मयताचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट पान क्र. 9 लगत दाखल असून त्यावर मयताचा मृत्यू हा अपघाताने झालेला आहे असे नमूद केलेले आहे. सदर कागदपत्राच्या आधारे मयताचा मृत्यू हा अपघाताने झालेला आहे असे स्पष्ट होत आहे. याबाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, मयताकडे वाहन चालविणेचा परवाना नव्हता. अर्जदार यांनी पान क्र. 31 लगत मयताचे मूळ ड्रायव्हींग लायसेन्स दाखल केलेले आहे. सदर कागदपत्र पाहता त्यावर मयताचे नांव मयत खंडू उर्फ खंडेराव विठोबा निर्मळ असे असून त्यावर ड्रायव्हींग लायसेन्स नं. एम.एच.15/00/68304 असे नमूद आहे. सदर कागदपत्रावरुन असे स्पष्ट होते की मयताकडे अपघाताचेवेळी ड्रायव्हींग लायसेन्स होते.
याबाबत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार कलम 5 मध्ये अपघाती मृत्यूसंदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्करला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच या परिपत्रकामधील पान क्र. 11 प्रपत्र ड नुसार ड्रायव्हींग लायसन्सची आवश्यकता नाही. याचा विचार होता सामनेवाले यांच्या विमा करारातील अटी शर्थींचा भंग होत नाही असे मंचाचे मत आहे.
सदर अपघाताबाबत अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी,नाशिक यांचेकडे दि. 1/11/2010 रोजी कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्ताव दाखल केला आहे. सदर प्रस्ताव कृषी अधिकारी,नाशिक यांनी सामनेवाले यांना पाठविलेला आहे. यावरुन अर्जदार यांनी विमा क्लेमची पूर्तता केलेली दिसत आहे.
तसेच शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे रस्त्यावरील अपघात, विज पडणे, पूर,सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात किंवा अन्य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्यू किंवा अपंगत्व ओढवल्यास अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. याचा विचार होता अर्जदार यांना सदर विमा पॉलिसीचा आर्थिक लाभ होणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र. 11 व 12 लगत 7/12 उतारे व 6 ड ची नोंद दाखल केलेली आहे. यावरील नोंदी पाहता मयत यांचे नांवे शेतजमिन आहे, यावरुन मयत हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्पष्ट होत आहे.
वरील सर्व कागदपत्रे व परिपत्रकाचा विचार होता सामनेवाले यांचे जबाबामध्ये घेतलेला बचाव हा याकामी लागू होत नाही. सामनेवाले यांनी केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन अर्जदाराचा क्लेम नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवालेचे लेखी म्हणणे तसेच अर्जदार व सामनेवालेंनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्यू झाल्यास रु. 1,00,000/-ची विमा जोखीम घेण्यात आली हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार दावा रकमेवर व्याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवालेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु. 1,00,000/- व या रकमेवर सदरचा तक्रार अर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि. 4/2/2011 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 12% दराने व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे. वास्तविक वर उल्लेख केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्लेम योग्य त्या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते. विमा क्लेमची रु. 1,00,000/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य वेळेत मिळालेली नाही. विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले कडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याकामी पुढीलप्रमाणे वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेणेत आलेला आहेः
1. मा. उच्च न्यायालय, मुंबई, शकुंतला धोंडीराम मुंडे वि. स्टेट ऑफ
महाराष्ट्र व इतर (2010(2)Mh.L.J.)
2. 2008(2) सीपीआर महाराष्ट्र आयोग पान 203 आय.सी.आय.सी.आय
लोंबार्ड वि. सिंधुताई खैरनार
3. 2(2008) ए.सी.सी. मुंबई उच्च न्यायालय पान 888 निर्मलाबाई विरुध्द
महाराष्ट्र सरकार.
अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाले क्र. 2 यांचे लेखी म्हणणे, वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे रकमा दयाव्यातः
अ. विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.4/2/2011
पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
ब. मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- दयावेत.
क. अर्जाचे खर्चापोटी रु. 1,000/- दयावेत.