(घोषित दि. 23.03.2011 व्दारा सौ.ज्योती ह.पत्की, सदस्या) या तक्रारीची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे. तक्रारदाराने टाटा इंडीगो डी.एल.एस. क्रमांक एच.एच.21 व्ही 0110 हे वाहन खरेदी केले. सदर वाहनाचा त्याने न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी (यापुढे विमा कंपनी असा उल्लेख करण्यात येईल.) यांच्याकडे दिनांक 14.11.2009 ते 12.11.2010 या कालावधीसाठी विमा उतरविला होता. विमा कालावधीमध्येच दिनांक 25.06.2010 रोजी तक्रारदाराने वाहन औंढा नांदेड रोडवर जोरदार वादळामुळे मोठे झाड गाडीवर पडले आणि वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहन जालना येथील सानिया मोटर्स यांचेकडून दुरुस्त करुन घेतले. तक्रारदारास वाहन दुरुस्त करुन घेण्यासाठी रुपये 99,447/- एवढा खर्च आला. अपघातानंतर वाहनाच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रारदाराने विमा दावा दाखल केला. परंतू विमा कंपनीने वाहनाच्या दुरुस्तीसाठी झालेला पुर्ण खर्च न देता फक्त रुपये 47,000/- चेकद्वारे दिले व उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार विमा कंपनीने पुर्ण खर्चाची रक्कम न देता अर्धवट रक्कम देऊन त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडून नुकसान भरपाई रक्कम रुपये 83,277/- कार्यवाहीच्या खर्चासह मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराच्या वाहनाचा विमा त्यांच्याकडे उतरविला असुन विमा कलावधीमध्येच वाहनाचा अपघात झाल्याचे मान्य केले आहे. विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विमा कंपनीचे सर्वेअर श्री. सचिन व्यवहारे यांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली आणि त्यांनी तक्रारदाराच्या वाहनाची रुपये 47,000/- चे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला. तक्रारदाराने रक्कम रुपये 47,000/- पुर्ण समाधानाअंती स्वीकारलेली आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला योग्य प्रकारे नुकसान भरपाई दिलेली आहे आणि तक्रारदारास त्यांनी कोणत्याही प्रकारे त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार दंडासह फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदार विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेले शपथपत्र व कागदपत्राची मंचाने पाहणी केली. युक्तीवादाचे वेळेस तक्रारदार गैरहजर. गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.व्ही.जी.चिटणीस यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्याचे वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही 0110 चा विमा उतरविला होता आणि विमा कालावधीमध्येच दिनांक 25.06.2010 त्याच्या वाहनाचा अपघात झाला याविषयी कोणताही वाद नाही. त्यानंतर तक्रारदाराने वाहन दुरुस्तीवर झालेला खर्च रुपये 99,447/- मिळावा म्हणून विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. परंतू विमा कंपनीने रक्कम रुपये 47,000/- मंजूर करुन चेकद्वारे दिले व उर्वरीत खर्चाची रक्कम त्यास दिलेली नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याबाबत विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या वाहनाच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विमा कंपनीचे सर्वेअर श्री.सचिन व्यवहारे यांनी तक्रारदाराच्या वाहनाची तपासणी करुन वाहनाचे रुपये 47,000/- चे नुकसान झाल्याचे मुल्यमापन करुन सर्वे रिपोर्टमध्ये नमुद केले आहे ही बाब रिपोर्टवरुन दिसुन येते. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास रक्कम रुपये 47,000/- दिलेले आहेत व सदर रक्कम तक्रारदाराने पुर्ण समाधानाअंती स्वीकारलेली आहे. हे दिनांक 27.10.2010 रोजीच्या पावती वरुन स्पष्ट दिसुन येते. विमा कंपनीच्या सर्वेअरने विमा दाव्यासोबत तक्रारदाराने दाखल केलेल्या वाहन दुरुस्तीच्या खर्चाच्या पावत्यावरुन आणि अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करुन वाहनाच्या नुकसानीचे मुल्य रुपये 47,000/- निश्चित केलेले आहे आणि तक्रारदाराने वाहनाच्या नुकसानीचे मुल्य रुपये 47,000/- स्वीकारलेले आहेत. त्यामुळे तक्रारदारास गैरअर्जदार विमा कंपनीकडून वाहनाच्या दुरुस्तीच्या खर्चाची उर्वरीत रक्कम मागण्याचा काहीही अधिकार नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारास वाहन दुरुस्तीच्या खर्चाची उर्वरीत रक्कम न देऊन कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च उभयपक्षाने आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | |