श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 20/07/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने गैरअर्जदार क्र. 3 कडून दि.09.08.2009 रोजी नोकिया कंपनीचा एन 97 मॉडेलचा मोबाईल रु.14,638/- मध्ये विकत घेतला. गैरअर्जदार क्र. 1 ही मोबाईल निर्माता असून गैरअर्जदार क्र. 2 हे दुरुस्ती सेवा केंद्र आहे. तक्रारकर्त्याचा मोबाईल वारंवार चालु बंद होत असल्याने त्याने दुरुस्तीकरीता गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दिला असता त्यांनी बॅटरी बदलविण्यास सांगितली व त्यानुसार दि.26.06.2010 ला रु.3,020/- किंमतीची नविन बॅटरी बसविण्यात आली. परंतू मोबाईलमध्ये असलेल्या दोषाचे निवारण झाले नाही, म्हणून परत-परत मोबाईल गैरअर्जदार क्र. 2 कडे दुरुस्तीस देण्यात आला. तरीही मोबाईल दुरुस्त न झाल्याने दि.17.08.2010 रोजी सदर मोबाईल वारंटी/गॅरंटीमध्ये असल्याने दुरुस्त न झाल्यास बदलावून देण्यात येईल असे आश्वासन देऊन गैरअर्जदार क्र. 2 ने तो स्वतःकडे ठेवून घेतला. या दुरुस्तीबाबतच्या जॉबशीट गैरअर्जदार क्र. 2 ने नाकारली नाही. तक्रारकर्ता मोबाईल घेण्याकरीता गेला असता त्याला सदर मोबाईल फोनची आतील बॉडी क्रॅक झाल्याने तो बदलवून देण्यात येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्त्यास मनस्ताप झाला व विनाकारण नविन बॅटरी विकत घ्यावी लागली. म्हणून त्याने मंचासमोर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराकडून मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई, मोबाईल बदलवून देण्यात यावा किंवा मोबाईलची किंमत मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 सदर प्रकरणी उपस्थित झाले, परंतू त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांचे उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश दि.10.02.2011 व 29.04.2011 रोजी पारित केला. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 3 यांना तक्रारीतून वगळण्याचा अर्ज दाखल केला. अर्ज मंजूर. 3. सदर प्रकरणी मंचासमोर आले असता उभय पक्ष गैरहजर. मंचाने सदर प्रकरण गुणवत्तेवर निकाली काढण्याचे ठरविले. उशिराने गैरअर्जदारांचे वकिल हजर, त्यांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. सदर प्रकरणी दस्तऐवज क्र. 1 वर तक्रारकर्त्याने मोबाईल नोकिया एन 78 हा हँडसेट रु.14,638/- ला घेतल्याची पावती दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार सदर मोबाईल हा वारंवार बंद पडत होता. त्याबाबत त्याने गैरअर्जदार क्र. 1 निर्माता कंपनीचे गैरअर्जदार क्र. 2 सेवा व दुरुस्ती असल्याने त्यांच्याकडे दुरुस्तीस नेला. परंतू सतत दुरुस्तीला दिल्यावर सदर मोबाईल हा सदोषच राहिला. मोबाईल सतत दोष निर्माण होत असल्याची बाब जॉबशिटवरील तारखांवरुन स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदार क्र. 2 कडे विविध तारखांना मोबाईल दुरुस्त करण्यासाठी टाकलेल्या जॉबशिटचे क्रमांक दाखल केलेले आहेत, त्यावरुन गैरअर्जदार क्र. 2 कडे मोबाईल वारंवार दुरुस्तीस टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट होते आणि दुरुस्ती केंद्राकडून मोबाईल परत घेतल्यावर नादुरुस्तच राहिला आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने बॅटरी चांगली नाही म्हणून तक्रारकर्त्याला नविन बॅटरी टाकावयास सांगितली, (दस्तऐवज क्र. 2 वर तक्रारकर्त्याने एक बॅटरी रु.3020 घेतल्याचे नमूद आहे.) परंतू सदर बॅटरी टाकूनही तक्रारकर्त्याच्या मोबाईलमध्ये तोच दोष उत्पन्न होत होता. म्हणजेच सदर दोष हा बॅटरीमुळे नव्हता असे स्पष्ट होते. 5. मोबाईल हा गॅरंटी आणि वारंटी अवधीत असल्याने त्यामध्ये जर दुरुस्त न होणारा दोष असेल तर तो परत बदलवून देण्यात येईल असे आश्वासन गैरअर्जदार क्र. 2 ने दिले. परंतू शेवटी मोबाईलची आतील बॉडी क्रॅक झाल्याने बदलवून मिळणार नाही असेही सांगितले. मंचाचे मते मोबाईल दुरुस्तीकरीता वारंवार गैरअर्जदार क्र. 1 निर्माता कंपनीच्या दुरुस्ती आणि सेवा केंद्राकडे दिलेला आहे, त्यामुळे तक्रारकर्त्यावर असे कारण सांगून मोबाईल वारंटी/गॅरंटी कालावधीत असतांना तो बदलवून देण्यास नकार देणे ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटी आहे. सदोष मोबाईल ग्राहकांना विकणे हे ग्रा.सं.का. अंतर्गत अनुचित व्यापार प्रथेत मोडते. तसेच मोबाईलमध्ये दोष मुख्य कशामुळे निर्माण होत होता, हे गैरअर्जदार त्यात निष्णात असूनही त्यांना खुप काळापर्यंत कळले नव्हते. सदर दोन्ही बाबींकरीता गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे जबाबदार आहेत व मोबाईल वारंटी/गॅरंटी कालावधीत असल्याने तो परत करण्यास गैरअर्जदार क्र. 1 व 2 बांधील आहेत. तसेच गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 1 चे दुरुस्ती व सेवा केंद्र असल्याने त्यांच्या प्रत्येक कृतीस गैरअर्जदार क्र. 1 जबाबदार आहेत, म्हणून तक्रारकर्ता हा नविन मोबाईल नविन वांरटी आणि ग्यारंटीसह मिळण्यास पात्र आहे. जर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यास असमर्थ असतील तर त्यांनी मोबाईलची किंमत ही व्याजासह तक्रारकर्त्याला अदा करणे क्रमप्राप्त आहे. 6. तक्रारकर्त्याला विनाकारण नविन बॅटरी खरेदी करावयास लागल्याने व नविन मोबाईलचा उपयोग न करता आल्याने मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली, म्हणून तक्रारकर्ता मानसिक व शारिरीक त्रासाची क्षतिपूर्ती व तक्रारीचा खर्च मिळण्याबाबत पात्र आहे. यास्तव मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला नविन मोबाईल नविन वांरटी आणि ग्यारंटीसह द्यावा. जर नविन मोबाईल देण्यास गैरअर्जदार हे असमर्थ असतील तर मोबाईलची किंमत रु.14,638/- ही दि.09.08.2009 पासून तर संपूर्ण अदायगीपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता तक्रारकर्त्याला रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून संयुक्तपणे किंवा वैयक्तीकपणे 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |