जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 185/2010 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 28/01/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-10/09/2015.
श्री.प्रभाकर भगीरथ पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.धानोरा,ता.चोपडा,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक, निर्मल सिडस प्रा.लि.,
पाचोरा,ता.पाचोरा,जि.जळगांव.
2. शिव कृषी केंद्र, प्रोप्रा.किशोर वसंत महाजन,
सदगुरु दुध उत्पादक सोसायटी कॉम्प्लेक्स,धानोरा,
धानोरा,ता.चोपडा,जि.जळगांव.
3. श्री.दत्त कृषी केंद्र, प्रोप्रा.दिपक एन.पाटील,
पोस्ट ऑफीस जवळ, धानोरा,ता.चोपडा,
जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.अविनाश के.पाटील वकील.
सामनेवाला क्र.1 तर्फे श्री.एम एस कापसे वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सदोष बियाणांची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहेत. सामनेवाला क्र. 2 व 3 हे मौजे धानोरा गावी बियाणांचे व किटकनाशकांचे अधिकृत विक्रेते आहेत. सामनेवाला क्र. 1 ही बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे. तक्रारदार यांना दरवर्षी प्रमाणे त्यांचे शेतात खरीप कापुस पिक लागवड करावयाचे होते. त्यांनी सामनेवाला यांचेकडे कपाशाचे चांगल्या बियाणाच्या वाणाबाबत चौकशी केली. सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेली देशी कापुस मुक्ता-7 हे टोकन पध्दतीने लागवड करण्यासाठी उत्तम बियाणे आहे व त्यापासुन चांगले उत्पादन मिळते असे सांगीतले त्यावर विश्वास ठेवुन तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे बियाणे उपलब्ध नसल्यामुळे ते बियाणे सामनेवाला क्र. 3 कडुन खरेदी केले. सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवाला क्र. 3 यांचेकडुन बियाणे खरेदी करण्यास तक्रारदारास प्रवृत्त केले. तक्रारदार यांनी 3 एकरामध्ये कपाशी बियाणे पेरले. त्याचा बॅच नंबर 00004978 असा आहे व पंचनाम्यात 38690 असा आहे. तक्रारदार यांनी कपाशी बियाणे लागवड करण्यासाठी अगोदर पुर्ण मशागत योग्य प्रकारे केली, योग्य प्रकारे पाणी दिले. नंतर टोकन पध्दतीने बियाणांची लागवड केली. सदरील बियाणांची लागवड न झाल्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र. 2 व 3 यांना भेटले त्यांनी तक्रारदार यांना सांगीतले की, उगवण 7/8 दिवस लांबू शकते. तक्रारदाराच्या शेतात लावलेले बियाणे कमी क्षमतेने उगवले. सदरील बियाणे व्यवस्थीत न उगवल्यामुळे तक्रारदाराने कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली. कृषी अधिकारी श्री.आर.ओ.वाघ यांनी पिक तपासणी केली व पंचनामा केला. 42 टक्के उगवण झाल्याचे दिसुन आले. तसेच बियाणांमध्ये भेसळ आहे असा निष्कर्ष काढला. तक्रारदाराने मोठया प्रमाणांवर खर्च केला. शेताची नांगरणी केली, खते दिले, तक्रारदारास रु.20,000/- खर्च करावा लागला. कपाशीची योग्य प्रकारे उगवण झाली असती तर तक्रारदार यांना एकरी 15/16 क्विंटल याप्रमाणे कापुस उत्पादन झाले असते व त्यापासुन सुमारे रु.1,25,000/- उत्पन्न आले असते. तक्रारदार यांना सदरील उत्पन मिळु शकले नाही त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे कडुन नुकसान भरपाई रक्कम रु.2,00,000/- मिळावी तसेच तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा दाखल केला. सामनेवाला यांचे कथन की, सामनेवाला क्र. 2 व 3 हे सामनेवाला क्र. 1 चे अधिकृत विक्रेते नाहीत. सामनेवाला क्र. 1 ही कंपनी अधिकृत आय.एस.ओ.प्रमाणीत कंपनी असुन विविध प्रकारचे बियाणे तयार करतात. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत दिलेले सामनेवाला क्र. 2 कडुन दि.4/6/2009 रोजी 450 ग्रॅम बियाणे खरेदी केले व त्याचा बॅच क्रमांक 00004978 असा उल्लेख केला आहे तो खोटा आहे. पंचनाम्यामध्ये उल्लेख केलेला नंबर 38690 हा लॉट नंबर आहे तसेच सामनेवाला क्र. 3 कडुन दि.7/6/2009 रोजी 450 ग्रॅम प्रमाणे 2 नगाचे एकुण 900 ग्रॅम बियाणे खरेदी केले. बॅच नंबर 79231 हा खोटा आहे. कृषी अधिकारी यांनी पिक पाहणी अहवाल जो दिलेला आहे तो वस्तुस्थितीला धरुन नाही. त्यांनी दिलेले निष्कर्ष चुकीचे आहेत. बियाणे विक्री प्रतिनिधी यांनी दिलेल्या साक्षीमध्ये तक्रारदाराने लागवड 2 ते 2.5 इंचापर्यंत खोल केलेली आहे त्यामुळे बियाणे जमीनीत कोमेजुन पडलेले आहे. या लॉटचे इतर ठिकाणी शेतक-यांचे पेरलेले बियाणे चांगले आहे अशी साक्ष दिलेली आहे. कृषी अधिकारी यांनी इतर शेतक-यांच्या कपाशीच्या वाणाची पाहणी केली नाही व पंचनामे केलेले नाहीत. कृषी अधिकारी यांनी उगवण क्षमतेबाबत खात्री करुन अहवाल देणे गरजेचे होते. तसेच कपाशीचे बियाणे खराब असल्याबाबत कोठेही निष्कर्ष काढलेले नाहीत. तसेच सदरील लॉट नंबर 38690 79231 या कपाशीच्या बियाणांची उगवण क्षमता तपासणीसाठी बियाणे बिज परिक्षण प्रयोगशाळेत पाठविले नाही. बियाणे कमी उगवण क्षमता तसेच शास्त्रोक्त कारण दिलेले नाही. तक्रारदाराच्या शेतातील पिक पाहणी करीत असतांना महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे त्या परिपत्रकामध्ये नमुद केलेले सर्व समिती सदस्य हजर असणे आवश्यक आहे. तक्रारदाराच्या शेताची पिक पाहणी करतांना सर्व सदस्य हजर नव्हते. कृषी अधिकारी,चोपडा व कृषी विकास अधिकारी,चोपडा हे दोघेच हजर असल्याबाबत नमुद केलेले आहे तसेच पाऊसाचे प्रमाण काय होते ? हेही नमुद केलेले नाही. तसेच लॉट च्या तक्रारीबाबत किमान 2 ते 3 तक्रारी करणा-या शेतक-यांच्या व 2 ते 3 तक्रार न करणा-या शेतक-यांच्या शेतात भेट देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. सदरील पिक पाहणी अहवाल वस्तुनिष्ठ नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकाप्रमाणे मध्यम ते भारी स्वरुपाची जमीन आवश्यक आहे. बागायती जमीनीसाठी 3 X 3 व जिरायती जमीनीसाठी 3 X 2 अंतर ठेवावे लागते. तसेच योग्य खताच्या मात्रा द्याव्या लागतात. तक्रारदार यांना तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांनी दिलेल्या नोटीसीस उत्तर दिलेले आहे. सामनेवाला यांचे कथन की, लॉट नंबर 38690 बियाणांची 450 ग्रॅमची 900 पाकीटे व लॉट नंबर 79231 ची बियाणांची 400 पाकीटे वितरक आदर्श अग्रो एजन्सी,जळगांव यांचेकडे पाठविली होती. सदरील बियाणांबाबत कोणत्याही शेतक-याची तक्रार नाही. जुन,जुलै महीन्यामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शेतक-यांनी कपाशाची लागवड उशिरा केली आहे तसेच खुप पाऊस पडल्यामुळे पिकावर विपरित परिणाम झाला आहे. तक्रारदार यांनी कपाशीच्या पिकाचे व्यवस्थीत नियोजन केलेले नाही. सदरील बियाणांमध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
4. सामनेवाला क्र. 2 व 3 यांना नोटीसीची बजावणी झाली ते या मंचासमोर हजर झाले नाहीत त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आले. तक्रारदार यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र. 1 यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदार हे युक्तीवादाच्या वेळेस गैरहजर राहीले. सामनेवाला क्र. 1 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना निकृष्ठ बियाणे
विक्री करुन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाईसह मिळण्यास पात्र आहेत
काय ? नाही.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
5. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथन की, त्यांनी सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्याकडुन सामनेवाला क्र. 1 यांनी उत्पादीत केलेले कपाशीचे बियाणे घेतले. सदर बियाणांची लागवड केली असता त्यांची उगवण क्षमता कमी दिसुन आली त्याबाबत कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली. कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतावर येऊन पिक पाहणी केली व त्याचा अहवाल दिला त्यामध्ये उगवण क्षमता कमी असल्याबद्यल नमुद केलेले आहे तसेच बियाणांमध्ये दोष आहे असे नमुद केलेले आहे. थोडक्यात तक्रारदाराचे कथन की, सामनेवाला यांनी त्यांना सदोष बियाणे विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.
6. सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांच्या पुराव्यात असे नमुद केलेले आहे की, सामनेवाला क्र. 1 ही नामांकती बियाणे उत्पादन करणारी संस्था आहे. त्यांनी उत्पादीत केलेल्या कपाशीच्या वाणामध्ये कोणताही दोष आढळुन आलेला नाही त्याबाबत कोणत्याही शेतक-यांनी तक्रार केलेली नाही. सामनेवाला यांचे असे कथन की, पिक पाहणी अहवाल हा सदोष आहे. महाराष्ट्र शासनाने परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे सदस्य हजर नव्हते व त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही. सदरील पिक पाहणी अहवाल हा गृहीत धरता येणार नाही. तक्रारदार यांनी मुळ अहवाल या मंचासमोर दाखल केलेला नाही. फक्त झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. तसेच तक्रारदार यांनी शासकीय प्रयोगशाळेतुन तपासणी करुन बियाणे सदोष असल्याचा अहवाल दाखल केला नाही. तक्रारदार यांना कपाशीपासुन किती उत्पन्न मिळाले याबाबत पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी उत्कृष्ठ प्रतीचे बियाणे उत्पादीत केलेले आहे. तक्रारदार यांनी योग्य काळजी न घेतल्यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो तसेच अत्यल्प पाऊस व जास्त पाऊस असल्यास बियाणाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तक्रारदार यांनी बियाणे पेरणी केली तेव्हा नेमकी परिस्थिती काय होती ? याचा पुरावा या मंचासमोर आलेला नाही. सबब सामनेवाला यांनी विनंती केली आहे की, तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
7. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या संपुर्ण दस्तऐवजाचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्याकडुन बियाणे विकत घेतल्याबाबत झेरॉक्स पावत्या हजर केलेल्या आहेत. तसेच पिक पाहणी अहवालाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. पिक पाहणी अहवालाचे निरिक्षण केले असता, पिक पाहणी करतेवेळेस कृषी अधिकारी व अजुन एकच व्यक्तीची सही आहे. महाराष्ट्र शासनाने नेमुन दिलेल्या समितीचे सर्व सदस्य पिक पाहणी करण्यासाठी तक्रारदाराचे शेतावर गेलेले आढळुन येत नाही. बियाणांत उगवण शक्ती कमी असणे किंवा पेरणी नंतर भेसळ निघाल्यास चौकशी करण्याबाबत परिपत्रक काढलेले आहे. कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनी कोणकोणत्या दक्षता घ्यावयास पाहीजे, कोणत्या बाबी नमुद करावयास पाहीजे हे नमुद केलेले आहे. त्यामध्ये तक्रार करणा-या शेतक-याच्या तसेच तक्रार न करणा-या शेतक-याच्या शेतास भेट देऊन पाहणी करणे अभिप्रेत आहे. जिल्हास्तरीय समितीचे पुर्नगठण करण्यात आलेले आहे त्यामध्ये एकुण 7 सदस्य नियुक्त करण्यात आलेले आहेत. तक्रारदार यांचे शेताची पाहणी ही जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या सर्व सदस्यांनी केलेली नाही. कृषी अधिकारी यांनी फक्त पाहणी केल्याचे निर्दशनास येते. त्यांचे अहवालामध्ये सर्व बाबी नोंदविलेल्या नाहीत. सदरील अहवाल हा सायक्लोस्टाईल फॉर्म मध्ये आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष काय आढळले याच्या हाताने नोंदी केलेल्या आहेत. बियाणे प्रतिनिधीची साक्ष पाहीली असता, लागवड ही दोन ते अडीच इंचापर्यंत खोल केलेली आहे त्यामुळे बियाणे जमीनीत कोमेजून पडलेले आहे असे नमुद केलेले आहे तसेच सदरील लॉटचे इतर ठिकाणी शेतक-यांचे प्लॉट चांगले आहेत असेही नमुद केलेले आहे. पंचनाम्यामध्ये नऊ ओळीत उगवण शक्तीबाबत खात्री करण्यात आली. एकुण 162 पैकी 67 फुलीवर उगवण आढळुन आली. तक्रारदार यांनी कपाशीच्या बियाणांची लागवड करतांना योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. जर बियाणे खोल जमिनीत पडले तर त्यावर बुरशीनाशक रोगाचा प्रार्दुभाव होऊन त्याची उगवण होत नाही. तक्रारदार यांनी जेव्हा बियाणे पेरले आहे तेव्हा पाऊसाचे प्रमाण कसे होते ? वातावरण पोषक होते किंवा काय ? याबाबत पुरावा उपलब्ध नाही. तसेच सदरील बियाणे सदोष होते याबाबत अहवाल या मंचासमोर प्राप्त नाही. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र पुराव्याकामी दाखल केलेले नाही. सबब एकत्रीतरित्या सर्व पुराव्याचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष बियाणे देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत., म्हणुन तक्रारदार यांची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. सबब मुद्या क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 10/09/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.